''आजकाल जगात लाठीला प्रतिष्ठा मिळाली आहे. परंतु लाठीला प्रतिष्ठा म्हणजे माणसाची अप्रतिष्ठा. माझ्या पाठीमागं किती लाठीवाले आहेत, किती बंदूकवाले आहेत; यांजवर जर माझी किंमत अवलंबून असेल तर ती किंमत माझी नसून त्या लाठयांची; त्या बंदुकांची ती किंमत आहे. माझ्याजवळ धन असेल तर मला मान. लाठी असेल तर मला मान. अभिजात रक्त असेल तर मला मान, हे सारे मान वास्तविक माझ्या माणुसकीचे नाहीत. माझी माणुसकी, माझा विशाल आत्मा, यांना स्वयंभू तेज आहे की नाही? माझ्या आत्म्याची निष्पाप शक्ती जगाच्या सार्‍या या बाह्य शक्तीसमोर उभी करणं, म्हणजे 'क्रांती'. तलवारीच्या बळावर मोठया झालेल्या अलेक्झांडरसमोर जागृत आत्मशक्तीचा एक संन्यासी निःशंकपणे उभा राहिला. अलेक्झांडरने तलवार उपसली तर तो हसला. अलेक्झांडरने त्याला मारलेही असते. म्हणून का तो अलेक्झांडरचा विजय होता? मरायचं तर आहेच. परंतु माणुसकीच्या ध्येयासाठी मरणं ते खरं मरणं. माणसाच्या आत्म्याची प्रतिष्ठा स्थापण्यासाठी मरणं तेच खरं मरणं.''

''अशी क्रांती आज हिंदुस्थानात होत आहे. साम्यवादी बंधूंनी धनाची प्रतिष्ठा, पोपटपंचीची प्रतिष्ठा, बुवाशाहीची प्रतिष्ठा, खोटा जात्याभिमान व कुलाभिमानाची प्रतिष्ठा दूर केली. परंतु सोटोबाची प्रतिष्ठा त्यांनी अद्याप निरुपाय म्हणून राखली आहे. महात्माजींनी सोटोबाजीचीही खोटी प्रतिष्ठा दूर करून तेथे आत्म्याची निष्पाप शक्ती उभी केली आहे. माणसानं लाठीनं मोठं होण्याऐवजी निर्भय व निर्मळ आत्मशक्तीनं मोठं व्हावं असं ते जगासं कृतीनं सांगत आहेत. भारतात सर्वांगपूर्ण क्रांती होत आहे.''

मुलांना एखादा प्रश्न यावा व त्याच्यावरच तास संपून जावा असे कितीदा तरी होई. मुकुंदरावांच्या घरी विद्यार्थी जायचे. त्यांना प्रश्न विचारून ज्ञान मिळवायचे. गाईला ढुशी मारणार्‍या वासराला अधिकच पान्हा मिळतो, त्याप्रमाणे अशा मुलांना अधिकच ज्ञानरस मिळे. शाळेत एक प्रकारचे चैतन्य दिसू लागले. मुलांमध्ये नवीन जीवनाच्या चर्चा होऊ लागल्या. बुध्दीला चालना मिळाली.

मुकुंदराव दयारामच्या आश्रमात जात. रविवार आला ते सोनखेडीत जायचे. बरोबर मुले असायची. तेथे बरीच खादी शिल्लक पडलेली होती, ती पाहून मुकुंदरावांना वाईट वाटे. परंतु ते एकटे काय करणार? वर्गात मुलांना नेहमी खादी घेण्यास ते सांगत असत.

त्या दिवशी ललितमोहन नवे विलायती धोतर नेसून आला होता. मुकुंदरावांनी ते पाहिले. त्यांना ती गोष्ट सहन झाली नाही. ते म्हणाले,

''ललितमोहन, मी इतकं सांगतो तरी तू आज नवीन विलायती धोतर घेतलंसच. तू स्वतःची बुध्दी वीक असं नाही म्हणत. तू माझा गुलाम नको होऊ. परंतु, त्या सोनखेडीला जाऊन बघशील तर तुझा भ्रम नष्ट होईल. तेथे बायामाणसं सूत घेऊन येतात; आणा-दोन आणे मिळतात, त्या वेळेस त्यांना केवढा आधार वाटतो ! या देशात चार कोट लोक बेकार आहेत. कोणता देणार त्यांना धंदा? उद्या, स्वराज्यात तरी कोणता देणार? इंग्लंडचा माल खपायला सारी दुनिया आहे, तरी तेथे लाखो बेकार आहेत. आपणास स्वराज्यातही खादीशिवाय तरणोपाय नाही. बेकारीवर उपाय नाही. स्वराज्य दूर राहो. वाटलं तर त्या वेळेस गिरण्या काढा. परंतु आज या उपाशी बंधूंना जगवलं पाहिजे. त्यांना घास दिला पाहिजे. ललितमोहन, नको करू असं पाप पुन्हा.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel