रेंगाळत बसण्याची ही वेळ नाही. कधी कधी हजार वर्षांची प्रगती एका क्षणात होत असते. एखादा समाजवादी मंत्री मध्यसरकारात येऊन परिस्थिती सुधारत नसते.

आर्थिक धोरणच जेव्हा नव्याने आखाल तेव्हा काही तरी करता येईल. ह्या सर्व गोष्टींचा गंभीर विचार मनात येतो व भारताचे भवितव्य काय असे वाटून चिंता मनाला ग्रासते. परंतु हा महान देश हजारो वर्षे जगला आहे. त्याचे भलेच होईल असे मनात तर येते. परंतु धैर्याने, प्रतिभिने, व्यापक सहानुभूतीने, मारुतीची पावले टाकत प्रगती करू तरच आशा आहे.

देशाला आज स्वच्छ विचाराची भूक आहे. सर्वांना गोंधळल्यासारखे वाटते. मी पूर्वी काँग्रेस, काँग्रेस असे करीत असे. मरताना ओठावर काँग्रेस नाव असो असे म्हणत असे. परंतु ती काँग्रेस कुठे आहे? जिचे लाखो सभासद व्हावेत म्हणून १९४० साली मी एकवीस दिवस उपवास केला, ती काँग्रेस आज नाही. ती काँग्रेस गेली. आज एक सत्ताधारी काँग्रेस पक्ष आहे.

काँग्रेस म्हणजे भांडवलशाही धोरण १५-२० वर्षे चालवू पहणारी एक पार्टी आहे. ती गरिबांना का आज विसरली? चलेजाव ठरावात म्हटले होते, जे स्वराज्य आणावयाचे ते Toiler in the field and factory -शेतात राबणारा आणि कारखान्यात राबणारा यांच्यासाठी आणावयाचे. मग शेतात राबणार्‍या ना मिळाली का थोडीफार शेती?

श्री. मुरारजीभाई म्हणतात, 'शिल्लक टाका पैसे, काटकसर करा नि घ्या जमीन.' गरीबांच्या दुःखावर डागण्या देऊ नका. १९३९ मध्ये मुरारजींना भेटावयास गेलो होतो. तेव्हाही खानदेशात ओला दुष्काळ होता. एदलाबाद पेटयातील एका पाटलाने गुरे विकून शेतसारा भरला. मी श्री. मुरारजींना सांगितले तर ते म्हणाले, 'एकदा दुष्काळ येताच का गुरेढोरे विकावी लागतात?' मुरारजींना काय माहीत खेडयातील स्थिती? खानदेशात काँग्रेसचे सभासद करीत हिंडत असताना खेडयातील कोणी बंधू म्हणत, 'गुरुजी, उडद घ्या आणि मला सभासद करून घ्या. रोख चार आणे कोठून आणू?' परंतु मुरारजीभाईंना सारी गंमत वाटते. मी खेडयातील जनतेला सांगत असे, स्वराज्यात तुम्हांला थोडी तरी जमीन मिळेल. आज त्यांना हे तोंड कसे दाखवू?

मी माझ्या पदरचे सांगत नसे. आमच्या सरकारला हे का करता येऊ नये? यांना जमीनदारी, कारखानदारी पाहिजे आहे, ते स्वच्छ तसे सांगतात. उत्पादन कसे वाढणार? प्रगतीहीन भांडवलदार का उत्पादन वाढवणार आहेत? त्यांची ती दृष्टी तरी आहे का? उत्पादन वाढले नाही तर वस्तू स्वस्त होणार नाहीत. वस्तू स्वस्त नाही झाल्या तर शेतकर्‍याला धान्याचा भाव कमी मिळतो म्हणून तो अधिक धान्य पिकवावयास तयार होणार नाही.


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel