विजयी वीराप्रमाणें पुन्हां मक्केंत

हिजरीचें सातवे वर्ष संपत आलें. आदल्या वर्षी ठरल्याप्रमाणें मुहंमद मक्केला जावयास निघाले. या यात्रेला 'उमरतुलकझा'- धन्यतेची यात्रा असें नांव आहे. इ.स.६२९ चा मार्च महिना होता. पैगंबरांच्या संगें दोन हजार अनुयायी होते. यात्रेचे सर्व विधि ते करणार होते. ही छोटी यात्रा होती. कुरेशांनी एक शब्दहि बोलायचा नाहीं असें ठरविलें होतें. कुरेश तीन दिवस शहर सोडून गेले. आसपासच्या डोंगरांवरुन व टेकडयांवरुन ते सारे पहात होते. तो देखावा मोठा अपूर्व होता ! जगाच्या इतिहासांतील तें अपूर्व दृश्य होतें. शहरांतील घरांत कोणी नव्हतें. शहरांतले बाहेर पडत होते व बाहेरचे शहरांत शिरत होते. आपलीं जुनीं घरेंदारें आलेले लोक पहात होते. त्यांनी यात्रेचे विधि केले. सर्वांनीं नमाज केला. मक्केचे रहिवाशी बाहेर तंबूंतून होते. मदिनेहून आलेल्या या मातृभक्तांकडे ते पहात होते. मुहंमद व त्यांचे अनुयायी यांनीं काबाला प्रदक्षिणा घातल्या. अस्सफा व मर्वा यांचीहि यात्रा करण्यांत आली. या आलेल्या यात्रेकरुंत आपले मित्र, आप्तेष्ट वगैरे दिसतात का तें मक्केवाले वरुन पहात होते. ज्या वेदनांनीं इस्लामला जन्म दिला त्यांमुळें हा प्रसंग शक्य झाला. आणि तीन दिवस झाले. यात्रेकरु शांतपणें निघून गेले. मुहंमदांच्या या शांतिपूर्वक वचनपालनाचा फार परिणाम झाला. कुरेशांपैकीं पुष्कळच नवधर्माचे होऊं लागले. मुहंमदांची क्षमा, सत्यता, उदात्त स्वभाव यांमुळें मक्कावाले दिपले. मोठमोठे प्रतिष्ठित विरोधकहि विरोध विसरुन उपासक बनूं लागले.

परंतु कुरेश व त्यांचे साथीदार यांनीं दहा वर्षेंपर्यंत शांतीनें रहावयाचें असा केलेला करार मोडला. मुहंमदांच्या संरक्षणाखालीं असलेली बनी  खुझाआ या जमातीवर त्यांनी हल्ला चढविला. पुष्कळ खुझाआंची त्यांनीं कत्तल केली. ते मुहंमदांकडे गा-हाणें घेऊन आले. न्याय द्या म्हणाले. तिकडे मक्केंतहि अन्याय जोरजुलूम सुरु झाला होता. मक्कावाल्यांनीं हुदैबियाच्या कराराच्या त्या अटी मोडल्या. प्रमुख कुरेशांनीं खुझाआंच्या कत्तलींत भाग घेतला होता.

मुहंमदांस या गोष्टीची क्षमा करणें अशक्य होतें. एकदां सोक्षमोक्ष करायचें त्यांनीं ठरविलें. दहा हजारांची सेना घेऊन मुहंमद मक्केवर निघाले. कुरेशहि आले. झटापटी सुरु झाल्या. परंतु मक्कावाल्यांनीं फार विरोध केला नाहीं. पुष्कळ लोक कुरेशांच्या विरुध्द झाले होते. पुष्कळांना या यादवीचा वीट आला होता. मुहंमदांचा जवळ जवळ बिनविरोधच मक्केंत विजयप्रवेश झाला. ज्या मक्केंतून ते निराधार व अगतिक होऊन निघून गेले होते त्या मक्केंत आज विजयी महान् वीराप्रमाणें ते शिरले !

आणि मक्का हातीं घेतल्यावर त्यांनीं का सूड घेतला ? कत्तली केल्या ? नाहीं. क्षमेचें उदात्त व अद्वितीय स्वरुप त्यांनीं दाखविलें. जें शहर मुहंमदांच्या व त्यांच्या अनुयायांच्या जिवावर उठलेलें असे तें शहर आज त्यांच्या चरणीं नमलें होतें. ज्यांनीं पूर्वी माणुसकीस काळिमा लावणारी निर्दय कृत्यें केलीं ते सारे मुहंमदांसमोर होते. परंतु या विजयाच्या क्षणीं मुहंमद सारें विसरुन गेले. ते क्षमा करते झाले. सर्व मक्कावाल्यांस सार्वजनिक माफी जाहीर करण्यांत आली. फक्त चार जणांस शिक्षा देण्यांत आली. सारें सैन्य शांतपणें शहरांत शिरलें. लुटालूट नाहीं. कांहीं नाहीं. स्त्रीचा कोठें अपमान नाहीं. जगाच्या इतिहासांत असा विजयप्रवेश क्वचितच सांपडेल !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel