ते बिहार व ओरिसा प्रांतात फिरले. जागृत किसानांच्या प्रचंड सभा त्यांनी पाहिल्या. सभेत आले म्हणजे पाव-पाव आणा, अर्धा-अर्धा अणा तेथे मदत म्हणून हजारो किसानांना देत. किसान-संघटनेस मदत हाच त्यांचा दानधर्म, ही त्यांची कीर्तने, हे त्यांचे सप्ताह.

''हे काय फाटकं पत्र वाचता?'' एका खेडेगावात मुकुंदरावांनी विचारले.

''हा आमचा किसानांचा वेद. हे वर्तमानपत्र आहे. त्यातील अक्षर कळतं आहे तोपर्यंत आम्ही वाचू. उरेल तुकडा तो दुसर्‍यास देऊ. एकेक पत्र हजारोंच्या हातून जातं.'' शेतकरी म्हणाला.

''तुमच्या येथे किसानसंघ आहे का?'' मुकुंदरावांनी विचारले.

''हो. हे पहा आमच्या किसानसंघाचे चिटणीस, हे हरिजन आहेत. परंतु शिकलेले आहेत, तेच केले चिटणीस.'' एकाने सांगितले.

''तुम्ही स्पृश्यास्पृश्यता नाही मानीत?'' मुकुंदरावांनी विचारले.

''श्रीमंत गरिबाला अस्पृश्य मानतो. ती एक अस्पृश्यता आम्हाला माहीत आहे. इतर शिवाशिवीची अस्पृश्यता गाडून टाकली. सारी दुःखी व पिडलेली जनता एक.'' एका शेतकर्‍याने सांगितले.

''आमच्या महाराष्ट्रातील शेतकरी तर हरिजनांना दूर ठेवतात.'' मुकुंदराव म्हणाले.

''मग तेथील किसानांचं दुःख कसं दूर होणार? जो दुसर्‍याचा अपमान करतो, दुसर्‍याचं दुःख दूर करीत नाही, त्याचा कसा उध्दार होणार? महाराष्ट्रातील किसानांना आमचा संदेश सांगा की, 'त्या खोटया धर्माला तिलांजली द्या. श्रमणारे सारे एक व्हा, हृदयाशी हृदय जोडा.'' कळकळीने एक किसान म्हणाला.

''तुमच्या महाराष्ट्रात किसानांची सुस्थिती आहे ना?'' एकाने प्रश्न केला.

''नाही. तेथेही सावकाराचे साप किसानाला विळखे देऊन बसले आहेत. शेतकरी पिकवील ते सारे जात आहे. त्यांची दैना आहे.'' मुकुंदराव म्हणाले.

''मग ते उठत का नाहीत?''

''त्यांना कोणी उठवत नाही.''

''तुम्ही उठवा, पेटवा त्यांना.''

''होय. तेच आता काम. त्यासाठीच ही यात्रा मी करीत आहे. आज तुमच्या  गावची यात्रा झाली. स्फूर्ती मिळाली. जातो मी.'' मुकुंदराव म्हणाले.
इतक्यात तेथे पार्वती आली. तिने मुकुंदरावांना फुलांचा हार घातला.

''मागे आम्ही किसानांनी सत्याग्रह केला. या पार्वतीचा पती गोळीबारात मेला, परंतु ती रडत बसली नाही. शेकडो किसान स्त्रिया तिने उठवल्या, पतीचं रक्त तिनं कपाळी लावलं. शूर आहे ही भगिनी. तिनं 'किसान नारीमंडळ' चालवलं आहे.'' एका बंधूने ओळख करून दिली.

मुकुंदरावांनी लवून त्या भगिनीला प्रणाम केला. ''महाराष्ट्रातील किसान नारीस जागृत होण्यास सांगा. नारीची शक्ती जागृत होईल, तेव्हाच क्रांती होईल. त्या खर्‍या माता असतील तर मुलाबाळांना पोटभर खायला मिळावं, राहायला घरदार मिळावं, ज्ञान मिळावं म्हणून त्या क्रांती करायला उठतील, पतींना बरोबर घेतील. रूढी तुडवून, हालअपेष्टा सोसून, उज्ज्वल भविष्यकाळासाठी उभ्या राहतील, ही घ्या लाल कुंकवाची डबी. या कुंकवात पतीचे लाल रक्त मी मिसळलं आहे. मी ते रोज कपाळी लागते. मी विधवा नाही. माझे सौभाग्य अमर आहे. ही डबी महाराष्ट्रात न्या. तेथील किसान नारींच्या कपाळी यातील लाल कुंकू लावा. सांगा की, बिहारमधील सतीची ही भेट आहे.'' पार्वती म्हणाली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel