२९ सत्य सोपें नाहीं

या जगांत जें जें आहे तें तें देवाचें आहे.  म्हणून त्यागबुध्दींने वाग.  गिधाडाप्रमाणें सारें एकटाच बळकावून बसूं नकोस.

-- ईशावास्योपनिषद

येत्या ऑगस्ट महिन्यांत अत्यंत महत्त्वाचीं बिलें असेंब्लींत येणार आहेत.  कुळकायदा, तहशील सुधारण कायदा व कर्जनिवारण कायदा यासंबंधीचीं शेतक-यांच्या जीवनांशी अत्यंत संबंध असलेली बिलें येणार आहेत.  आजच्या या लेखांत कर्जनिवारण या बिलासंबंधींच दोन शब्द मी लिहीत आहें.  इतर बिलांसंबंधीं पुढें केव्हा लिहीन.

मुंबई कां. सरकार जशा प्रकारचें बिल आणींत आहे तशा स्वरूपाचें बिल गेल्या दीडशें वर्षांत कोणी आणलें नाहीं.  कां. सरकार जनतेच्या हितासाठीं आहे.  असें क्रांतिकारक बिल काँग्रेसच आणूं शकेल.  प्रसिध्द झालेला बिलाचा आराखडा क्रांतिकारक नाहीं.  परंतु शेंकडों ठिकाणच्या सूचनांचा विचार होऊन सिलेक्ट-कमिटी बिलाला जें स्वरूप देईल तें क्रांतिकारक होईल अशी अशा आहे.

महाराष्ट्र प्रांतिक कां. कमिटीनें महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत.  परंतु त्या सूचनांत एका गोष्टीबद्दल उल्लेख नाहीं.  बिलाच्या आराखडयांत लिहिलें आहे कीं १९३१ सालापूर्वीं व्याजाचा दर शेंकडा ६ धरावा व ३१ नंतर ९ धरावा.  हिशेब करतांना असें व्याज धरावें असें मूळ बिल म्हणतें.  हे व्याजाचे दर अन्याय्य आहेत.  या दरांबद्दल म. प्रांतिक कमिटी मुकी आहे.  परवा नाशिक जिल्ह्यांत जी व्यापारी व सावकार परिषद भरली तींत १२ रु. शेंकडा दर धरावा असा ठराव झाला.

ब्रि. सरकार ज्या वेळेस कर्ज काढतें त्या वेळेस शेंकडा ३ टक्क्यांहून कमी व्याजाचें दरानें कोटयवधि रु. कर्ज त्याला मिळतें.  पुणें म्यु. टीस शेंकडा ४ दरानें कर्ज मिळणार आहे.  परंतु सर्वांत दरिद्री जो शेतकरी त्याला महाग व्याजाचा दर.  वास्तविक उलट परिस्थिति हवी.  शेतक-यांस सर्वांत स्वस्त दरानें कर्ज मिळालें पाहिजे.  ज्या प्रचंड संस्था आहेत,  मोठमोठया मु. टया, मोठमोठे कारखाने, मोठमोठीं राज्यें, साम्राज्यें त्यांना महाग दर पाहिजे.  आज त्याच्या उलट स्थिति आहे.

आजच्या समाजरचनेंत हाच अन्याय होत आहे.  अधिक भुकेलेल्यांची अधिक उपासमार.  अधिक कष्ट करणा-यांस अधिक कष्ट.  पैशाकडे पैसा जातो ही म्हण खरी आहे.  एखाद्या दुकानांतून जो एकदम चार महिन्यांचा माल घेतो, त्याला स्वस्त भाव असतो.  आतां ४ महिन्यांनी रोख पैसे देऊन एकदम बेगमी, श्रीमंताशिवाय कोण करूं शकेल?  आणि पै पैशाचा माल किंवा उधार माल गरिबाशिवाय कोण घेणार?  गरिबाला सा-या वस्तू महाग.  श्रीमंताला सारें स्वस्त!  अशी विचित्र परिस्थिति जेथें दिसते तेथील सारी समाजरचनाच सडली आहे असें म्हणणें सत्याला धरून आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel