'शिवकालीन समाज रचना' या निबंधांत राजवाडे लिहितात 'अठरापगड जातीचे ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र स्वधर्मभ्रष्ट झाले असतां ते बहुतेक मुसलमान बनल्यासारखेच झाले इतकेंच कीं, त्यांनी सुंतेची दीक्षा मात्र घेतली नाही. तीही त्यांनी घेतली असती परंतु त्यांच्या आड एक मोठी धोंड आली. ती धोंड महाराष्ट्रांतील साधु व संत हे होत. भांडणें, तंटे, अपेयपान, अभक्ष्यभक्षण यांचे साम्राज्य सर्वत्र मातलेलें पाहून ही बजबजपुरी कांहीतरी ताळयावर यावी या सद्हेतूनें साधुसंतांनी सर्वांना सहजगम्य व सुलभ असा भक्तिमार्ग सुरु केला. धर्मज्ञान लोपलें होतें; विधिनिषेधाची प्रतिष्ठा राहिली नव्हती; प्रायश्चित्तास कोणी पुसत नव्हतें. अशी सर्व प्रजा वृषलवत् अथवा बहुतेक म्लेंछवत् बनली होती. ही प्रजा सनातन धर्मास व आर्य संस्कृतीस सोडून जावयाच्या पंथाला लागली होती. बरेच सोडून गेलेहि होते. बाकी राहिलेल्या लोकांचा मगदूर पाहून साधुसंतांनी परम कारुणिक बुध्दीनें भक्तिमार्ग सुरु केला. सद्हेतूनें कीं, कसेंहि करून हे लोक पुन: कर्मनिष्ठ बनण्याचा संभव राहावा. संतांनी वर्णाश्रमधर्मलोपप्रधान अशी ही महाराष्ट्रांतील दुर्दैवी प्रजा दोन अडीचशे वर्षे आर्यसमाजांत मोठया शिताफीनें थोपवून धरिली व आर्यसंस्कृतीचें रक्षण केलें. तेव्हां संतांनी आपल्या या देशावर उपकार बिनमोल केले यांत काडीचाहि संशय नाही. संतानी प्रजेची बुध्दि धर्मांत ठेविली. परंतु ती प्रपंच प्रवण केली नाही. पुढें ऐतिहासिक तत्वज्ञानाचा म्हणजे प्रपंच व परमार्थ यांच्या एकवाक्यतेचा उदय रामदासांच्या हस्तें झाला. एकनाथ तुकारामादि संतांचे कार्य व रामदासांचे कार्य हें परस्पर सापेक्ष आहे. संतांनी मुसलमानी धर्मापासून जनतेचें रक्षण केलें नसतें, स्वधर्मंनिष्ठ त्यांस ठेविलें नसतें तर रामदासांनी तरी 'विद्या, व्याप, वैभव' याचा उपदेश कोणास केला असता ? असो. तर राजवाडे यांनां संताच्या कामगिरीची किंमत कळत होती. परंतु लोक जेव्हा खरें कार्य विसरुन संतांच्या पाठीमागें लपण्याचा मार्ग स्वीकारतात त्याचा त्यांना तिरस्कार वाटे. ही संन्यास प्रवणता आहे त्यांतच खितपत पडून राहण्याची प्रवृत्ति राजवाडे यांस नाहीशी करावयाची होती- व यासाठीच त्यांना प्राचीन इतिहासाची स्मृति जागी करावयाची होती. प्राचीन इतिहासाची स्मृति जागी करुन पूर्व वैभवाचें यशोगान करून, त्याप्रमाणेंच पूर्वीच्या चुका स्पष्टपणें दाखवून स्वाभिमानपुरस्सर नवीन कार्याचा पाया घालणें हें त्यांचें जीवित कार्य होतें. सर्व जन्मभर देशाहितकारक कामगिरी व्हावी म्हणून या थोर पुरुषास कोण कळकळ असे. ते आपल्या एका उद्बोधक टिपणांत लिहितात 'आषाढ शुध्द अष्टमीस व विशाला नवें ४६ वें वर्ष लागलें. ५४ वर्षे राहिली. त्यांत सर्व जगताला हितकारक व राष्ट्राला पोषक अशी कृती होवो. आजपर्यंत फक्त राष्ट्रीय स्मृति तयार करण्यांत काळ गेला. यापुढें कृति, कृति, कृति झाली पाहिजे. नाही तर व्यर्थ ! चाळीस वर्षे आणखी सतत मेहनत झाली पाहिजे. आरोग्य, उत्तम हवा, उत्तम पाणी, उत्तम जागा, उत्तम शुध्द अन्न ही मिळाली तर हेंही होईल. ईश्वराची कृपा अपरंपार पाहिजे' याच टिपणाच्या दुस-या बाजूस १८९४ पासून १९०९ पर्यंत केलेल्या कामगिरीचा तपशील दिला आहे व ७५०० पृष्ठें आतांपर्यंत मजकूर लिहून झाला-छापला असें सांगितलें आहे. या थोर पुरुषाची राष्ट्रकार्याबद्दलची ही तळमळ पाहून कांहीतरी करण्याची स्फूर्ति कोणास होणार नाही ? हा उदारभाव, हा आशावाद मेलेल्यासही चैतन्य देईल. परंतु आम्ही मेलेल्याहून मेलेले आहोंत; त्यास कोण काय करणार ? राजवाडे औंध येथें श्री.वैदिक पंडित सातवळेकर यांच्याजवळ राहणार होते. सातवळेकर त्यांस एक आश्रम बांधून देणार होते. तेथें राहून राजवाडे यांच्या मनांतून एक मासिक चालवायाचें होतें. वैदिक, पूर्ववैदिक, उत्तर वैदिक इतिहास यांत येणार होता. ऐतिहासिक व समाज विषयक शास्त्रपूत वृत्तान्त या मासिकांत यावयाचा होता. या मासिकांत दरमहा १०० पानांचा मजकूर ते स्वत:च देणार होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel