कसें फुटलें प्रारब्ध ? कोपला हरिहर मजवरता ।
ऐन भरामधें आले तों सखये, गत झाला भर्ता ॥धृ०॥
मजप्रमाण धुंडितां स्वरुप या सृष्टीवर नव्हतें ।
सुखामधें चांगली पतिसवें आजवरी होतें ।
कशि कोणाची लागली दृष्ट माझ्या सौभाग्यातें ? ।
दैव भंगुनि कसें आलें ग बाई मरण भ्रतारातें ? ।
धनतर माझे गोत, आतां तें काय असुन नुसतें ! ।
पतिरत्न हरपल्यावरी नारीस कोण पुसतें ? ।
तें पहा कुठुन माझ्याच आलें संचितीं ।
मी केळ जळाले दु:खाग्नीचे संगतीं ।
बाई नाहीं ग शुभ अधिकार अतां मजप्रती ।
बसतां निचिंत मज हवा वाटतो पती ।
मग आपले स्तन मी चुरते आपल्या हतीं ।
मन आशावंत, विषयावर माझी प्रिती ।
चांगला पुरुष पाहताम्च सहभागती ।
म्हणवेना होइल कीं काय चंचळ वृत्ती ।
परिणाम शुद्ध लागेल कोणत्या रिती ? ।
गेले असते सती, न केला आधीं विचार पुरता ॥१॥
मुकले सौभाग्यास तेजहीन स्वरुपावर आलें ।
नाहिं कपाळीं कुंकु, विशोभित चंद्रवदन झालें ।
वैधव्याचें दु:ख या दैविं कुठुन लिहिलें ? ।
पतिवरची मीच अगोदर कां ग नाहिं मेले ? ।
निराश्रित मज टाकुन अक्षयि प्राणपती गेले ।
असें दुर्धर हें पाप पूर्वजन्मिं मी काय केलें ?
त्याचेंच हें फल प्राप्त भोगणें मशीं ।
सार्‍याच गोष्टिनें पहा नाडलें कशी ?
‘पति पति’ म्हणत रडतां जाते दिननिशी ।
मासोळि जळाविण मी हुरपळते तशी ।
वय नवटदशा, तारुण्य बहर मुसमुशी ।
नुकताच होता प्रारंभ माझे नौतिशी ।
इतक्यांत सखा वारला, मि झाले कशी ।
हें कसें आवडलें भगवंता तुशीं ? ।
जाउन बसते अंधारिं सणाचे दिशीं ।
मी दु:खित मांनसीं, कोणावर न ये रागें भरतां ॥२॥
अयोग्य झालें जनीं, न पहाती मुख माझें नयनीं ।
घरांतील माणसें सारीं मजवर पडलीं फिरुनी ।
सासुसासरा, आप्त आणिक दिर, भाऊ, पिता, जननी ।
कोणींच शकुन घेईना, त्यागिलें मज सर्वत्रांनीं ।
श्वानापरि हें जिणें जातसें आयुष्य दिनरजनी ।
स्वस्थ अता निर्वेध असावें परमेश्वरभजनीं ।
मी असा जिवाला धिर आपल्या देतसे ।
तरि दु:खशमन होइना, अतां करुं कसें ? ।
स्वामींचें स्मरण होतां जीव तळमळतसे ।
झोपेंत सखा दृष्टिपुढें माझ्या दिसे ।
धरिलें कवळुन मज, असा भास होतसे ।
मग सावध होउन बाई मीं हळहळतसे ।
देह अशा दु:खाच्या वणव्यामधें जळतसे ।
समजाउं कितीदां ? मला जाहलें पिसें ।
देहभान दिवस कीं रात्र मला हें नसे ।
उगिच जन्मले, असे व्यर्थ हा भार सृष्टिवर्ता ॥३॥
उत्तम सण संक्रांति आणि त्या गौरि चैत्रमासीं ।
सुवासिनी शृंगारयुक्त फिरताती त दिवशीं ।
थव्यांमागें थवे जाती बायकांचे अति उल्हासीं ।
मी पाहुन त्याकडे न दावी मुख आपलें त्यांसी ।
जाहली रुपाची माती, फार वाईट वाटेल मजसी ।
हाय हाय रे ईश्वरा, काय हें अणिलें अद्टष्टासी ? ।
मजहुन आयुष्य कसें उणें झालें स्वामिला ? ।
अनिवार कहर शिरिं शोकाचा जाहला ।
असा काय पूर्वजल्मिंचा दोष लागला ? ।
कीं विवाह काळीं दिस नव्हता चांगला ? ।
नुसता डाग सौभाग्याचा लागला ।
मी हवा तसा कधि नाहिं सखा भोगला ।
राहिली आशा, रडतांना जिव भागला ।
होनाजी बाळा म्हणे, नारिला उपाय यापरता ।
नाहीं दुसरा, अतां आराधी जो कर्ताहर्ता ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel