जरी या तडजोडीमुळें रोमन लोकांचीं आपसांतील भांडणें तात्पुरतीं मिटलीं तरी भांडणांचे व द्वेष-मत्सरांचे वणवे पुन: पुन: पेटतच.  असंतुष्ट लोकांचीं दु:खें, अति महत्त्वाकांक्षी लोकांच्या परस्परविरोधी महत्त्वाकांक्षा वगैरेमुळें रोम शहर म्हणजे जणूं खाटिकखानाच बने !  पण दरवाजाच्या आंत जरी ते आपसात लढत असले तरी बाहेर मात्र ते रोमची सत्ता वाढवीतच राहिले.

टायबर नदीच्या उत्तरेकडील जाती-जमाती रोमनांच्या ताब्यांत प्रथम आल्या.  नंतर दक्षिणेकडील मॅग्ना-ग्रीशियांत वसाहत केलेल्या लोकांस रोमनांच्या पोलादी मुठीचें बक्षीस मिळालें.  या वसाहती ग्रीकांनीं वसविल्या होत्या हें मॅग्ना-ग्रीशिया या नांवावरूनच दिसून येत आहे.  रोमनांनीं त्यांना शस्त्रास्त्रांनीं जिंकलें तर उलट ग्रीकांनीं त्यांना—आपल्या लष्करी जेत्यांना—स्वत:च्या उच्च संस्कृतीनें जिंकलें.  रोमनांनीं ग्रीकांचें संगीत घेतलें, त्यांचें काव्य उचललें, त्यांचें तत्त्वज्ञान, त्यांच्या देवदेवता सारें घेतलें ; पण त्याचा त्यांना नीट उपयोग मात्र करून घेतां आला नाहीं.  हंसणारे-खेळणारे थोर ग्रीक आदर्श घेऊन त्यांतून त्यांनीं उग्र व भीषण चेहर्‍यांचे व नेहमीं खिन्न आणि रुष्ट असणारे प्रकार बनविले.  रोमन लोक जेव्हां ग्रीकांचें अनुकरण करीत, तेव्हां एकादा हत्ती एकाद्या सुंदर नृत्यकुशलाचें अनुकरण करीत आहे असें वाटे.

पण झगड्यावांचून मात्र ग्रीक वसाहती रोमनांना शरण गेल्या नाहींत.  ग्रीकांनीं एपिरसचा राजा पिर्‍हस याला मदतीस बोलाविलें.  एपिरस देश म्हणजे अलेक्झांडरच्या आईंचें माहेर.  राजा पिर्‍हस याला आपण दुसरे अलेक्झांडर होणार असें वाटे.  आपण रोमन लोकांची चटणी उडवून पुढें कार्थेजियनांसहि जिंकावें व सारें जग जिंकून घेण्यास अशा रीतीनें आरंभ करावा असे विचार त्याच्या मनांत आले.

पिर्‍हसच्या स्वारीचा धोका समोर असल्यामुळें रोमनांनीं व कार्थेजियनांनीं एक होऊन परस्पर-संरक्षक करार केला.  रोम व कार्थेज हीं दोन्ही समोरासमोरची शहरें भूमध्यसमुद्रावरून परस्परांकडे मत्सरानें पाहत असत.  त्यांना एकमेकांचें वैषम्य वाटे.  आफ्रिकेच्या खांद्यावर बसलेलें वैभवोन्मत्त कार्थेज शहर सार्‍या जगाचें आव्हान स्वीकारावयास तयार होतें ; इटली ताब्यांत घेणारें रोमहि स्वत:च्या महत्त्वाकांक्षांचें क्षितिज वाढवूं लागलें होतें.  या दोघांच्या दरम्यान समृध्द व संपन्न सिसिली बेट होतें.  दोघांच्याहि बुभुक्षित जिभांना सिसिली पाहून पाणी सुटत होतें.  सिसिलीचा कबजा कोणीं घ्यावयाचा या प्रश्नावर आज ना उद्यां त्यांची जुंपणारच होती.  पण पिर्‍हसनें जेव्हां मॅग्ना-ग्रीशियावर स्वारी केली तेव्हां परस्परस्पर्धालु रोमन व कार्थेजियन लोक आपसांतील भांडणे तात्पुरतीं विसरून समान शत्रूशीं लढण्यासाठीं एक होऊन एका झेंड्याखालीं जमले.  त्यांनीं आपसांतील मतभेद पुढें मिटवावयाचें असें ठरविलें.

फारशी अडचण न पडतांच रोमला पिर्‍हसवर विजय मिळाला व नंतर रोमनें कार्थेजकडे नजर वळविली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel