त्या वर्षी प्रथम पाऊस सुंदर पडला. शेतकरी खुशीत होते. शेते मस्त होती. सोळा आणे पीक येईल, लोक म्हणत. सरकारी आणेवारी झाली. परंतु शेतक-यांच्या हातात प्रत्य़क्ष पीक पडले तेव्हा खरे. कधी रोग पडेल, कधी टोळ येतील, कधी उंदीर खातील. तर कधी अकाली पाऊस कोसळेल. शेतक-यांचे सारे परस्वाधीन.

आणि खरेच मुसळधार पाऊस आला. पाऊस धो धो पडत होता. हातातोंडाशी आलेले पीक मातीत मिळाले. कपाशीचे पीक गेले, शेंगांना मोड आले. नद्यानाल्यांना पूर येऊन तीरावरच्या शेतांमध्ये रेती-गाळ साचून राहिला. आकाश गळत होते आणि शेतक-यांचे डोळेही गळत होते ! सारी मेहनत मातीमोल झाली.

अनेक ठिकाणी शेतक-यांच्या सभा होऊ लागल्या. खंड माफ करा; शेतसारा माफ करा; शेतक-यांस तगाई द्या; असे ठराव होऊ लागले. सरकार काय करणार, इकडे सर्वांचे डोळे होते.

कलेक्टरांकडे शिष्टमंडळी गेले.

“विचार करतो.” साहेब म्हणाले. काही दिवसांनी गावोगावच्या चावडीत सरकारी जाहीरनामे लागले,

“शेतक-यांनी पिकवले किती, खर्च किती आला, तोटा किती आला, याचे जमाखर्च सादर करावे. ज्याचे नुकसान झाले आहे असे दिसेल, त्याला शेतसारा माफ करण्यात येईल.”

शेतक-यांना लिहिता वाचता येत नाही; ते कसा जमाखर्च ठेवणार ? जे शिकलेले जमीनदार होते त्यांच्याजवळ जमाखर्च होते. त्यांना भरभरा सूट मिळत गेली; आणि गरीब शेतकरी,- त्यांचीच दाद लागेना !

त्या दिवशी गोविंदा त्या गावाला गेला होता. गोविंदा मोठा सेवेकरी. त्याची मूकसेवा होती.

“दादा, आमचा शेतसारा नाही का कमी व्हायचा ? सारा भुईमूग गेला.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel