एका काळच्या ह्या शास्त्रीय भूमीत सध्यां शास्त्राचा अत्यन्त लोप झालेला आहे. प्राय: ह्या देशांतील यच्चयावत लोकांची स्थिति आफ्रिकेंतील निग्रोंच्या स्थितिच्या जवळ जवळ आलेली आहे. ज्यांना ग्राजुएट म्हणतात त्यांच्याजवळही शास्त्र नाहीं व ज्यांना शास्त्री म्हणतात त्यांच्याजवळही शास्त्र नाही. एक पाश्चात्य सटर फटर पुस्तकें वाचून घोकून खर्डेघाश्या गुलाम बनलेला आहे व दुसरा पौवार्त्य ग्रंथ घोकून मद्दड झालेला आहे. अशा ह्या दुहेरी कंगाल समाजाला सुधारण्याचें म्हणजे शास्त्रीय स्थितीस नेण्याचें बिकट कृत्य, कोणाचेंहि साहाय्य मिळण्याची आशा न करितां पार पाडावयाचें आहे. राजकीय, सामाजिक, वाड्.मय वगैरे कोणतेंहि कृत्य ह्या देशांत ज्या कोणाला करण्याची उमेद आली असेल त्यानें अंगिकारिलेल्या कृत्याच्या विस्ताराचा अंदाज घ्यावा, त्यांत व्यंगें व दोष कोठें आहेत त्याची विचक्षणा करावी, व ते दोष, व्यंगे काढण्यास स्वतांच लागावें, इतर कोणीची वाट पाहूं नये. कारण ममतेनें धावून येण्यास कोणीच नाही. स्वजनहि नाहीत व परजन तर नाहीतच नाहीत. अशी एकंदर फार हलाखीची स्थिति आहे. आणि ही स्थिति कांही उत्साह विघातक नाही. संकट यावें तर असेंच यावें. ह्या संकटांतच आपल्या कर्तबगारीची खरी परिक्षा आहे.'

राजवाडे यांस सर्व शास्त्रांची कशी जरुर भासे हेंही त्यांनी वरील लेखांतच पुढें लिहिलें आहे ते लिहितात 'व्याकरणशास्त्रावांचून सध्यां काय अडलें आहे, असा बालिश प्रश्न कोणी कोणी करतात. त्यांना उत्तर एवढेंच की हरएक शास्त्रांवाचून तर देशाचे सर्वत्र नडत आहे; जितकें रसायनशास्त्रावांचून नडत आहे, जितकें राज्यशास्त्रावांचून नडत आहे, जितकें युध्दशास्त्रावांचून नडत आहे, तितकेच व्याकरण शास्त्रावांचूनहि नडत आहे' राष्ट्राच्या प्रगतीला व व्यवहाराला सर्व शास्त्रांची जरुरी आहे. हें लक्षांत आणूनच राजवाडे अकुंठित गतीनें वनराजाप्रमाणें सर्व ज्ञानक्षेत्रांत मिळावा ही त्यांची महत्वाकांक्षा होती. भारतीयांचा देह पारतंत्र्यांत असो; पण मानसहंस तरी स्वतंत्र होवो हें त्यांचें दिवारात्रीचें स्वप्न होतें. भारतीयांच्या विचार विहंगमास ज्ञानाच्या गुलामगिरीतून त्यांनी मुक्त करावयाचे कठिणतर कर्तव्य स्वीकारले होतें. बंगालमध्यें आशुतोष मुकर्जी यांनी जें कार्य केलें, तेंच कार्य एकाकी राजवाडे यांनी महाराष्ट्रांत दृढमूल करण्याचा प्रयत्न केला. राजवाडे यांचा स्वभाषावलंबाचा मार्ग मात्र आशुतोषजीच्या मार्गापेक्षां निराळा होता. आशुतोष यांनी बंगाली भाषेस उत्तेजन दिलें. परंतु इंग्रजी लिखाणावर त्यांचा कटाक्ष नसे. या कठोर कर्तव्यास्तव ते आमरण कष्टत असता सुसंपन्न ग्राजुएटही सरकारच्या कच्छपी कसे लागतात याचें त्यांस राहून राहून नवल वाटे. आपला भिकारडा चारित्र्यक्रम तिरस्कृत मानावा असें ते या ग्राजुएटांस सांगतात. 'जोंपर्यंत शास्त्रांत तुम्ही गति करुन घेणार नाहीं तोंपर्यंत तुमच्या तरणोपायाची आशा नाही' असे त्यांचे शब्द आहेत. स्वराज्याच्या गप्पा मारणारे व गुलामगिरीचें दिवसभर काम करून रात्री देशभक्तांच्या कामाची उठाठेव करणारे लोक त्यांस तिरस्करणीय वाटत ते म्हणत दिवसभर राज्ययंत्र चालविण्यासाठी त्यास तेल घालीत असतां व रात्री मात्र त्या राज्ययंत्राचा वाचिक निषेध करितां - यांत काय अर्थ आहे ?' कधी कधी संतापून ते या लोकांस Biped द्विपाद पशू अशी संज्ञा देत.काय, शाळेंत मास्तर आहांत- गाढव आहांत झालें. असें ते स्पष्टपणें म्हणत. कारण शाळेंत शिकून सरकारचें राज्ययंत्र सुरळीत चालविणारे गुलामच बाहेर पडणार ना असें ते म्हणत व जोपर्यंत हा गुलामाच्या उत्पत्तीचा धंदा तुम्ही सोडला नाही तोंपर्यंत तुम्ही पशूच नाही तर काय असें राजवाडे बेमुर्वतपणें म्हणत- यांतील इंगित वाचकांच्या लक्षांत येईलच.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel