भारतवर्ष आज संक्रमणावस्थेत आहे. अशा वेळी ‘कमळ फुलू दे, भ्रमर आपोआप येतील’ हे श्रीरामकृष्णांचे वाक्य जितके मार्गदर्शक महत्त्वाचे आहे, तितके दुसरे क्वचितच असेल. निराश झालेले कार्यकर्ते देशात सर्वत्र कामे करीत आहेत. कोणी चांगले मासिक काढण्यासाठी धडपडत आहे, कोणी नवीन धंदा करू पाहत आहे; कोणी आश्रम काढीत आहे, कोणी शाळा उघडीत आहे; कोणी शास्त्रसंशोधन करू बघत आहे, कोणी व्यायामप्रसार करू म्हणत आहे; प्रत्येकाच्या मार्गात दुर्गम व दुस्तर अशा अडचणी आहेत. वाटेतील विपत्ती पाहून, तसेच आजूबाजूचे औदासीन्य देखून कार्यकर्त्यांची कंबरच मोडून जाते, त्यांचा सारा धीरच खचतो. सहकार्याचा अभाव ही तर सर्वांचीच रड आहे. यशाची साधने नाहीत, सामग्री नाही- आणि यशासाठी सार्‍यांची धडपड तर चालली आहे.

अशा निराशेने घेरलेल्या आमच्या सर्व बंधुभगिनींस आम्ही म्हणू की, धीर सोडू नका. घाबरू नका. धुक्यामधून एकच पाऊल पुढे टाकण्याइतकी जागा दिसत असेल, तर एकच पाऊल टाका. ते टाकल्यावर पुढे आणखी दुसर्‍या पावलास जागा दिसेल. एक पाऊल नीट रोवले तरी पुष्कळ झाले. ‘एक डगलुं बस थाय’  आज एक पाऊल दृढ केले म्हणजे आजचे कार्य झाले. परंतु उद्या अपयश आले तर ? उद्याच्या पडण्याची आज कशाला फिकीर करतोस ? ‘आपण यशस्वी होऊ’ याच विचारात आजची रात्र घालव. तू आपल्या तोफखान्याजवळ गाडून उभा राहा. पळू नको, फसवू नको. ह्या जगात सर्व साधनसामग्री ज्यांच्या पायांजवळ लोळत आहे असा एखादाच हरीचा लाल असतो; असा एखादाच नेपोलियन असतो, की जे पाहिजे ते त्याच्या हाताशी आहे. आणि तरीही त्या नेपालियनला अनंत कष्ट करावे लागले, आल्प्स पर्वत ओलांडावे लागले. आपणा सर्वांजवळ एक भांडवल भरपूर दिलेले आहे. ते म्हणजे काम करण्याचे, भरपूर श्रम करण्याचे, अखंड, अविरत प्रयत्नाचे; आपले कमळ फुलविण्याचा सारखा प्रयत्न करा. स्वत:शी प्रामाणिक राहा.

आणि विसरू नका की, ते कमळ फुलले की भ्रमर गुंजारव करीत येणारच. त्यांना आमंत्रण देण्याची जरूरी नाही. कमळाला त्याची फिकीर नको. त्याची स्तुतिस्तोत्रे गावयास, त्याच्याभोवती रुंजी घालावयास, त्याला प्रदक्षिणा करावयास, त्याचा रस व गंध यांची चव घ्यावयास सहृदय व रसज्ञ भ्रमर आल्याशिवाय राहणार नाहीत. कमळाची केवढी आत्मनिरपेक्ष तपश्चर्या. कमळाला आज व उद्या माहीत नसते. काळवेळ सारे ते विसरून जाते. स्वत:च्या प्रयत्नात, स्वत:च्या साधनेत ते रंगलेले असते. कारण सकाळी आपल्या पाकळ्या पहिल्यानेच उघडल्या, त्याचेही त्याला स्मरण नसते. “अरे कमळा, किती रे सुंदर तू फुललास ! काय रमणीय या तुझ्या पाकळ्या!” अशी बातमी भ्रमरच त्याला येऊन देतात ! किंवा एखाद्या नवशिक्या पहिलवानाला आपणामध्ये ताकत येत आहे, चपळाई वाढत आहे, तोल सांभाळण्याची शक्ती येते आहे, कसब कळत आहे-हे काही माहीत नसते. परंतु एक दिवस उजाडतो की, मोठ्या प्रसिध्द पहिलवानाला तो चीत करतो. आपला विकास झाला आहे, हे त्या वेळेस त्याला कळून येते. तोपर्यंत आजचा डाव चांगला झाला; आजची पकड चांगली बसली होती, आजचा घाव वर्मी बसला, एवढेच तो म्हणत असे. आपणास आपल्या स्वीकृत कार्यात विजयदेव केव्हा व कोठे भेटेल याचा नेम नाही. पुढच्याच क्षणी कदाचित् तो भेटेल. काही असो. आपण काम करावे, आपल्या कार्यात सर्वस्व ओतावे, कर्मात आत्मा रंगवावा, कर्माच्या रणांगणावर अंगात चिलखत असता, हातात ढाल व भाला असता विजयदेवाची गाठ पडू दे- पलंगावर लोळत पडलेले असताना नको.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel