कामगारांचा प्रश्न हा तुम्हा सर्वांचा आहे. समजा, कामगार संपावर गेले तर तुमचा सारा व्यवहार बंद होतो. हॉटेल, पानपट्टीची दुकाने, सिनेमा, किराणा दुकानदार,--सर्वांची विक्री बंद होते. शरीरात कुठेही बिघाड झाला तरी सारे शरीर विकल होते. तुमचे हे समाजशरीर आहे. तुका म्हणे एक देहाचे अवयव—तुम्ही अलग नाही आहात. म्हणून तुम्ही या संपास पाठिंबा द्या. मदत करा. मी आशेने आहे. परंतु सारे कामगारांनीच ठरवायचे आहे. मी कोण? तुम्ही माझे मानता, तोवर मी आहे. मी लादालादी करणार नाही. समजावून सांगणे ही माझी वृत्ती. तुम्हाला संप हवा का? न्यायासाठी लढणार का? जय का पराजय हा सवाल नाही; परंतु आपण न्यायासाठी धडपडलेच पाहिजे. सांगा, तुम्हाला संप हवा? (हो, हो!). ‘हात वर करा.’ (हजारो हात वर होतात.) संप कोणाला नको आहे त्यांना हात वर करावेत. (हात वर होत नाहीत.) मघाचे विरोधक का निघून गेले? का तेही इतरांबरोबर येणार आहेत? काही असो, तुम्ही सर्वांनी हा निर्णय घेतला आहे. संपाला मदत हवी. तुम्ही फंडासाठी मदत द्या. सभेनंतर येथे पैसे टाकून जा. सारे काम व्यवस्थित होईल. संपाच्या काळात ज्यांच्या घरी ख-या अडचणी असतील त्यांनी मदत मागावी. लहान मुलांना दूध वाटण्यात येईल. जसजसा संप चालेल तसतशा अडचणी येतील. धान्य उधार मिळेनासे होईल. आम्ही खेड्यापाड्यांतून जे मिळेल ते वाटू. डाळे-मुरमुरे वाटू. तुम्ही निर्धाराने रहा. मी अधिक काय सांगू? जय हिन्द!”

सभेच्या ठिकाणी पाच हजार रुपये जमले. गावातील मंडळींनाही मदत दिली. पार्वतीच्या त्या दिवशीच्या मुदीचा-आंगठीचा लिलाव करण्यात आला. संस्कृती-मंदिरातील एका प्राध्यापकाने ती मुदी दोनशे रुपयांस घेतली. त्या प्राध्यापकाला तिकडे त्या दगडी इमारतीत संस्कृती जणू भेटली नाही; --त्याला या कामगारांत संस्कृती दिसली. ‘तुम्ही थोडे बोला’ लोक त्यांना म्हणाले. शेवटी ते उभे राहिले व हिंदीत बोलले. त्यांच्या बोलण्याचा सारांश असा की, ‘संस्कृती तुम्हीच जगाला द्याल. सकल मानवांची अशी संस्कृती आहे कोठे? श्रमणा-याला विश्रांती मिळेल, फुरसतीचा वेळ मिळेल, तेव्हा ना संस्कृतिसंवर्धन तो करणार? राजाजी परवा कोठे म्हणाले, “समाजवादी लोकांना काम नको. यांचेही गादीवर लोळण्याचे ध्येय आहे.’ राजाजींसारखी माणसे असा अपप्रचार का करतात? समाजवादी श्रमाला पवित्र मानतात. परंतु श्रमणा-याला काही तास मोकळीक मिळाली तर जीवनाचे इतर आनंद तो मिळवील. तो ता-यांचा अभ्यास करील, फुलांचा करील. तो संगीत शिकेल. तो चित्रकला शिकेल. तो शास्त्रज्ञ होईल. राजाजींच्या मताचे लोक का चोवीस तास धुळीत काम करत आहेत? वाटेल ते हे लोक बोलतात तरी कसे? असे गैरसमज पसरवण्याचे यांना धैर्य तरी कसे होते? श्रमणारे लोकच समाजवाद चाहतात. ते आळशी बनू इच्छित नाहीत; तर जीवनाच्या विकासासाठी, संस्कृति-संवर्धनात आपणासही भर घालती यावी म्हणून थोडी विश्रांती मागतात. ती खरी अखिल मानवी संस्कृती होईल. श्रमणारेच खरा धर्म देतील, खरी संस्कृती देतील. मानवता, समता, न्याय यांची स्थापना करतील. तुमचा विजय असो.”

सभा संपली. घनाच्या खोलीत काही कार्यकर्ते बराच वेळ सारे ठरवीत होते. सखारामच्या येण्याची सारे वाट पाहात होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel