तो म्हणाला, “आज ना उद्या हे प्रश्न उपस्थित झालेच असते. सलग अशा कोट्यावधी लोकांना तरवारीच्या जोरावर कोण कोठवर रोखून धरणार? आपणास गेल्या हजार वर्षांत एकजीव होता आले नाही, ही गोष्ट खरी. संतांनी, ध्येयवादी लोकांनी प्रयत्न केले; परंतु सहा हजार मैलांवरची साम्राज्यसत्ता आली आणि तिने तो पूर्वजांचा समन्वयप्रयोग धुळीला मिळवला. फोडा नि झोडा—यावरच तर साम्राज्यशाही टिकत असते. एकत्र राहून रोज कटकटी असण्याऐवजी दूर होऊनही समंजस राहिले तर चांगलेच म्हणायचे, ही गांधीजींची दृष्टी असावी. दोन देशांत एक आत्मा, एक मन निर्मिण्यासाठी ते सारी शक्ती खर्चतील. आपल्याकडे जे मुसलमान बंधू राहतील त्यांना निर्भय वाटेल असे वर्तन हवे. आपण भारतवर्षाचे दहा हजार वर्षांचे, सर्वांना एकत्र नांदवून बघण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी झटू. आपल्या या लहानशा वसाहतीत आपण तो प्रयोग करीतच आहोत. येथे आपण भूमीच सुपीक करीत आहोत. येथे लाला आहे, कुतुब आहे, अहमद आहे; तसेच रामदास, बाबू, रघुनाथ वगैरे आहेत. येथे स्पृश्य आहेत, येथे अस्पृश्य आहेत. आपण भेदांपलीकडे जाऊन मानवतेची स्थापना येथे करीत आहोत.”

१५ ऑगस्ट १९४७! हिंद स्वातंत्र्य घोषवण्यात आले. त्या वसाहतीत तिरंगा झेंडा फडकविण्यात आला. रानफुलांच्या माळांची तोरणे सर्वत्र लावण्यात आली. नवीन केलेल्या बगीचातील काही फुले त्या माळांत नि तोरणांत होती.

परंतु एकेक विलक्षण वार्ता कानावर येऊ लागल्या. निर्वासितांच्या करुण वार्ता कानावर येऊ लागल्या. कत्तली, मारामा-या. सखाराम खिन्न झाला. देशात शांती यावी म्हणून त्याने तीन दिवस उपवास केला. तो त्यांच्या वसाहतीच्याजवळच एक गंभीर दृश्य त्यांना आढळले. त्या पाहा. काही बैलगाड्या जात आहेत. कोण आहे त्यांच्यात? रामदास नि बापू गेले. ती दहा मुसलमान कुटुंबे होती. ती दूरच्या एका गावची होती. त्या गावच्या लोकांनी, ‘येथून जा’ असे त्यांना सांगितले. काय करतील बिचारे? होते नव्हते ते गाड्यांत घालून जात होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel