सारिपुत्तमोग्गल्लान आपल्या अडीचशें सतीर्थ्यांसह वेणुवन उद्यानांत आले. बर्‍याच अंतरावर असतांना त्यांनां पाहून बुद्ध आपल्या भिक्षुंनां म्हणाला “भिक्षुहो¡ हे जे दोघे परिव्राजक येथें येत आहेत, ते माझे अग्रश्रावक (अग्रशिष्य) होणार आहेत¡”

ते जवळ येऊन बुद्धाला नमस्कार करून एका बाजूला बसले; आणि बौद्धसंघात आपला समावेश करण्यासाठीं त्यांनी बुद्धाला विनंती केली. बुद्धानें त्यांनां व त्यांच्या अडीचशे सतीर्थ्यांनां संघांत घेतलें.

संजयाचे एवढे शिष्य एकदम बौद्धभिक्षु झाले, तेव्हां राजगृहामध्यें फारच गडबड उडून गेली. काही दिवस एकादा बौद्धभिक्षु रस्त्यांत दिसला म्हणजे लोक म्हणत “हा महाश्रमण आमच्या शहरांत आला, आणि सगळ्या संजयांच्या शिष्यांना घेऊन गेला¡ आतां हा कोणाला नेणार बरें?” *
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*आगतो खो महासमणो मागधानं गिरिब्बजे
सब्बे संजये नेत्वान कस्स दानि नयिस्सति।
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
भिक्षूंनां राजगृहवासी लोकांच्या या म्हणण्याला काय उत्तर द्यावें, हें सुचेना. त्यांनी ही गोष्ट बुद्धाला कळविली. बुद्ध म्हणाला “भिक्षुहो! हा लोकापवाद फार दिवस टिकावयाचा नाही. सातआठ दिवस लोक असें बोलतील, आणि चूप रहातील. तथापि पुन: जर तुमच्या कानीं हे शब्द आले, तर तुम्ही त्या मनुष्यांनां असें स्पष्ट उत्तर द्या, कीं “शूर तथागत शिष्यांनां सद्धमार्गाने नेत असतात. मग त्यांची लोकांनी ईर्षा कां करावी?”
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नयंनि वे महावीरा सद्धम्मेन तथा गता
धम्मेन नीयमानानं का उस्सुय्या विजानतं।
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
राजगृहांत वेणुवनविहारामध्यें रहात असतां बुद्धानें आपल्या संघाला शिस्त लावून दिली. यापूर्वी कौंडिन्यापासून तहत सारिपुत्त मोग्गल्लानांपर्यंत ज्यांनां बुद्धानें स्वत: आपल्या भिक्षुसंघांत घेतलें, त्यांचा प्रव्रज्याविधि अगदींच साधा होता. बुद्धानें `भिक्षु, इकडे ये,’ (एहि भिक्खु) असें म्हणावें; म्हणजे कोणताहि माणूस भिक्षु होत असे. पण याच्यायोगे संघामध्यें सर्वसाधारणता राहिली नाही, म्हणजे एकाचीं वस्त्रें एका तऱ्हेची, तर दुसयाची दुसर्‍या तऱ्हेचीं; एकाचा आचार एका तऱ्हेचा, तर दुसर्‍याचा दुसर्‍या तऱ्हेचा, असा प्रकार होऊं लागला. तेव्हां बुद्धानें आपल्या भिक्षुसंघाचे आचार एकाच धर्तीवर होण्यासाठीं निरनिराळे नियम घालून दिले. त्या सर्वांचा विस्तार विनयग्रंथामध्यें केला आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel