एक होता राजा. त्याला दोन राण्या होत्या; परंतु दोघींनाही मूलबाळ नव्हते. आपल्या राज्याला पुढे वारस कोण, असा विचार मनात येऊन राजा दु:खी होई. कशाला हे राज्य, कशासाठी ही धनदौलत, ही कोणाच्या स्वाधीन करू, असे विचार सारखे त्याच्या मनी घोळत. राजाचे दु:ख पाहून राण्याही दु:खी होत्या.

एके दिवशी कोणी तरी एक बोवा आला होता. एक राणी तेथे होती. राणी रडत होती. बोवाजी म्हणाला, 'राणी, राणी तुझ्या डोळयांत का पाणी? राजाची राणी असून दु:खी का? दासदासी पदरी असून दु:खी का? रथ, घोडे हत्ती असून दु:खी का? तुम्हाला काय कमी? तुम्हाला कसला तोटा? तुम्हासारख्या श्रीमंतांनी रडावे मग गरिबांनी काय करावे? देवाने तुम्हाला भाग्य दिले. रडू नका, रूसू नका, सुखाने  नांदा.'

डोळयांत पाणी आणून राणी म्हणाली, 'शेतात पीक नाही तर शेताला शोभा नाही; तळयात कमळ नाही तर तळयाला शोभा नाही; आकाशात चंद्र नाही तर आकाशाला शोभा नाही; झाडाला फळ नाही तर झाडाला शोभा नाही; शिंपल्यात मोती नाही तर शिंपल्याला शोभा नाही. महाराज, जिला पुत्र नाही, त्या स्त्रीच्या जगण्यात काय अर्थ? मला 'आई' अशी हाक कोण मारील? पुत्रवती जी आहे तीच खरी सुखी, तीच भाग्याची, तीच दैवाची. देवाने सारे दिले परंतु हे दिले नाही; देवाने सोने दिले परंतु सोनुकला दिला नाही. मी रडू नको तर काय करू? राजाचे दु:ख पाहून मला प्राण नको असे वाटते. तुम्ही तरी कृपा करा, मला मुलगा द्या.'

बोवाजीस दया आली. तो म्हणाला, 'माझ्या कृपेने तुम्हाला पुत्र होईल; परंतु दुसरी राणी त्या मुलाचा द्वेष करील. त्याला मारू पाहील. म्हणून मी एक युक्ती करतो. तुमच्या मुलाचे प्राण तुमच्या या राजधानीत जे मोठे तळे आहे. त्या तळयात जो एक सोन्यासारखा मासा आहे त्याच्या पोटात ठेवतो. त्या माशाच्या पोटात मी एक सोन्याची साखळी ठेवीन. ती जोपर्यंत तेथे आहे. तोपर्यंत तुमच्या मुलाचे प्राण सुरक्षित राहातील.'

राणीला वर देऊन तो बोवाजी निघून गेला. पुढे काही दिवस गेले. राणीला मुलगा झाला. नवानवसाचा मुलगा. कोण आनंद, कोण उत्सव! मोठमोठया श्रीमंतांच्या बायका राणीला बाळंतविडा घेऊन आल्या. बाळ कसा नक्षत्रासारखा होता. ही राणी राजाची आवडती राणी झाली. राजा दुसर्‍या राणीचे तोंड देखील पाहीना. ती राणी या राणीचा हेवा करू लागली, हिच्या मुलास पाण्यात पाहू लागली. त्या गोड मुलाला पाहून सार्‍यांना आनंद होई, परंतु त्या सावत्र आईचा संताप होई. सावत्र आई कधी त्याला मारी, कधी रडवी.

राजपुत्र दिवसेंदिवस वाढत होता. तो आता पाचसहा वर्षांचा झाला. बाहेर हिंडे, फिरे, खेळे. तो सर्वांचा आवडता होता. सर्वांना हवासा वाटे. त्याला गर्व नव्हता. तो कोणाशी भांडत नसे. सार्‍यांशी खेळे. दिसायला गोड व गुणांनी गोड. बाहेर गोरापान होता, तसाच मनाचा निर्मळ होता. आनंदात दिवस जात होते. राजपुत्राला कबुतरे फार आवडत. त्याने सुंदर कबुतरे पाळली होती. एक दिवस त्याचे आवडीचे कबुतर उडाले, ते थेट सावत्र आईच्या घरात शिरले. राजपुत्र रडत तेथे गेला. तो म्हणाला, 'माझे कबुतर दे. 'ती सावत्र आई म्हणाली, 'देत नाही जा. तुझी कबुतरे माझ्या घरात कशाला शिरतात? मारून टाकते त्याला. तुमचे होतात खेळ, परंतु आम्हाला त्रास. घरात कबुतरे येतात, हगतात, घाण करतात. जा, नीघ येथून. 'राजपुत्र रडू लागला. शेवटी त्या सावत्र आईने ते कबूतर दिले. राजपुत्र आनंदात व हसत गेला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel