थोर महत्त्वाकांक्षा, महनीय व उदात्त ध्येये ! आपण आपल्या जीवनाचे काय करणार, या जीवनाचे काय करावयाचे ? आपण आपला अहंकार धुळीत मिळविण्याची शपथ घेऊ या. अहं पुसून टाकू या. सिध्दीचे हे पहिले साधन आहे.

अनहंवेदनं सिध्दि । अहंवेदनमापद: । 

अहंकाराहित्य म्हणजे सिध्दी, अहंकाराची सदैव जाणीव म्हणजे अपयश व आपत्ती. अहंकाराचे विस्मरण म्हणजे विजय, अहंकाराचे स्मरण म्हणजे मरण. कोणतेही कार्य अंगावर घ्या, कोणताही पंथ स्वीकारा, कोणतेही ध्येय पसंत करा. ते ध्येय, ते कार्य तुमच्याहून मोठे असले पाहिजे. सर्व सेवेची कर्मे सारखीच पवित्र आहेत. कोणतेही उचललेत तरी चालेल. परंतु जे उचलाल त्याच्यासाठी सारे जीवन अर्पण करा. जेथे जाल तेथे ध्येय सांगाती असू दे. ध्येयासाठी म्हणूनच ध्येय शोधा. शेवटपर्यंत ध्येयाचा पिच्छा पुरवा. या जन्मात गाठ न पडली तर आणखी जन्म पडलेच आहेत. परंतु आणखी जन्म आहेत म्हणून हळूहळू रेंगाळत जावयाचे नाही. याचि जन्मी, याची डोळा ध्येयपांडुरंगाला भेटेन, असा निश्चय करून कष्टत राहिले पाहिजे. जे जे करावयाचे, त्यात तन, मन, धन ओतून करावयाचे. आता कातडी कुरवाळायची नाही, शरीराची पूजा करीत बसावयाचे नाही. तन, मन, धनाच्या पुष्पांनी आता ध्येयदेवाची पूजा बांधायची. सुखाला व विलासाला लाथाडून, स्वार्थाला काडी लावून, अहंकार धुऊन टाकून, जे उच्च ध्येय आपणाला बोलावीत आहे, त्याच्याकडे जाऊ या. ध्येय हातात पडेपर्यंत वाटेल ती किंमत देऊ, परंतु पुढेच जाऊ. प्राचीनकालांतील समाजनेते सांगत असत की, “जो ईश्वराला मिळवितो, तोच ब्राह्मण.” ह्यांतील अर्थ हाच की, जन्म कोठेही होवा, ती काही महत्त्वाची गोष्ट नाही. परमेश्वर सर्वत्र तितकाच जवळ आहे...... त्याला मिळव. परमेश्वर मिळविणे, ध्येय गाठणे ही गोष्ट कधीही डोळ्यांआड होऊ देऊ नको.

त्या त्या काळातील शिक्षणाला त्या त्या काळातील प्रश्न सोडवावयाचे असतात. त्या त्या काळातील ऋषींना त्या त्या काळात अनुरूप असा वेद द्यावा लागतो. अर्वाचीन ज्ञानासमोर अर्वाचीन प्रश्न आहेत. ह्या सर्व ज्ञानप्रांतात हिंदी माणसाने घुसले पाहिजे. अर्वाचीन जिज्ञासा त्याचीही झाली पाहिजे. मुलांमध्ये जिज्ञासा उत्पन्न केली की, शिक्षणाचे काम झाले असे म्हणतात. आपणांमध्ये अर्वाचीन ज्ञानासंबंधी अशी तहान उत्पन्न झाली पाहिजे. अशी तहान आपणास नाही का लागणार ? हिंदी लोकांच्या मेंदूने मोटारी व विमाने ह्यात सुधारणा करू नये की काय ? अशा कामाला आम्ही का नालायक आहोत ? असमर्थ आहोत ? आमची बुध्दी का येथे कुंठित होईल ? ती चालणारच नाही ? तसे असेल तर युरोपियनांच्या मेंदूपेक्षा आपला मेंदू हिणकस झाला म्हणावयाचा; त्याच्या बुध्दीपेक्षा आपली बुध्दी कमदर्जाची झाली म्हणावयाची !

जर युरोपियन लोकांच्या मांडीशी मांडी लावून बसण्याचा हक्क पाहिजे असेल तर तो सिध्द केला पाहिजे. खानावळी व हॉटेल काढण्याच्या महत्त्वाकांक्षा द्या फेकून; कारकून व नोकर होण्याच्या महत्त्वाकांक्षा-घाला त्या चुलीत. आपण शिकू व जगाला शिकवू, ही महत्त्वाकांक्षा बाळगा. मानवजातीला देण्यासाठी आपणही सत्य शोधून काढू. खेडयांतील लोकांपुढे येसफेस करून तेथे मिरवण्यासाठी; दोन पिसे लावून मोर होऊ पाहणार्‍या डोंबकावळ्याप्रमाणे उसन्या ऐटीने नाचण्यासाठी- आपले शिक्षण नाही. स्वत:ला आता सैल सोडू नका, स्वत:चे बिलकुल लाड नकोत, स्वत:शी आता निष्ठुर व्हा व स्वत:ला घासून घासून चांगली पाणीदार धार लावा. उच्च आकांक्षांसाठी स्वत:ला अहर्निश श्रमवा, झिजवा, कष्टवा. जो जो विषय हातात घ्याल, त्यात जाणण्यासारखे जोपर्यंत म्हणून काही शिल्लक आहे तोपर्यंत स्वस्थ बसू नका. तोपर्यत विश्रांती नाही. मरणानंतर आहेच विश्रांती. हे जग कर्मभूमी आहे. येथे विश्रांतीचे नाव काढू नका. तो तो विषय पुरा करा. सारे त्रिभुवन धुडाळा त्याच्यासाठी. मग तो विषय कोणताही असो. ग्रामसंघटना असो का खादीशास्त्र असो, समाजशास्त्र असो का अर्थशास्त्र असो. मजुरांच्या चळवळी असोत का धर्मसुधारणेच्या चळवळी असोत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel