(२६)
माराचें कुरण


बुद्धगुरू श्रावस्तीमध्यें अनाथपिंडिकाच्या आश्रमांत रहात असतां भिक्षूंना उद्देशून ह्मणाला "भिक्षुहो, कुरण लावणारा मनुष्य मृगांच्या कल्याणासाठी कुरण लावीत नाहीं. त्याचा हेतु असा असतो, कीं, या कुरणांतील गवत खाऊन मृग प्रमत्त होतील, व त्यामुळें सर्वस्वी आपल्या ताब्यांत येतील!

"भिक्षुहो, अशा एका कुरणामध्यें एका जातीचे मृग येऊन यथास्थित गवत खाऊन प्रमत्त झालें, व त्यामुळे सर्वस्वीं कुरण लावणार्‍या मनुष्याच्या ताब्यांत गेले. तें पाहून दुसर्‍या कांही मृगांनी असा विचार केला, कीं, या कुरणांत शिरणें सर्वथैव अनिष्ट आहे. त्यांनीं तें कुरण सोडून दिलें, आणि ते ओसाड अरण्यांत शिरले. परंतु उन्हाळ्याचें दिवस आल्यावर त्यांनां तेथें चारापाणी मिळेनासे झालें. त्यामुळें त्यांच्या शरीरांत बळ राहिलें नाहीं. ते उदरपीडेनें त्रस्त होऊन पुन: त्या कुरणांत शिरले, आणि प्रमत्त होऊन त्या मनुष्याच्या ताब्यांत गेले. तिसर्‍या कांही मृगांनी हे दोन्ही मार्ग सोडून देऊन कुरणाच्या जवळच जंगलाचा आश्रय केला, व ते मोठ्या सावधगिरीनें कुरणांतील गवत खाऊं लागले. बराच कालपर्यंत ते त्या मनुष्याच्या ताब्यांत गेले नाहींत; पण त्या मनुष्याला जेव्हां त्यांचें आश्रयस्थान समजलें, तेव्हां त्यानें त्याभोवतीं जाळी पसरून त्या मृगांनां आपल्या हस्तगत केलें. पण चौथे मृग इतके हुषार होते, कीं, त्यांनी कुरणापासून दूर अंतरावर गहन अरण्यातं वस्ती केली, व तेथून ते मोठ्या सावधगिरीनें कुरणांतील गवत खाऊं लागलें. त्यांचें आश्रयस्थानइतकें बिकट होतें, कीं, त्याचा पत्ता कुरणाच्या मालकाला मुळींच लागला नाहीं.

"भिक्षुहो, हें मीं रूपक केलें आहे. कुरण लावणारा मनुष्य दुसरा कोणी नसून मार हा आहे. या श्रमणब्राह्मणांनी विषयसुखामध्येंच आनंद मानिला के पहिले मृग होत; पण ज्यांनीं विषयोपभोगाचें अत्यंत भय वाटल्यामुळे अरण्यवास पत्करिला आणि जे सर्व जगापासून एकाएकीं वेगळे झाले ते दुसरे मृग होत. जे श्रमणब्राह्मण विषयाचा उपभोग मोठ्या काळजीनें घेऊन जग हें शाश्वत आहे कीं अशाश्वत आहे, आत्मा अमर आहे कीं नाशवंत आहे. इत्यादि प्रश्नांविषयीं वादविवाद करून आपला वेळ फुकट घालवितात, ते तिसरे मृग होत. पण जे असल्या भानगडींत न पडता आपलें अंत:करण निष्कलंक राहील अशी काळजी घेतात, ते चवथे मृग होत.''

(२७)
सुखाचा दिवस


बुद्धगुरु श्रावस्तीमध्यें अनाथपिंडिकाच्या आश्रमात रहात असतां भिक्षूंना उद्देशून ह्मणाला "गेल्या गोष्टीचा अधिक विचार करूं नये, आणि भावी गोष्टीची आशा धरूं नये. कांकी, गेलेली गोष्ट नष्ट झाली आहे, आणि घडणारी गोष्ट अद्यापि घडावयाची आहे. परंतु प्रस्तुत गोष्टीचाच नीट विचार करावा; आजच जें कांही करावयाचे असेल तें तें करावें; उद्याचें मरण कोणाला ठाऊक आहे? ज्याचें अफाट सैन्य आहे, त्या मृत्यूबरोबर युद्ध करणें आह्मांला शक्य आहे काय? असा विचार करून जो सावधगिरीनें आणि हुषारीनें वागतो, त्याचाच दिवस सुखानें जातो, असें मुनिवर्य म्हणतात.

"भिक्षुहो, अतीतकाळीं माझें रूप असें होतें, माझ्या वेदना अशा होत्या, माझी संज्ञा, माझे संस्कार आणि माझें विज्ञान हीं अशीं होतीं, असें णून एकादा मनुष्य त्यांचा लोभ धरितो. हा मनुष्य गेलेल्या गोष्टींच्या मागें लागला आहे असें म्हटलें पाहिजे. दुसरा एकादा भविष्यत्काळी माझें रूप, वेदना, हीं अशाअशा प्रकारचीं व्हावीं या विचारांत मग्न होऊन जातो, व या गोष्टींसंबंधाने अत्यंत लोभ धरितो. हा मनुष्य भावी गोष्टीची आशा करितो असें म्हटलें पाहिजें. पण आर्यश्रावक आर्यधर्माचें ज्ञान करून घेऊन आणि सत्पुरुषांशी सहवास करून रूप आत्मा नाही, किंवा रूपांत आत्मा नाहीं, वेदना आत्मा नाहीं, संज्ञा आत्मा नाहीं, संस्कार आत्मा नाहीं, विज्ञान आत्मा नाहीं, विज्ञानवान् आत्मा नाहीं, विज्ञानामध्यें आत्मा नाहीं किंवा आत्म्यामध्यें विज्ञान नाहीं, हें यथार्थतया जाणतो. हा मनुष्य प्रस्तुत गोष्टीचा नीट विचार करितो, असें म्हटलें पाहिजे.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel