गुरु शिष्याला बजावतो आहे, सेनापति सैन्यास हुकूम करतो आहे असें त्यांचे लेख वाचतांना वाटतें. आपला सिध्दांत बरोबर आहे, आणि आपल्या विचारसरणीचे अधिकारी पुरुष आपणच आहोंत अशा आत्मविश्वासानें त्यांचे लेख भरलेले आहेत. बुध्दीचा स्वच्छपणा व भाषेचा जिवंतपणा त्यांच्या लेखांत स्पष्टपणें पाहावयास मिळतो. लेचेपेचें व गबाळ लिहिणें त्यांचें नसावयाचें. खंबीर, अर्थगंभीर असें त्यांचें लिहिणें आहे. विचारांच्या प्रखर जोरामुळें, भावनांच्या उद्रेकामुळें त्यांत समयोचित भाषा आपोआप स्फुरत असे. अथानुरुप त्यांची भाषा आहे. 'वाचमर्थोनुधावति' अशा ऋषिकोटींतील हा लेखक आहे असें दिसून येतें. सागराचें गांभीर्य व गगनाचे गौरव आपणांस त्यांच्या लेखांत प्रतीत होतें. भाषेंतच ते गुंगत राहात नाहीत. भाषा हें गहन अर्थ स्पष्ट करावयाचें एक साधन असें ते समजत-म्हणून भाषा सजवणीला त्यांनी अवकाश दिला नाही. ते वाड्.मय राष्ट्रांतील संन्यासी आहेत. संन्याशास ज्याप्रमाणें विलास सुचत नाहीत त्याप्रमाणें भाषेचे विलास राजवाडे यांस सुचत नसत. त्यांच्या लिहिण्यांतील प्रत्येक शब्द महत्वाचा आहे, प्रत्येक शब्द मोलाचा आहे. त्यांची लेखणी तीक्ष्ण होती. तिच्यांत स्पष्टपणा व कडवेपणा असे. यामुळें ती पुष्कळांस झोंबे. त्यांचे सडेतोड सिध्दांत वाचून दुसरा थक्क होई. राजवाडे यांच्या सिध्दांतावर टीकाही त्यामुळें पुष्कळ झाल्या. राजवाडयांच्या गागाभट्टीवरील ठाकरे यांची कोदंडाचा टणत्कार ही टीका नमुन्यादाखल म्हणून नमूद करतों. त्यांचे इतरही सिध्दांत व मतें यांच्यावर पुष्कळांनी टीका केल्या आहेत. राजवाडे हे दुस-यावर कसून टीका करीत व दुस-या पासूनही ते मुळमुळीत टीकेची अपेक्षा करीत नसत. या बाबतीत राजवाडे व टिळक यांचें साम्य आहे. प्रतिपक्षी- यांची रेवडी कशी उडवावी हें उभयतांस फार चांगलें साधे.

राजवाडे यांची भाषा संस्कृत शब्दप्रचुर आहे; तरीपण ती जातिवंत व शुध्द मराठी वळणाची वाटते. त्यांचें लिहिणें फार परिणामकारक असे. त्यांच्या प्रस्तावना वाचावयास वाचकांच्या कशा उडया पडत हें पुष्कळांस माहीतच असेल. त्यांची भाषा दुस-यांस अनुकरण करण्यास येत असे. त्यांच्या प्रत्येक शब्दावर त्यांचा ठसा आहे. राजवाडे यांची भाषा ताबडतोब समजून येते. एखादें वाक्य, एखादा उतारा वाचला म्हणजे हा राजवाडी असला पाहिजे असें ताबडतोब सांगता येते. इंग्रजीमध्यें कार्लाईलची भाषाशैली जशी अगदी निराळी व स्पष्टपणें उमटून पडणारी दिसते, तसेंच राजवाडी भाषेचें आहे. थोडक्यात बव्हर्थ आणण्याचीं राजवाडी हातोटी क्वचितच इतरांस साधते. त्यांच्या लिहिण्यांत निरर्थक व उगीच विस्तार आढळणार नाहीं. त्यांच्या लेखांत त्यांच्या प्रतिमेचें व त्यांच्या बुध्दीचें स्वच्छ प्रतिबिंब पडलें आहे. Style is the man-भाषाशैली म्हणजे ग्रंथकाराचें पूर्ण स्वरूपच-असें जें म्हणतात तें राजवाडे यांच्या बाबतीत खरें आहे. त्यांच्या स्वभावाचे गुण दोष त्यांच्या लिखाणांत आहेत. निर्भीडता, कळकळ, स्वतंत्रप्रज्ञा जोरदारपणा, विलास व नटवेगिरीचा तिटकारा - या त्यांच्या स्वभावाचे आविष्करण त्यांच्या सर्व लेखनसाहित्यांत झालें आहे.

राजवाडे यांच्या लेखणीसारखी तीक्ष्ण, कार्यकर्ती, प्रभावशाली लेखणी महाराष्ट्रांत कोणी धरिली नाही. त्यांच्या लेखणतील तल्लखपणा, सडेतोडपणा ही त्यांच्या सिध्दांच्या सत्यत्वापासून उत्पन्न झालेली असत; आत्मविश्वासाचा तो परिणाम होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel