‘तुम्ही वाईट नका वाटून घेऊं. कर्तव्य म्हणून सारें आनंदानें करायला हवें. आई किती कष्ट करते! दळणसुद्धा घरीं दळते. आणि गंगूताईला बरें नसतें तरी ती आईला हात लावते. तुम्ही निजा, सारी निजा.’

‘तू बोलूं नकोस. पडून राहा.’ वडील त्याच्या डोक्यावर हात ठेऊन म्हणाले.

जयन्ता शांतपणें डोळे मिटून पडला. आई नि गंगू अंथरुणावर पडल्या. वडील जयन्ताजवळ बसले होते. बराच वेळ झाला. बाराचा सुमार असावा. सिनेमा सुटून मंडळी परतजात असावी. जयन्ताने डोळे उघडले.

‘बाबा, मी नोकरी धरली, किती छान केलें नाहीं ? तुमची चिंता थोडी कमी केली. गंगूताईला इन्जक्शनें घेतां येतील. आता पैसे पुरतील.
‘होय हो बाळ. तूं बरा हो म्हणजे झालें.’
‘मी बरा नाही झालों तरी गंगूताई बरी होईल. ती मग मदत करील.’
पुन: खोलींत शांतता होती. आणि गंगू उठली.
‘बाबा, तुम्ही पडा’ ती म्हणाली.
आणि ते झोपले. बहीण भावाजवळ बसली होती, ‘तूं आईला नको उठवूं’ जयन्ता म्हणाला.
‘बरें हो’ तीं म्हणाली.
पहाटेची वेळ होती. जयन्ताने ताईचा हात एकदम घट्ट धरला.
‘काय रे ?’
‘जातो आता सुखी राहा.’
‘जयन्ता ?’
तो कांही बोलला नाही. पहांट झाली. आई उठली. वडील उठले. भावंडे उठली. परंतु जयन्ता आतां उठणार नव्हता.

थोडे दिवस गेले आणि जयन्ताच्या परीक्षेचा निकाल लागला होता. परंतु तो पाहण्याचें कोणाच्या मनांतहि आलें नाही.. सायंकाळीं जयन्ताचा एक मित्र आला. हातांत वृत्तपत्र होतें.

‘गंगूताई’ त्यानें हाक मारली.
‘काय निळू ?
‘जयन्ता पहिल्या वर्गांत पहिला आला.’
‘म्हणूनच देवानें नेला.’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel