मज भोगा हो, व्यर्थ जातो भरनवतीचा रुतू ।
मदन अंगिं साचला, चला एकांतिं उभयतां रतूं ॥धृ०॥
आज तुम्हांला येत असे काकुळती मी येवढी ।
मनाजोगती तुझ्या, तुं माझ्या एकांताचा गडी ।
करि तळमळ जिव, केवळ झाले तुमच्याविण बापुडी ।
चला निजूं खोलींत घट्ट घालुनि द्वाराला कडी ।
कठिण विषय हा, झुरझुर पाझर, थरथर कापे कुडी ।
नरम दुशालेपरी करा माझे शरिराची हो घडी ।
बळकट कवळुन मज धरा
करि धगधग जिव घाबरा
मरणाचा निश्चय खरा
पुरती मारा धरुन अपराधावर, कर ठार तूं ॥१॥
कवळे दोन्ही फार कठिण कुच ह्रदयावर हलती ।
रूप नाजुक, साजरी जशी मी पुष्पामधें मालती ।
मन ध्याई तों तुम्ही करुन घ्या मज उलथीपालथी ।
चारि प्रहर दमुं नका, मला निजवा आपल्याखालती ।
ऐकन आपली स्वामि जशी जी आज्ञा सांगाल ती ।
तुमचे मर्जीसाठीं वस्त मी देते मागाल ती ।
उठवुन करिं धरिते बळें
लुगडें करितें मोकळें
त्या वेळे जीव तरमळे
स्नेह मोहो जाहले, प्रीत करुन विषयाचा डेरा मथूं ॥२॥
कां बोला ना? तुम्ही फुकाचे मशी सुखाचे रहा ।
मीच बडबडते, व्यर्थ जसें लेकरु करितसे टयहा ।
आणखी रांडा किती भोगितां दहा प्रकारच्या दहा ? ।
मजपासी मन थंड सदोदित, परकांतेची चहा ।
तप्त सुवर्णापरी करितसे या शरिराचा दाहा ।
द्रव सुटला शरिरांत, हात घालुन लुगडयामधें पहा ।
धडधडा ह्रदय धडकतें
आवळुन मांडया दडपते
जीव पक्ष्यापरि झडपिते
प्रीत विघडतें ही निष्कारण, व्रतें कोणतीं व्रतूं ? ॥३॥
पंचम दिवशीं सूख जिवाला विषयाचें वाटतें ।
लौकर गळतां तुम्ही तेव्हां मन माझें कंटाळतें ।
बसुन मंचकावरी अश्रूं मी नेत्रांतुन गाळिते
आठवण होते, तेव्हां दुष्ट वेळा तेवढी टाळते ।
या काचणिनें मी शरिरानें दिवसेंदिवस वाळतें ।
कोणाजवळ सांगावें ? असा जिव नित्य उठुन जाळितें ।
मग धरिली उठतांक्षणीं
कांता सुंदर लक्षणी
स्थिर झालि हंस पक्षिणी
लाउन झुरणी हे प्रियकरणी, मोहिलेस फार तूं ।
होनाजी बाळा म्हणे आतां कर आमचा पूर्ण हेतू ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel