आल्याविण राहावेना, तुसाठीं हा जीव केवळ भुका ।
बसावया अवकाश नाहिं, गडे, उभ्यानेंच दे मुका ॥धृ०॥
सासुरवाशी स्नेह सखे संपादन केल्यावरी ।
करू नये हयगयी, फार असावें जपुन आपल्यापरी ।
समजेना तुजपाई काय लिहिलें ललाटावरी ।
वैर पडो पाहाती उभयतां लोक वाइटावरी ।
प्रीत चालवुं आपण धरून निश्चय व्याघ्राबरोबरी ।
काय करिल बापुडे भुकत हे जन श्वानापरी ।
प्रीत ही तुझ्याकडे कशी
भक्षितां शर्करा जशी
लागसी मिष्ट तूं तशी
स्नेहपालनाविशी तुला अम्हि शरिर वाहिलें फुका ॥१॥
गोड वाटसी म्हणुन सखे निर्लज्ज लागलों गळीं ।
न करावी वाटतें अतां क्षणभर प्राणावेगळी ।
न पडे एकांतीं गांठ, न लागे हातपायाची धुळी ।
कठिण तुशी रत होणें खर्चितां द्रव्याच्या ओंझळी ।
रानोमाळ बायिका पहाव्या, काय द्यावें त्या सुळीं ? ।
गुणनिधान अशी दुजी नसे या अभ्रमंडपातळीं ।
चांगली म्हणावी किती
गोजरी सौम्य आकृती
वर्णितां भागले किती
प्राण तुझ्या संगतीं वाहिला, तरि कां म्हणशी नको ? ॥२॥
मुखमृगांक टवटवित, सुवासिक तूं निर्मळ राजसे ।
गौरवर्ण पोटर्‍या,शरिर पत्र केतकीचें जसें ।
न पडे श्रवणीं हळुच बोलणें, तुझें थोडकें हसें ।
दृष्टभेट होतांक्षणिं तुजवर मग इच्छा जातसे ।
प्रीत बिघडतां दु:ख जिव्हारीं, मन कष्टी होतसे ।
अप्रमाण होऊं नको, तुझ्या मांडावर ठेविलें उसें ।
तू धन्य धन्या प्रियकरे
भोगितां न वाटे पुरे
कल्पना मनाची उरे
तुजविण निशिदिनीं बरें न वाटे आम्हां विषयसाधका ॥३॥
दे सोडुन मीपणा, अम्हांसी बोल वचन राजीचे ।
वागत जा, लेकरू जसें करि आर्जव पंतोजिचे ।
अभिमानानें उंच वाढले देठ जसे भाजिचे ।
गुण नसतां मी गुणी म्हणावें, हें लक्षण पाजिचें ।
ऐक्य विचारें मान्य असावें मन पाहुन मर्जिचें ।
न झाकती पार्‍यांत सुढाळक दाणे हुरमूजिचे ।
मी मी कोणीच म्हणुं नये
भुइ कोपरानें खणुं नये
होनाजी बाळा म्हणे सये
होऊं नये बायको, होउन आतां बसलीस लांब कां ? ।
चतुर मानती खरें, मूर्ख म्हणती पोबारा बायिका ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel