"जो गृहस्थ असतो त्याने दक्षिणा घ्यावयाची नसते, दक्षिणा भिक्षुक ब्राह्मणाला घेण्याचा अधिकार. कारण त्याला इतर उत्पन्न नसते व वेदविद्येशिवाय इतर धंदा नसतो. म्हणून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी, असे सांगितले आहे. इतर देशांतही उपाध्याय आहेत; इतर धर्मांतही ते आहेत. काही ठिकाणी त्यांना सरकारातूनच पगार मिळतो; आपल्याकडे समाजच ब्राह्मणाला देई.' श्यामने आरंभ केला.

'आमच्या गावात एकदा एके ठिकाणी लग्न होते. शेवंतीवाङनिश्चय जेव्हा करितात, तेव्हा उभय मंडळपात-वधूवर मंडपात-दक्षिणा वाटतात. आपल्या ऐपतीप्रमाणे ही दक्षिणा देतात. वधूघरचा एक उपाध्याय व वराघरचा एक उपाध्याय असे दोघे बरोबर दक्षिणा देत मंडपात हिंडतात. जितकी वराकडची तितकीच वधूकडची. वराकडच्यांनी चार चार आणे दिले, तर वधूपक्षही चार चार आणे देतो. जो हात पुढे करील, त्याला दक्षिणा देण्यात येत असते. लग्नाला जेव्हा मंडळी जाते, तेव्हा मुले आपापल्या वडील मंडळीजवळच बसलेली असली, तर हे शिक्षण आपोआपच त्यांना मिळते. 'अरे, आपण नाही हो हात पुढे करावयाचा' वगैरे ते मुलांना सांगतात.

परंतु अलीकडे स्वाभिमानच उरला नाही. पैशासाठी आपण हपापलेले आहोत. फुकट मिळेल, तेवढे घ्यावे. अशी वृत्ती झाली आहे. आगगाडीतून जपानी एजंट सिगारेट वगैरे फुकट वाटतात व श्रीमंतही त्या फुकट सिगारेट घेऊन ओढताना मी पाहिलेले आहेत. श्रीमंतसुध्दा मोफत दवाखान्यात जाऊन औषध घेतील. श्रीमंतांची मुलेसुध्दा नादारीसाठी अर्ज करतील. दारिद्रयाचा व दास्याचा हा परिणाम आहे.

मी लग्नाला गेलो व मुलांमध्ये जाऊन बसलो. शाळेतील बरोबरीची आम्ही मुले एकत्र बसलो होतो. एका बाजूने बसले, म्हणून खोडया करता येतात, टवाळकी करता येते. कोणाच्या टोपीवर नारळाची शेंडी ठेवा, कोणाच्या खिशात खडे टाक, कोणाला हळूच चिमटा घे, असे चालते. दक्षिणा वाटण्यात आली. काही मुलांनी हात पुढे केले. मीही माझा हात पुढे केला. सहज गोष्ट होऊन गेली. माझ्या लक्षात चूक आली नाही. लहानपणी पैसे हातात असले म्हणजे आनंद होतो. मी ते दोन-आणे घेऊन घरी आलो व मोठया हर्षाने आईजवळ द्यावयास गेलो. जणू माझ्या कमाईचे, माझ्या श्रमाचेच ते होते! भटजी बाराबारा वर्षे मंत्र शिकतात, ते विधी करितात, तर त्यांना घेऊ दे. मला ते दोन आणे घेण्याचा काय अधिकार? प्रत्येकाने श्रमावे व मोबदला घ्यावा, तरच ते शोभून दिसते.

आईने विचारले, 'कोठले रे पैसे?' मी म्हटले. 'शेवंतीवाड्.निश्चयाचे लग्नात मिळाले.' आई एकदम ओशाळली. तिचे तोंड म्लान झाले. आम्ही गरीब झालो होतो. आपण गरीब, म्हणून मुलाने दक्षिणा आणली का? का आपण गरीब झालो, म्हणून कीव येऊन भिक्षुकाने आपल्या मुलाच्या हातावर पैसे ठेवले? कारण एखाद्या घरंदाज घराण्यातील मुलाने हात पुढे केला, तर भिक्षुक आपण होऊनच त्या मुलाला म्हणे, 'वेडया! तू का हात पुढे करावयाचा? तू त्या डोंग-यांकडचा ना? माझ्या मुलाला भिक्षुक असे का म्हटले नाहीत? त्यांना आमची कीव आली. जगात दुसर्‍याने आपली कीव करावी याहून करुणास्पद व दु:खप्रद दुसरी कोणती गोष्ट आहे? आईच्या मनात असे शेकडो विचार त्या वेळी आले ती बोलेना. शून्य दृष्टीने पाहत राहिली.

'आई, घे ना ग पैसे. मी काही चोरून नाही हो आणले,' मी काकुळतीस येऊन म्हटले.

आई म्हणाली, 'श्याम! आपण गरीब असलो, तरी गृहस्थ आहोत. आपण भिक्षुक नाही. भिक्षुकीचा धंदा आपला नाही. आपण दक्षिणा घ्यायची नसते, ते आपले काम नाही. आपण दुस-याला द्यावी. भटजी वेद शिकतात, धार्मिक कामे करतात, त्यांना शेतभात नसते, ही दक्षिणा हेच त्यांचे उत्पन्न.'

मी म्हटले, 'आपल्या गावातील ते पांडूभटजी किती श्रीमंत आहेत! त्यांनी तरी दक्षिणा घ्यावी का? सावकारी करतात; शेतीभाती आहे. हे असले कसले भटजी?'

आई म्हणाली, 'तो त्यांचा दोष. पूर्वी भटजींना दक्षिणा जास्त मिळाली, तर ते गोरगरिबांना देऊन टाकीत; घरी मुले शिकावयास ठेवीत. त्या पांडवप्रतापात नाही का, की नळराजाने ब्राह्मणास खूप धन दिले. ते धन ब्राह्मणांनी वाटेतच दुसर्‍याना वाटून दिले. ऋषींच्या घरी किती तरी मुले शिकावयास राहत असत. आपण गृहस्थ. आपण दक्षिणा घेऊ नये. तू पुन्हा पुढे हात करू नकोस. रोहिदास पाणपोईचेही पाणी प्यायला नाही. गृहस्थाने जगास द्यावे. जगापासून घेऊ नये.'

आईने ते दोन आणे शेजारी बाळू म्हणून गडी होता त्याला देऊन टाकले. मित्रांनो! जगापासून जितके आम्ही घेऊ, तितके जगाचे आपण मिंधे होत असतो. आपण दीनवाणे होत असतो. दुस-यांच्या तोंडाकडे पाहणारे होत असतो. दीनवाणे जगणे हे पाप आहे. ताठरपणे, उन्मत्तपणे जगणे हेही पापच. जगाचे मिंधे होणे नको. युरोपमध्ये ही स्वाभिमानी वृत्ती लहानपणापासूनच शिकविण्यात येत असते. आईबापांच्याही पैशावर जगणे हा तेथे मिंधेपणा व कमीपणा मानतात. अमेरिकेचे प्रेसिडेंट हूव्हर यांची गोष्ट सांगतात. त्यांनी आपल्या तेरा वर्षे वयाच्या मुलास मजुरीने काम करावयास पाठविले. धनाढय अशा अमेरिकेचे मुख्य अध्यक्ष हूव्हर होते; परंतु त्याच वेळेस त्यांचा हा लहान मुलगा एका गवंडयाच्या हातांखाली काम करीत होता. एका इमारतीचे बांधकाम चालले होते. ते चालले असता काम करताना हा मुलगा उंचावरून पडून मेला. हूव्हरसाहेबास वाईट वाटले; परंतु ते म्हणाले, 'माझ्या राष्ट्राला स्वावलंबन व श्रमाची महती शिकविण्यासाठी माझा मुलगा मेला!'

स्वावलंबन हा पाश्चिमात्य शिक्षणाचा पाया आहे. स्वावलंबनाने मान वर राहते. परावलंबनाने मान खाली होते. श्रमाशिवाय काही घेऊ नये व कोणी श्रम केल्याशिवाय त्याला देऊ नये. 'तुका म्हणे घेतो तोही नरका जातो!' आळशी मनुष्याला पोसणाराही पापी आणि आळशीही पापी. कोणा आळशाला जेव्हा आपण देतो तेव्हा तो मिंधा, दीनवाणा असतो व आपण ऐटीत असतो. याच्या उलट त्याच्याकडून काहीतरी काम करुन घ्यावे, लाकडे फोडून घ्या, कपडे धुऊन घ्या, जमीन खणून घ्या. काहीतरी काम करून घ्या. त्यात खरोखरच त्या माणसाचा उध्दार आहे.

उद्योगहीनास पोसण्यात देवाचा अपमान आहे. देवाने दिलेल्या हातापायांचा, बुध्दीचा अपमान आहे. स्वावलंबन, स्वाभिमान, श्रम ह्यांची महती आज रशियात शिकविण्यात येत आहे. नुकताच एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ रशियात गेला होता. रशियातील परिस्थिती, तेथील अंतर्बाह्य परिवर्तन पाहावयास तो गेला होता. मजुरांना वाटण्यासाठी म्हणून त्याने झरण्या (फाऊंटन पेने), चाकोलेटच्या वडया, सुंदर चाकू वगैरे वस्तू घेतल्या होत्या. मजुरांच्या चाळीत जाऊन तो त्यांना त्या बक्षीस म्हणून देऊ लागला. परंतु एकही हात पुढे झाला नाही. कोणीही वस्तू घेतली नाही. तो म्हणाला, 'घ्या, मी प्रेमाने देत आहे.' ते मजूर म्हणाले, 'स्वत:च्या श्रमाने मिळवावे. दुसर्‍याने दिलेली देणगीही घेऊन कदाचित मनात आलस्य, मिंधेपणा व परावलंबन यांचा उदय व्हावयाचा. या दुर्गुणांना यत्किंचितही वाव न देण्याचे आम्ही ठरविले आहे.'

तो अमेरिकन मानसशास्त्रज्ञ चकित झाला. केवढी ही विचारक्रांती! ज्या रशियात लाखो मजूर मागण्यासाठी पूर्वी हात पुढे करीत, तेथे एकही हात पुढे झाला नाही. केवढे स्वावलंबन केवढे तेज, केवढी श्रमाची पूजा!

श्रमात आत्मोध्दार आहे, फुकट घेण्यात व देण्यात पतन आहे. हे हिंदी मुलांना, तमाम हिंदी जनतेला समजेल, तो सुदिन. घरी दारी, शाळेत हे शिक्षण देण्यात आले पाहिजे. उष्टे कोणाला घालू नये, असा धर्मनियमच झाला पाहिजे. खरा धर्म श्रमांना उत्तेजन देणे हाच होय. आळसाने भीक मागणारा व श्रीमंत असल्यामुळे गाद्यांवर लोळून खाणारा, दोघे किडेच! श्रीमंतही दुस-याच्या श्रमावरच जगतो व आळशी भिकारी दुसऱ्याच्या श्रमानेच खातो. हे दोघे समाजवृक्षावरील बांडगुळे आहेत. उन्हातान्हात काम करणारा मजूर, रस्ते झाडणारा झाडूवाला, मलमूत्र नेणारा भंगी, मेलेली गुरे फाडणारा ढोर, वहाणा बांधणारा चांभार हे सारे, आयतेखाऊ लोकांपेक्षा पवित्र आहेत, श्रेष्ठ आहेत. काहीतरी निर्माण करा. विचार निर्माण करा, धान्य निर्माण करा, स्वच्छता निर्माण करा. काहीतरी मंगल असे, सुंदर असे, हितकर असे, निर्माण करा; तरच जगण्याचा तुम्हांस अधिकार आहे. ज्या राष्ट्रात समाजसंवर्धक, समाजरक्षक, समाजपोषक श्रमाची पूजा होते, ते राष्ट्र वैभवावर चढते. बाकीची भिकेस लागतात.

माझ्या आईने मला स्वाभिमान शिकविला; मिंधेपणा म्हणजे मरण हे शिकविले; दुसर्‍याचे घेऊ नकोस, दुसऱ्यास दे, हे शिकविले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel