''मी नोकरी पत्करली म्हणजे माझी मते विकलीत असे नाही. मला जे खरे वाटेल ते बोलण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे.''
एवढे बोलून तो तडक घरी आला आणि त्याने राजीनामा पाठवून दिला. तसे न करण्याबद्दल त्याला अनेकांनी सल्ला दिला. हेडमास्तर तर म्हणाले, ''मी आपले नावच मागे घेतो.'' पण प्रभाकरने निश्चय पार पाडला. ज्या स्पष्टवक्तेपणामुळे तो संपादक झाला त्यामुळेच त्याला नोकरी सोडावी लागली.

निवडणुका झाल्या. शेटजींना विजयाची खात्री वाटत होती. आपल्या पैशाचा आणि पुढे पुढे करणा-यांचा त्यांना फार भरवसा होता. पण निवडणुकीत हेडमास्तर निवडून आले. इकडे प्रभाकर राजीनामा देऊन बाहर पडला. त्याला त्याच्याजोगती नोकरी मिळाली नाही. शेवटी तो आपल्या गावी आला. एक छोटेसे दुकान त्याने घातले पण व्यापारी कौशल्य त्याच्यात नव्हते. दुकानातून घरखर्च चालत नसे. शेतीवाडीतही प्रभाकर लक्ष घाली. त्याचे जीवन कसे तरी चालले होते. लोक त्याच्याबद्दल हळहळत होते.

आणि एकदिवस त्याच्या त्या खेडयांतल्या दुकानापुढे एक मोटर उभी राहिले. दीनदयालजींनी विचारले, ''कसे काय चालले आहे दुकान?''

प्रभाकरला वाटले जखमेवर मीठ चोळण्यासाठी हे आले आहेत. चांगले चालले आहे, द्यावे दडपून असा विचारही डोकावून गेला. पण त्याने स्वत:ला सावरले. म्हणाला, ''कसा तरी संसार रेटतो आहे.''

दीनदयालजींनी प्रभाकरला मिठी मारली. ते म्हणाले, ''जीवनाशी खरा प्रामाणिक आहेस. 'नवसमाज' तुझ्यावाचून पोरका आहे. आजही उत्तम साहित्य त्यात आहे. पण ते तेज आज तेथे नाही, आत्मा तेथे नाही. तूच 'नवसमाज' सांभाळ. आत्म्याची हाक ऐकणारा प्रामाणिक, निर्दंभ मनुष्य तू आहेस. 'नवसमाज' चालवायला तूच लायक. माझी चूक झाली. तुझी आत्म्याची हाक दडपून टाकायला मी चुकीने सांगत होतो. तू आपल्या आत्म्याच्या हाकेचा अपमान केला नाहीस. 'नवसमाजा'ला तू लायक आहेस. माझ्या विनंतीचा अव्हेर करू नकोस.''

दुस-या महिन्यापासून पुन्हा प्रभाकरच्या संपादकात्वाखाली 'नवसमाज' निघू लागला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel