‘आई, घरात राहणे मला आवडत नाही. बाहेर बरे वाटते. सारी सृष्टी जणू जवळ येते. झाडेपाडे जणू आपल्याजवळ बोलतात. दगडधोंडे बोलतात. आनंद असतो. मी जाईन पुन्हा.’

इतक्यात पिता आला.

‘काय जयंता, खपवलास का माल?’

‘होय बाबा.’

‘आवडला का लोकांना?’

‘फार आवडला.’

‘पैसे किती आणलेस?’

‘पुढच्या वेळेला देणार आहेत.’

‘आणि मागचे पैसे?’

‘तेही मिळतील.’

‘आणि आज का हात हलवीत आलास? अरे सारा माल उधार का द्यायचा? आणि काही चिठ्ठीचपाटी आहे का? वेडबंबूच दिसतोस. उद्या परत जा. सारे पैसे वसूल करून आण. एक पैही शिल्लक नको ठेवू. वाहवा रे! अशाने दिवाळे काढशील तू बापाचे. उद्या जा. समजलास?’

‘होय बाबा.’

आणि दुस-या दिवशी जयंता निघाला. गाडी घेऊन निघाला.

‘जयंता, गाडी कशाला नेतोस? पायीच जा.’

‘बाबा, तुम्हाला गाडीभर पैसे आणून देतो. पैसे ना हवेत तुम्हाला?’

‘अरे, त्या कापडाची इतकी का किंमत दोईल? फायदा जास्तीत जास्त घेतलास तरी कितीशी किंमत होणार?

‘परंतु मी गाडी भरून आणतो. नेतो गाडी.’

‘बरे, आण हो गाडी भरून.’

जयंता गाडीत बसून निघाला. बैल पळत होते. घंटा वाजत होत्या आणि पुढे रात्र झाली. बैल हळूहळू जात होते. वरती तारे चमचम करीत होते. रातफुलांचा सुगंध सुटला होता आणि जयंता गाणे म्हणत होता. काय होते गाण्यात?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel