“थोबाड फोडीन बुढ्ढ्या. मी का तुझे पैसे चोरले? संध्याकाळपासून मी इथं आहे आणि तुझे पैसे तर आता गेले. वा रे वा! कधी थट्टेत बोललो असेन तर त्यासाठी का माझ्यावर आळ घेतोस?” भिकू रागाने म्हणाला.

“हे पाहा मनू, असं उगाच कोणाचं नाव घेऊ नकोस. भिकू प्रामाणिक आहे. आज किती वर्ष ह्या बड्या वाड्यात तो काम करीत आहे. परंतु त्यानं कधीही कशाला हात लावला नाही.” प्रमुख म्हणाला.

“भिकू, मला क्षमा कर. परंतु माझं सोनं? कोणी नेलं माझं सोनं? शोधा हो तुम्ही. पंधरा वर्षांची सारी कमाई गेली. अरेरे! आता कसा जगू? कसा राहू? जा, कोणी शोधा.” तो काकुळतीने म्हणाला.

काही लोक कंदील घेऊन गेले. कोणी हातांत काठ्या घेतल्या. कोणी या बाजूला गेले, कोणी त्या. परंतु चोर सापडला नाही. लोक घरोघर झोपले होते. हवेत गारठा होता. संशोधन करणारी मंडळी परत आली.

“सापडलं का सोनं? माझं सानं?” मनूने विचारले.

“चोराचा पत्ता नाही. सर्वत्र शोधलं. जिकडे तिकडे चिखल झाला आहे. नद्यानाल्यांना पूर आले आहेत. शक्य तो प्रयत्न केला. मनू, झालं ते झालं. असेल आपलं तर परत मिळेल.” तो प्रमुख म्हणाला.

“माझंच होतं. माझ्या श्रमाचं होतं. सारखं मी काम करीत असे. कधी विश्रांती घेतली नाही.” मनू रडत म्हणाला.

“जा आता घरी. काळजी करून काय होणार?” प्रमुख म्हणाला.

मनू आपल्या झोपडीत गेला. तो तेथे बसून राहिला. शून्य दृष्टीने तो सर्वत्र पाहात होता. हळूहळू त्याचे दोळे मिटले. पहाटे त्याला झोप लागली.

सकाळी सर्व गावात चोरीची वार्ता पसरली. सारा गाव मनूच्या झोपडीपाशी जमा झाला. जो तो हळहळत होता. प्रत्येकाला वाईट वाटत होते. मनू खिन्न होऊन बसला होता. त्याचे आधीच खोल गेलेले डोळे एका रात्रीत आणखी खोल गेले. त्याच्या तोंडावर प्रेतकळा आली होती. एक शब्दही त्याला बोलवेना.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel