“दादा, अदमण भात द्याल ? हरी येईल, त्याच्याबरोबर द्या. आम्ही पुढे पैसे फेडू. मोलमजुरी करुन पैसे वारुन टाकू !”

“लक्ष्मी, तू आमच्याकडे किती काम करतेस ! वहिनीची लुगडी धुतेस, ती थुंकीची भांडी घासतेस, सारे मनापासून करतेस ; लहान सुधाची तू जणू आई बनली आहेस. तिची वेणी घालतेस, तिच्या केसांत शेवंतीची फुले घालतेस. तुझा हक्कच आहे. तू घंरातलीच आहेस. दादांना विचारीन नि देईन हो भात. तुझी नणंदही आली आहे. दोन दिवस पोटभर जेवा.” मी म्हटले.

लक्ष्मी गेली. थोड्या वेळाने हरी आला. त्याला मी अदमण भात दिले. गेले काही दिवस. त्या दिवशी लक्ष्मी जरा उशीराने आली. मी वाट बघत होतो.

“का ग लक्ष्मी, उशीरसा ?” मी विचारले.

“दादा, रात्रभर जागरण. उजाडता डोळा लागला.”

“मुलगा तर बरा आहे ना ?”

“हो. परंतु काल मोठे संकट टळले. घरात दोन साप निघाले. मी चुलीजवळ होते. तो आला. मी घाबरले. हरीने येऊन मारला. आम्ही रातची सारी निजलो. मला झोप येत नव्हती. तो माझ्या पायाला काही गार लागले. मी एकदम उठले. दिवा लावला. पोरांना बाजूला केले. तो दुसरा साप. त्यालाही मारले. मग मात्र झोप येईना. दिवा तसाच ठेवला. आधीच तेल मिळत नाही. परंतु भय वाटले. आणखी साप येणार की काय असे वाटले. पोरेही घाबरली. असा गोंधळ. रानात घर. परंतु असे दोन साप नाही कधी घरात आले. काय करायचे ?”

लक्ष्मी कामाला लागली. तो तिचा दीर हरी चहाच्या दुकानातून आला. तो संतापून आला होता. काय होती भानगड ?

“वहिनी-”

“काय ?”

“चहाचा मालक माझ्यावर चोरीचा आळ घेतो. म्हणाला, येथले चार आणे घेतलेस ? मी कशाला घेऊ त्याचे चार आणे ! चालता हो, म्हणाला. वाटेल त्या शिव्या दिल्या त्याने.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel