नागपूर-वर्‍हाडचे लोक म्हणतात, 'मुंबई मिळाली तर आम्ही संयुक्त महाराष्ट्रात समील होवू. मुंबई नसेल तर आम्ही महाविदर्भ स्वतंत्र ठेवू.' मुंबई तर काही केले तरी देणार नाही, असे काँग्रेसी श्रेष्ठींची समिती निक्षून सांगते. म्हणजे महाविदर्भही सामील होणार नाही हे त्यांना दिसत होते. महाराष्ट्राचे तुकडे पाडून ठेवणे यातच काँग्रेसश्रेष्ठींना मोठेपणा वाटतो का? मुंबई देता येत नाही म्हणून महाविदर्भ येत नसेल तर ही घ्या मुम्बई नि संयुक्त महाराष्ट्र उभा करा, अशी उदार नि न्यायी दृष्टी ठेवून काँग्रेसी श्रेष्ठींनी वास्तविक म्हटले पाहिजे. परंतु त्यांना महाराष्ट्राच्या हृदयाची काय पर्वा ? त्यांना मुम्बईचे कोटयधीश प्यारे आहेत. महाराष्ट्रातील कोटयवधी जनतेच्या हृदयाचे तुकडे करून पूंजीपतींच्या चरणी का ते वाहणार? अरेरे, मानवतेचा हा वव आहे.

मुम्बई दिली नाही म्हणजे महाविदर्भही मिळणार नाही. इकडे बृहन्मुम्बई करून ठाणे जिल्ह्याचा भागही कापून घेणार. तिकडे सत्य, अहिंसेचा उपासक गुजरात, महागुजरातची स्वप्ने रंगवीत उंबरगाव वगैरे आक्रमीत येऊ पाहतच आहे. वारली आमचीच भाषा बोलतात. डांगमध्ये आम्हीच असा दावा चालला आहे. वारली लोकांतील ''गुजरात दमणच्या पलिकडे. आम्ही दमण्ये नाही'' ही भाषा या गुजराती आक्रमकांस माहीत नाही वाटते? मोरोली, मांडे वगैरे उंबरगावच्या सीमेवरील भागात ८० टक्के लोक मराठी बोलणारे, परंतु सावकार गुजराती. यांनी आपल्या चार मुलांसाठी शाळा काढायला लावायच्या, त्या असायच्या गुजराथी! आणि दावा सांगायचा की येथे गुजराथी बोली आहे. वारली लोकांची नावे घेतली तर ज्ञानेशाची ओवी, तुकोबाचे अभंग यांची आठवण येते. वारली लोकांना हे सारे समजते. या भागात काही कार्यकर्त्यांनी प्रचारसभा घेतली तेव्हा वारली बंधू सभेत म्हणत, ''यांनी आम्हांला वितभर जमीन ठेवली नाही. आता आमची बोली पण नेणार? जिच्यात पोटातली सुखदुःख सांगणार ती भाषाही मरणार?'' वारलीचे हे करूण गंभीर उद्‍गार काय सांगतात? दमणजवळ इंद्रगड किल्ला आहे. तिकडील शिलालेख मराठीत आहेत. या महाराष्ट्राच्या भागात जुलमाने तुम्ही खाली आलात आणि आता सारेच बळकावू म्हणता? तुम्हाला प्रेमाने आधार दिला त्याचे का हे उपकार?

मुंबई समाचारने लिहिले, शिवाजी महाराजांनी स्थापलेले स्वराज्य ज्यांनी घालवले त्यांना महारष्ट्राच्या वतीने बोलण्याचा काय अधिकार? या समाचाराला विचारावेसे वाटते की, तो अधिकार गांधीजींचे ओठावर नाव खेळवून काळा-बाजार करणार्‍या  लोकांना मिळाला आहे काय? गुजरातमध्ये, खुद्द अहमदाबादेसही लग्नासारख्या समारंभातही पिठाची गाय वगैरे करून मारण्याचा विधी आत्तापर्यंत होता असे म्हणतात. हे कशाचे द्योतक? पिठाची तरी गाय करून मारली पाहिजे ही गुलामी तुम्ही पत्करलीत, तुम्ही महाराष्ट्राला हिणवावे? कोणी कोणाला हिणवू नये. सर्वच प्रातांना थोर इतिहास आहेत. शौर्य, धैर्याची उदाहरणे आहेत. उत्कर्ष, अपकर्ष आहेत. उदयास्त आहेत. मुंबई समाचाराने जरा विवेकाने लिहावे. मुंबई नाहीच मिळू देणार  म्हणून अहमदाबादी काँग्रेसवाले गर्वात आहेत. डांग भागात आम्ही गुजराथी शाळा खोलणारच, गुजराथी प्रचार करणारच, असे गुजराथी काँग्रेसवाले म्हणत आहेत, हे सत्य नव्हे. अहिंसाही नव्हे. भाषा मारणारे तुम्ही का साम्राज्यवादी इंग्रजांच्या जातीचे होणार?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel