“गोपाळ, ही माझी गाय. मी दुष्टानं हिला गांजल. छळलं. पायातला काटा मी काढला नाही. तिच्या वासराचे हाल केले. गोपाळराव, देवानं मला पाप्याला शासन केलं. करावं तसं भरावं. मो-ये, क्षमा कर. आता तिला बरं वाटो. मी तुझी सेवा करण्यास येईन. आम्ही दोघं येऊ हो माते.” शामरावांनी गायीचे पाय धरले, आपल्या जुन्या मालकिणीला बरे वाटावे म्हणून मो-या गायीने देवाचा धावा केला.

गोपाळ म्हणाला, “शामराव, तुम्हांला मोरी गाय मी परत देतो. व्यालावर तुम्ही घेऊन जा. ही तुमची गाय आहे. तुम्हांला पश्चाताप झाला आहे.”

“छे ! आता मीच तुमच्याकडे येऊन राहीन. मला गुराखी होऊ दे. गोवारी होऊ दे. तुमच्या स्फू्र्तीनं, पुण्य आदर्शाने मलाही स्फूर्ती मिळो. पूर्वीचं पाप थोडंफार धुतलं जावो. इथंच गोमातेची सेवा करायला आम्ही उभयता येऊ.” शामराव म्हणाले.

तेथून ते घरी आले. त्यांनी पत्नीला हकीगत सांगितली. मोरी आनंदात, सुखात आहे हे ऐकून ती आनंदली. तिचा रोग निम्मा पळाला. तुपातून चूर्ण घेतल्यावर आराम पडू लागला.

एक दिवस शामराव म्हणाले, “आपण त्यांच्या आश्रमात जाऊन राहायंच का ? हे घर-दार विकून सावकाराचं कर्ज देऊन टाकू. आपण गोमातेची सेवा करु. काय आहे तुझं मत ?”

“मी तर मागंच सांगितलं होतं तुम्हालां. खरंच छान होईल. मो-या गायीची सेवा करु. पूर्वीच पाप पुसून टाकू. केव्हा जायचं ? सावित्रीबाईंनी अधीर होऊन विचारले.”

“जाऊ लवकरच.” शामराव म्हणाले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel