उन्हाळयाचे दिवस आले. गावात तापाची साथ आली. जयंत आजारी पडला. छात्रालयात त्याची काळजी घेतली जात होती. पुढे त्याच्या घरी कळवण्यात आले. आनंदराव आले. जयंताची आई आली. ती पहा खोली. त्या खोलीत जयंता निपचित पडून आहे. आईबाप आहेत. पहाटेची वेळ होती. रवि त्या खोलीच्या दाराजवळ येऊन उभा होता. हातात सुंदर गुलाबाचे फूल होते. जयंताच्या अंथरूणाजवळ आरामखुर्चीत पिता पडून होता. रवि हळूच आत गेला. ते फूल उशीजवळ ठेवून तो गेला.

सकाळी झाली. जयंताने डोळे उघडले. तो तेथे सुंदर फूल.
''कोणी दिले फूल बाबा?''
''येथे होते खरे. नीज. बोलू नको.''

जयंत ते फूल हातात घेऊन पडून राहिला.
रात्री दोनची वेळ होती. जयंताचे वडिल डॉक्टरला बोलवायला जात होते. जयंता वातांत होता. तो त्यांना तेथे व्हरांडयात अंधारात कोणी दिसले.

''कोण आहे येथे बसलेले?''
''मी रवि.''
''काय करतोस रे अंधारात?''
''माझे आयुष्य जयंताला मिळावे म्हणून मी प्रार्थना करीत आहे. रोज करतो. का नाही ऐकत देव?''

''तूच का ते फूल आणून ठेवले होतेस?''
''हो.''
''तू दौलतीचा मुलगा?''
''हो.''
''तुझे जयंतावर प्रेम आहे.''
''असे का विचारता?''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel