सगुणेने दूध तापवले. ती म्हणाली, “सारे मी एकटी का घेऊ?  मामंजींना दोन घोट द्या, थोडे मी घेईन.”

विश्राम म्हणाला, “तू आजारी आहेस, तूच घे; आम्हाला नको. आहे कितीसे?” तरीही सगुणेने थोडे दूध म्हाता-याला नेऊन दिलेच. “कोठले गं दूध पोरी? त्याने विचारले.”

विश्राम म्हणाला, ‘मालकाकडून आणले होते थोडे. हिचे रोज डोके दुखते-म्हटले थांबेल.”
म्हातारा म्हणाला, “मग मला गं कशाला? तुम्हीच घ्या पोरांनो. तुम्हालाच आता जगायचे आहे. संसार करायचा आहे. माझे काय आता म्हाता-याचे!” सगुणेच्या व विश्रामच्या आग्रहाने म्हाता-याने घोटभर दूध घेतले. नंतर सगुणा विश्रामला म्हणाली, “तुम्ही एवढे हातावर तरी घ्या.” विश्रामने आपला हात पुढे केला व त्याच्यावर सगुणेने दूध घातले. “आता हे मी पिऊ? खरेच पिऊ? तिने विचारले, पी. माझी काही दृष्ट नाही पडणार!” हसत विश्राम म्हणाला.

एके दिवशी रात्री विश्राम पुन्हा असेच दूध घेऊन घरी येत होता. वाटेत दुसरा एक गडी भेटला. तो विश्रामला म्हणाला, “विश्राम, काय रे ते लपवीत चालला आहेस? विश्राम म्हणाला, “दूध.” त्याने विचारले, ‘मालकाने दिले वाटते?  बराच उदार झाला मालक तुझा!” विश्राम म्हणाला , “औषधाला घेऊन चाललो आहे.”

त्या दुस-या गड्याला नोकरी मिळत नव्हती. विश्रामच्या गृहसौख्याचा तो मत्सर करी. गरिबा-गरिबातही द्वेष-मत्सर आहेच. महिना दोन रुपये मिळविणारा पाच रुपये मिळविणा-याचा हेवा करतो! सारी दुनिया द्वेषमय आहे, मत्सराचे साम्राज्य सर्वत्र पसरले आहे.ते दूध धन्याला न विचारता विश्राम नेऊन जात असला पाहिजे, असे त्या दुस-या गड्याला वाटले. कारण विश्रामच्या धन्याची कृपणता व निष्ठुरपणा जगजाहीर होता. दगडाला पाझर फुटेल, मुसळाला अंकुर येईल, परंतु दिनकररावास दया येणार नाही, असे सारे म्हणत. आपण विश्रामच्या धन्याला सांगावे म्हणजे तो विश्रामला नोकरीवरून काढून टाकील व कदाचित आपल्याला ठेवील, असे त्या गड्याच्या मनात आले.

दुस-या दिवशी तो मत्सरी गडी दिनकररावांना भेटला व म्हणाला, ‘तुम्ही विश्रामला कशाला ठेवले कामावर? विश्राम अप्रामणिक आहे. तो तुम्हाला फसवितो. रोज रात्री दूध चोरून नेतो. मला कामावर दोन रुपये कमी द्या. मी इमानेइतबारे नोकरी करेन.”

दिनकरराव म्हणाले, “बघू, तुला ठेवायचे झाले तर कळवीन. आता जा कामात आहे.”
दिनकरराव आधीच दुष्ट, त्यातचे हे विष त्यांच्या कानात ओतलेले! विश्रामच्या पाळतीवर राहावयाचे असे त्यांनी मनात ठरविले. रात्र केव्हा होते याची वाट पाहात होते. सर्प जसा दंश धरून बसतो, त्याचप्रमाणे ते बसले होते. रात्र झाली, दूध वगैरे काढून झाली, विश्रामने गुरांना चारा वगैरे घातला. त्याचे जेवण झाले. परवानगी घेऊन तो जाण्यास निघाला. हळूच गोठ्यात जाऊन ती लोटी त्याने घेतली. अंगावरच्या घोंगडीत ती लपवीत तो चालला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel