देशबंधु चित्तरंजनदास

६-८-१८७० ला चित्तरंजनांचा जन्म झाला.
खानदान व कर्णासमान उदार घराण्यांत शिकले, बॅरिस्टर झाले. परंतु घरीं गरिबी. वडिलांनीं अनेकांना हजारों रुपये मदत म्हणून दिलेले पैसे परत काणी देईना. वडिलांनी स्वत:ला दिवाळखोर म्हणून जाहीर केले. आणि चित्तरंजनांनी आपलेहि नांव दिवाळखोर म्हणून नोंदलें. पित्याची अप्रतिष्ठा स्वत:वरहि घेतली. कोर्टांत काम मिळना. यातायात. आणि वंगभंग चळवळ आली. खुदिरामनें बाँब फेकला एका मॅजिस्ट्रेटनें भरमसाट शिक्षा दिल्या. एका मुलाला फटक्याची शिक्षा देण्यांत आली. म्हणून या मॅजिस्ट्रेटवर खुदिराम चवताळून गेला, परंतु बाँब चुकून दुस-यावरच पडला. पुढें कट सापडला. माणिकतोळा बाँब खटला सुरु झाला. अरविंद घोष, त्याचे भाऊ बारिंद्र, अनेंक आरोपी. वकील नीट मिळेना. अरविंदांच्या बहिणीनें माझ्या भावाला वाचवा म्हणून पत्रक काढलें.

आणि चित्तरंजन धांवले. सहा महिने रात्रंदिवस काम करीत होते. “अरविंद वेदांती आहेत. वेदांत सांगतो, तुझा उध्दार करणारा तूंच. हे जसे व्यक्तीच्या जीवनांत तसेंच राष्ट्राच्याहि राष्ट्राला स्वत:चा आत्मा हवा असेल तर राष्ट्रानें स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे. तुम्ही स्वतंत्र व्हा. गुलामाला कोठला विकास ? तुम्ही ईश्वराचे अंश. तें तेज प्रकट करा. स्वातंत्र्याच्या रुपानेंच तें प्रकट होईल. हें स्वातंत्र्य मिळवितांना कष्ट पडले तर भोगा. तुरुगांत जा. दुर्बळपणा नको ” अशी अरविंदांची शिकवण. चित्तरंजन म्हणाले, अरविंदांनीं दहशतवाद नाही शिकवला. त्यांनी सविनय कायदेभंग शिकवला.  देशबंधूंनी या बचावाच्या भाषणांत ‘पॅसिव्ह रेझिस्टन्स’ हा शब्द वापरला आहे. आफ्रिकेंतील थोर सत्याग्रह अजून पुढें यायचा आहे.

बारिंद्र, उल्हास कर वगैरेंचेहि खटले देशबंधूंनी चालवले व त्यांच्या फांशीच्या सजा जन्मठेपेच्या केल्या. चित्तरन्जन पहिल्या प्रतीचे बॅरिस्टर झाले. प्रॅक्टीस शिगेला पोंचली. वर्षाला तीन लाखांची प्रॅक्टीस. परन्तु कुबेराप्रमाणे मिळवून कर्णाप्रमाणें देत. त्यावेळेस ते सुटींत इंग्लंडला जात. काव्यशास्त्रांत रमत. पत्नी वासन्तीदेवी. उभयतांचें एकमेकांवर फार प्रेम. वासन्तीदेवी म्हणायच्या, “चित्त, कोणत्या रंगाचें पातळ नेसूं ?” “अस्मानी नेस, ”असा विनोद.

बॅरिस्टर होऊन आले तेव्हा दारिद्रय, निराशा. त्यावेळेस वैष्णवगीतें रचलीं. परंतु त्यांचे सागरसंगीत हें भव्य खंडकाव्य आहे. आई मरतांना चित्तरंजन जवळ नव्हते म्हणून म्हणाली, “ त्यांचें सागरसंगीत आणून द्या. त्यांत तो आहे.” आई म्हणायची, “जन्मोजन्मी चित्तरंजनची आई होण्याचें भाग्य मिळो.” चित्तरंजनांचें हृदय सागराप्रमाणेच उसळे, उचंबळे.

आणि लोकमान्य टिळक सुटून आले. महायुध्द झाले. माँटग्यू कमिशन आलें. साक्षींत एका प्रश्नाला उत्तर देतांना देशबंधु म्हणाले, “आम्ही स्वराज्यास नालायक असूं तर तुम्ही दीडशें वर्षें काय केलें ? तुमची नालायकी सिध्द होते, आमची नव्हे.” ते तेजस्वी शब्द ऐकून बंगालचा गव्हर्नर उठून गेला. परंतु माँटग्यू बोलत बसले.

नवीन सुधारणा येणार होत्या. परंतु आधीं रौलेट बिल आलें. आणि साबरमतीचा महान् सत्याग्रही उभा राहिला. हजारो वर्षांत न मारलेली आत्म्याची हांक आली. आणि देसबंधूंनी सत्याग्रह पत्रावर पहिली स्वाक्षरी केली. जालियनवाला बाग, असहकार सारें आलें. लोकमान्यांचें निधन, नागपूरला असहकाराला विरोध करायला म्हणुन देशबंधु आले परंतु महात्माजींनीं त्यांनाच ठराव मांडायला लावला. कोणी प्रश्न केला, “तुमची वकिली ?” चित्तरंजन म्हणाले, “मी बोलतो तसा वागतो.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel