“घरी कोण कोण आहेत?”

“मोठा भाऊ आणि त्याची बायको. आता मुलेबाळे असतील. एक बहीण मागे आलेली. दुसरी एक बहीण मी घर सोडले तेव्हा सातआठ वर्षाची होती. तिचे कदाचित लग्न झाले असेल. वडील आमचे मागेच वारले. आई आहे ती माझ्यासाठी कंठात प्राण आणीत असेल. आहे की नाही ते तरी काय माहीत? मी घरीत जातो. भारतमातेचे हिंडून दर्शन घेतले; आता जन्मदात्या आईजवळ जातो. तिच्या सेवेत भारताची सेवा येऊन जाईल.”

“तुला येथे राहणे म्हणजे हृदयवेदना असे वाटत असेल तर तू जाणेच बरे.”

“हो मी जाणेच बरे. घना, तुझी येथे ओळख झाली. मैत्री जडली. पत्र पाठवीत जा.”

“तू जाणार आणि मी येथे राहणार? माझे तरी काय कर्तव्य? तुझ्यासारखे धैर्य, तुझी तीव्रता माझ्याजवळ नाही. आपण कोण-कोठले! थोडे दिवस एकत्र आलो. एवढाच का ऋणानुबंध होता? आणखी नाही का आपल्या भेटीला अर्थ?”

“प्रभू जाणे.”

आता अंधा-या छाया पडू लागल्या, दोघे मित्र संस्थेत आले. इतरांची जेवणे आटोपली होती. सखाराम आणि घना दोघेच राहिले होते.

“रुपल्या, तू जेवलास का?” सखारामने विचारले.

“तुम्ही जेवा, मग मी जेवेन.” तो म्हणाला.

“अरे आमच्याबरोबर ये, बस.”

“नाही दादा, आम्ही मागून बसू.”

शेवटी सखाराम आणि घना दोघेच बसले.


रुपल्या पळून गेला.

दोघे मित्र जेवून गेले. घना आपल्या खोलीत वाचीत बसला. सखाराम बगीचात जाऊन अभंग गुणगुणत बसला. रातराणीचा सुगंध सुटला होता.

सायंकाळच्या गाडीने सखाराम जाणार होता. त्याला आज क्लबातर्फे मेजवाणी देण्यात येणार होती. घनाने सारी तयारी केली. केळीची पाने, रांगोळी,- सारा थाटमाट होता. परंतु आयत्या वेळी रसभंग झाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel