''हुंडयाचे बंड नको, पैसे फार असतील तर आमच्या आश्रमाला द्या.'' माया हसून म्हणाली.

''महाराष्ट्रातील व्यवहार एवढयात शिकलीस वाटतं?'' प्रद्योतनं विचारले.

''मग कोणती अट?'' आनंदमोहन पुन्हा म्हणाले.

''सांगू? रागावणार नाही ना?'' मायेने विचारले.

''मी घरच्यांवर रागावतो; दारच्यांवर रागावत नाही.'' ते म्हणाले.

''मी तुम्हांला क्रांतिकारक बनायला सांगणार आहे.'' माया म्हणाली.

''माझी नोकरी टिकेल?''

''हो. टिकेल.''

''अशी कोणती बुवा क्रांति?''

''स्वतःच्या जीवनातील. आनंदबाबू, मृणालिनी मजजवळ मोकळेपणानं बोलायची. तुम्ही घरी कसे वागता ते सांगायची. तुम्ही पत्नीला मारता, वाटेल तसं बोलता. जणू पत्नी म्हणजे मोलकरीण. मो लकरणीलाही स्वाभिमान असतो. तुम्ही स्वतःच्या मुलांनाही फार मारता, हे सारं बदला. घरी पोलीस नका बनू.'' 'तडाखे पाहिजेत, फटके पाहिजेत' हे नेहमी तुमच्या तोंडी शब्द. तुम्ही आलेत घरात की सारे चूपचाप, जणू वाघच घरात आला ! तुम्हाला वाघ मानावं यात का तुमचा मोठेपणा आहे? तुमची मुलं तुमच्याजवळ प्रेमानं बोलू शकत नाहीत, बसू शकत नाहीत, हसू शकत नाहीत. तुमची पत्नी तुमच्यासमोर थरथरत उभी राहते. यात का मोठेपणा आहे? मृणालिनी या गोष्टी सांगताना रडे. मलाही वाईट वाटे. हा क्रांतीचा काळ आहे. सर्व प्रकारची गुलामगिरी नष्ट करावयाची आहे. परकीय सत्तेचे तुरुंग व घरचे तुरुंग सारे फोडून टाकावयाचे आहेत. माणुसकीचा प्रेमळ प्रकाश सर्वत्र पसरावयाचा आहे. आनंदबाबू, रागावू नका. मी तुमच्या मुलीसारखी, तुमच्या मुलांच्या वतीने, तुमच्या पत्नीच्या वतीने, बहिणीच्या वतीने अशा या क्रांतीची भिक्षा तुमच्याजवळ मी मागत आहे. ती भिक्षा घाला म्हणजे प्रद्योतची भिक्षा मी तुम्हाला घालते.'' माया कळकळीन बोलली.

सारे वातावरण गंभीर होते.

''माये, तू माझी गुरू आहेस. मी सुशिक्षित असून पशू होतो. दारच्याजवळ गोड, घरच्याजवळ कडू. बाहेरच्यांना हसवीत असे, घरच्यांना रडवीत असे. साहेबाजवळ कुत्रा व घरच्याजवळ वाघ. माये अतःपर मी निराळा होईन. प्रद्योतमध्ये तू क्रांती केलीस, या आनंदमोहनातही केलीस. तुझ्यासारखी मैत्रीण मृणालिनीला मिळाली. तिचं भाग्य. आता प्रद्योतही तिला मिळणार हे आणखी भाग्य.'' आनंदमोहन सद्गदित होऊन म्हणाले.

''माये, परंतु माझ्या लग्नाला तू आली पाहिजेस. तू तुझ्या लग्नाला कोणाला बोलावलं नाहीस. मी सर्वांना बोलावणार. रामदास, तुम्हीही या. माझे बाबा सर्वांना बोलावतील.'' प्रद्योत म्हणाला.

''मायेला आताच बरोबर नेलं म्हणून काय झालं? प्रदयेतचं येत्या मार्गशीर्षात लग्न कर. मायेला दिवसही गेले आहेत., पहिलं बाळंतपण घरी माहेरी होईल. बाळबाळंतीण मग परत येतील.'' रमेशबाबू म्हणाले.

''काय माये, तुझी इच्छा प्रमाण.'' रामदास म्हणाला.

"तुमची इच्छा प्रमाण.'' ती म्हणाली.

''वडिलांची इच्छा प्रमाण.'' प्रद्योत म्हणाला.

मायेने जावे असे ठरले. भावाला घेऊन बहीण बंगालमध्ये गेली. सर्वांना आनंद झाला. परंतु कामगारांच्या संपाचे काय? त्यांची उपासमारीतून सुटका झाली का?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel