मी तेव्हा मुंबईस होतो. आणि ते उन्हाळ्याचे दिवस. रात्रभर मला झोप आली नव्हती. जेथे राहत होतो तेथे ना वारा ना काही. मुंबईत राहणे महाकर्म कठीण असे वाटले. मला नेहमी उघड्यावर राहावयाची सवय. परंतु मुंबईत मी उघड्यावर कोठे झोपणार ? परंतु मी जथे होतो. तेथे झोपायला जागा तरी होती. माझ्यासमोर ती लाखो माणसे आली, जी एकेका खोलीत डझनावेरी राहतात. त्यांची काय दशा असेल ? फुटपाथवर ती झोपतात. परंतु पावसाळ्यात काय करीत असतील ? कधी त्यांना राहायला नीट चाळी मिळतील ? रात्रभर या विचारातच मी होतो. पहाटे जरा डोळा लागला. परंतु लवकर उठलो. एका मित्राला अगदी उजाडत भेटायला जायचे होते. उठणे भाग होते आणि चाळीतील हालचालींमुळेही लागलेला डोळा लगेच उघडला. शहरात केव्हाच रहदारी सुरु होती. बाराएकला मिलमधील कामगार सुटतात. शेवटची ट्रॅम मुंबईला एक वाजता परतते. ती दोन-तीन तासांनी पुन्हा सुरु. लोकल गाड्या तीनपासून पुन्हा सुरु. दूधवाले भय्ये तीनसाडेतीनपासून स्टेशनांवरुन दिसू लागतात. आणि पाण्याचे होते तेव्हा दुर्भिक्ष्य. उन्हाळ्यामुळे पाणी कमी. पहाटे तीनसाडेतीन पासूनच मायबहिणी उठायच्या. नळावर भांड्यांचे आवाज. धुण्यांचे आवाज. परीक्षा जवळ आल्या होत्या. मुलेही लवकर उठून वाचू लागली होती. मी तेथे गॅलरीत कसा झोपणार ? सर्वत्र कर्ममय जागृतू असता मी का लोळत राहू ? मीही उठलो. थोड्या वेळाने मित्राची भेट घ्यायला बाहेर पडलो.

मला ग्रॅंटरोडच्या बाजूला जायचे होते. दादरला गाडीत बसलो. वसईहून आलेली मंडळी अजून बाकांवर झोपलेली होती. लोक त्यांना उठवीत होते. ते जांभया देत उठत होते. मी बाजूला बसलो. काय हे जीवन, असे मनात येई. कृत्रिम, अनैसर्गिक जीवन. दूधवाले भय्ये केव्हा उठत असतील ? ते कष्ट त्यांनीच काढावे. आणि दिवसा तेथेच गुरांजवळ चा-यावर झोपताना मी त्यांना पाहिले आहे. त्यांना कोणी उठवू लागले म्हणजे वाईट वाटे. परंतु सर्वांचीच धावपळ. कोणी कोणास दोष द्यावा ?

ग्रॅंटरोड आले. मी पटकन उतरलो. आता चांगले उजाडले होते. मी झपझप चाललो होतो. तो एक कुरुप दृश्य मला दिसले. मी काय पाहिले ? झाडूवाले लांब केरसुण्यांनी कचरा गोळा करीत होते. झाडूवाल्या मायबहिणी गोळा केलेला कचरा टोपल्यांनी एकत्र करीत होत्या. वास्तविक ठायीठायी खांबांना कचरापेट्या आहेत. परंतु त्यात कपटे. कचरा, साले टाकायची आपल्या लोकांस अजून सवय नाही. सुशिक्षीत माणसेही खिडकीतून खाली साली फेकतात, फुटलेल्या काचा खळकन् फेकतात. सार्वजनिक नीतीचा सद्गुणच नाही. आगगाडीत तेथेच शेंगा खाऊन साले टाकतील. संत्री खाऊन घाण करतील. तेथेच थुंकतील. सिगरेटची थोटके टाकतील. खिशांतील कागद फाडून फेकतील. स्वच्छ डबा घाण करुन ठेवतात. आणि रस्त्यावरची घाण तर विचारुच नका. सार्वजनिक स्वच्छता हे राष्ट्र कधी शिकणार ?

उन्हाळ्याचे दिवस खानदेशातील फळांची मला आठवण येई. तिकडील नद्यांच्या पात्रांत उन्हाळ्याची फळे अपार होतात. टरबुजे, खरबुजे, साखरपेट्या, गुळभेल्या, नाना फळे. मुंबईलाही ती येतात. कलिंगडाच्या राशी मुंबईत ठायीठायी दिसत. फुटपाथवर कलिंगडवाले बसतात. खांपी करुन ठेवलेल्या, येणारे-जाणारे घेत आहेत. खाऊन साली फेकीत आहेत. असे सकाळपासून शेवटचा सिनेमा सुटेपर्यंत चालायचेच. तो लाल थंडगार गर ! कलिंगडे कापून देणारे जवळ एक भांडे ठेवतात, त्यात कापताना पडणारा रस साठवतात. ते सरही कोणी रसिक पितात ! लालसर सुंदर रस. कलिंगड अद्भुत वस्तू. फुलेफळे ही एक थोर सृष्टी आहे. कलिंगडाचा तो लाल रंग किती सुंदर दिसतो ! आणि मधून डोकावणा-या त्या काळ्या बिया. त्या वाळूतून एवढी माधुरी प्रकट होते. हे रंग, हे रस नद्यांच्या वाळवंटांतून मिळतात. गंमत वाटते नेहमी मला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel