कोणतेंहि राष्ट्र सतत वैभवाच्या शिखरावर आरूढ आहे असें कधीं झालें नाहीं.  चढलेलें पडलें व पडलेलें चढलें असेंच आपणांस दिसून येतें.  कधी पराजय सोसावे लागले, कधी मुत्सद्देगिरीचें वाटोळें झालेलें दिसून आलें; कधीं शूरपणाऐवजीं भ्याडपणाचें प्रदर्शन झालें असें प्रत्येक राष्ट्राच्या इतिहासांत आहेच.  प्रत्येक राष्ट्राचा इतिहास म्हणजे गुणांदुर्गुणांनी विणलेला पट आहे.  त्यांत सद्गुणाच्या सोनेरी सूत्रांची जशी मौज आहे, तशी दुर्गुणांच्या काळया तंतूंची पण खिन्न छटा आहे.  परंतु असें असलें तरी अशाहि इतिहासापासून स्फूर्ति निर्माण करतां येते, तो इतिहास तेजस्वी दाखवितां येतो.  आपल्या देशाच्या इतिहासांतील कमीपणाचे, मानहानीचे, पराजयाचे प्रसंगहि मुलाच्या समोर देशभक्तीच्या दृष्टीनें मांडतां येतात.  मोठमोठे पराजयहि तसे महत्त्वाचे नव्हते, त्यांत देशाचें विशेष नुकसान नव्हतें असें दाखवावें; मुत्सद्यांच्या झालेल्या चुका ह्यांवर विरजण घालावें - व तसें कधीं कधीं सर्वा्चेच चुकतें असें सांगावें.  सारांश, कमीपणाच्या गोष्टींस कमी महत्त्व देऊन उज्ज्वल प्रसंगच उठावदान रीतीनें पुढें मांडावे.  कधीं देशाचें दुर्दैव असें सांगून तर कधीं शत्रूची सद्दी जोरावर व त्यास नशीब अनुकूल असें सांगून आपला कमीपणा झांकाळून घ्यावा; शत्रुहा कपटी होता, मोठा कारस्थानी होता असे दाखवावे.  सारांश, देशाच्या पराजयांतहि मोठेपणा दिसावा व शत्रूच्या जयांतहि हीनपणा दिसेल अशा त-हेचें स्वरूप स्वतंत्र देशांत मुलांना इतिहास शिकवितांना इतिहासाला देतात.  या सर्व गोष्टींमुळें देशाबद्दल, आपल्या थोर पूर्वजांबद्दल मुलें अभिमान बाळगण्यास शिकतात व आपल्या शत्रूच्या द्वेष करण्यास शिकतात.

हिंदुस्थानच्या सभोवतीं विशिष्ट अशी जमिनीची सरहद्द नाहीं.  त्याच्या तिनहीं बाजूस समुद्र पसरलेला आहे.  चौथ्या बाजूस प्रचंड हिमालय पसरला आहे.  हिंदुस्थानावर ज्या स्वा-या झाल्या त्या फक्त वायव्य दिशेच्या खिंडीतून झाल्या.  हिंदुस्थानच्या सरहद्दीचा हिंदुस्थानच्या इतिहासावर फार परिणाम झाला आहे.  वायव्य सरहद्दीकडून येणा-या शत्रूंनीं येथील राजे जिंकले, तेथें सिंहासनें स्थापिली.  परंतु गंमत ही कीं बाहेरून येणारे परकीय लोक येथे स्थायिक झाले व येथील जनसागरांत मिळून गेले.  हिंदुसमाजानें सर्वांना आत्मसात करण्याचें काम इतकें पूर्ण झालें कीं या परकीय लोकांतीलच कांही लोकांना आम्ही विभूति मानून पुजूं लागलों.  ते हिंदूस्थानांतील रहिवाश्यांचे कल्याण पहात, देशाच्या हिताहिताशी समरस होत.

दुसरी एक गोष्ट अशी कीं सर्वसाधारण हिंदुस्थानापासून ही वायव्य सरहद्द पुष्कळ दूर आहे.  स्वत: हिंदुस्थानांतल्या हिंदुस्थानांत इतक्या जमाती व राजकीय विभाग होते कीं वायव्य सरहद्दीवरून येणारे नवीन परकी हे विशेष असे वाटलेच नाहींत.  दहा राजकीय विभागांत अकरावा एक असें ते मानीत, झालें.  हिंदुस्थानचा म्हणून राष्ट्रीय इतिहास असा नाहीं.  प्रांतिक इतिहास आहे.  पण अखिल राष्ट्रीय नाहीं.  हल्ली ब्रिटिशांचे अमदानींत हिंदुस्थान एक-राष्ट्र दिसतें आहे ; ज्या राष्ट्रानें स्वत:च्या प्रयत्नानें राष्ट्रैक्य साधिलें आहे, सर्वांनी मिळून संकटांशी, सामान्य शत्रूशीं टक्कर दिली आहे, त्याच राष्ट्राचें ऐक्य खरें समजावयाचें.  तेंच ऐक्य.  हृदयांत गेलेलें कार्य साधक समजावयाचें.  बाह्य परिस्थितीमुळें सर्वच गुलामगिरींत येऊन पडलों व सर्वांवर एकाच सत्तेचें राज्य आहे यामुळें वाटणारी एकता ही खरी नाहीं.  ही तात्पुरती दिखाऊ व भंगूर आहे.  हिंदुस्थानचा म्हणून राष्ट्रीय असा इतिहास नाहींच म्हटले तरी चालेल; आणि म्हणून जो इतिहास आहे तो सर्व प्रांतीयांच्या मनांत देशभक्ति, अखिल राष्ट्रभक्ति, स्फूर्ति निर्माण करूं शकणार नाहीं.  भूतकाळांत एकराष्ट्र बनविण्याच्या चळवळी झाल्या नाहींत असे नाही; त्या चळवळींत थोर महात्मे निर्माण झाले, वीर चमकले; मुत्सद्दी गाजले.  त्याच्यापासून आपणांस स्फूर्ति मिळवितां येईल.  परंतु या चळवळी एकंदर अवाढव्य इतिहासांत क्षुद्र वाटतात.  अनंत आकाशांत एकादा जलधर मेघ कोठें असावा, एकादी वीज कोठें चमकावी तसेंच हें आहे.  यामुळे हिंदुस्थानचा इतिहास शिकवितांना देशभक्ति उत्पन्न करण्याच्या जो हेतु तो, तो विषय शिकविणारांच्या मनांत येत नाही; कारण त्यांत त्यास कांहीं वाटत नाहीं.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel