“सखाराम पत्र पाठवीत जा. तू पुढे काय करतोस ते कळवीत जा. येथे जडलेला संबंध कायम राहो. कधी कधी माणसे अकस्मात एकत्र येतात, परंतु ती जणू शतजन्मांची एकमेकांचीच असतात. एकमेकांना जणू धुंडीत येत असतात. परंतु त्यांना त्याची जाणीव नसते. तू का मला धुंडीत येत होतास? तुझे-माझे नाते का जडायचे होते? जन्मोजन्मीचे नाते का पुन्हा प्रकट व्हायचे होते? हा भावबंधनाचा खेळ सखारामच्या बुद्धीला समजू शका नाही? एखाद्याकडे एकदम अंत:करण धावते, एखाद्याबद्दल एकदम तिरस्कार वाटतो. का बरे असे होते? तुझा-माझा काय संबंध? परंतु तू आलास नि जणू माझा झालास; माझ्या हृदयात घुसलास. मी एकदम तुला तू म्हणून संबोधू लागलो. जणू परकेपणा नव्हेच. आणि असे नाते जोडून तू जात आहेस. का अकस्मात आलास नि का चाललास?”

घनाला पुढे बोलवेना.

सखारामने त्याचा हात हातांत घेतला.

“घना प्रभूचा काही हेतू असेल. या जगात हेतुहीन काहीच नसते. तुमच्या-आमच्या मर्यादित बुद्धीला पुष्कळ गोष्टी हेतुशून्य वाटतात. परंतु मोठ्या यंज्ञात लहानशा स्क्रूचेही स्थान असते, त्याचप्रमाणे लहानसान घटनांनाही विश्वाच्या योजनेत स्थान असते. पत्र पाठवीत जा. मी पत्ता कळवीनच. प्रकृतास जप. माझ्यासारखा फाजील चिकित्सक नको होऊ.”

घना आता खाली उतरला. घंटा झाली. निशाण दाखवले गेले. शिट्टी झाली. भग भग करीत गाडी निघाली. घना बघत होता. रुपल्या, गणा बघत होते. गेली गाडी! सखाराम तेथे शून्य दृष्टीने बघत होता. तो दु:खी होता. रुपल्या नि गणा गेले. घना एकटाच फिरत फिरत नदीतीरी गेला. तो विचारात मग्न होता. सखाराम गेला मी का जाऊ नये, असा प्रश्न त्याच्या डोळ्यांसमोर होता. परंतु तो कोठे जाणार? किती तरी वेळ तो नदीकाठी बसला होता. इतक्यात कोणीतरी नदीमधून जात असताना पडले. तो एक म्हातारा होता. घना धावला. त्याने त्या म्हाता-याला उठवले. त्याच्या डोक्यालरचे सामान पाण्यात पडले होते. त्याने ते उचलून घेतले.

“भिजले असेल.” म्हातारा म्हणाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel