सर्वांचा निरोप घेऊन रंगा गेला. तो घरीं आला. सुनदां आईजवळ आला. सुनंदाला किती आनंद झाला !

''रंगा, आपण एके ठिकाणी राहूं. आतां कोठें जाऊं नकोस. येथेंच शान्तिनिकेतन, येथेंच विश्वभारती, येथेंच अजिंठा, येथेंच घारापुरी. भारतांतील सारी कला आंता येथें येईल. तूं नको कोठें जाऊंस.''

''जशी आई तुझी इच्छा. तुझा आनंद तो माझा''

रंगा राममंदिरांत गेला. ते श्रीमंत गृहस्थ तेथेंच होते. दोघांचे संभाषण झालें. रंगा, कुंचले सारें सामान तेथें होतें. कशाची उणीव नव्हती.

''जें लागेल तें मागा. या भिंती सजीव करा, भारताची ध्येयें पुकारणार्‍या करा. तुमच्या बोटांत ती जादु आहे. माझ्या स्वप्नांत रामचंद्रप्रभु आले. म्हणाले दुधगांवला जा. तेथें मंदीर बांध. काय असेल तें असो. मी येथें आलों. हें लहानसें मंदीर बांधलें. येथेंच प्राण जावोत.''

''तुम्हांला आणखी कोण कोण आहेत ?''
''मोठें आहे कुटूंब. परंतु मी सर्वांचा निरोप घेऊन आलों आहे. मुलें पसारा सांभाळतात. तुम्ही उद्यांपासून आरंभ करा. रामनवमीच्या आंत पुरें करा.''

''मी रात्रंदिवस श्रमून पुरें करीन.''

कामाला आरंभ झाला. तें मंदीरच रंगाचें घर झालें. तो घरी फारसा जात नसे. तेथेंच नदींत स्नान करी. ताई त्याचें जेवण घेऊन येत असे. कधीं सायंकाळीं सुनंदा त्याचीं चित्रें बघायला येई. गांवांतील मुलें येत, कामगार येत. इतर मंडळी येई. रंगा रंगलेला असे. त्याला कोणाचा त्रास नसे होत. त्याचें लक्षच नसे. त्याची त्या त्या चित्राशीं जणूं समाधी लागे. अपूर्व चित्रकार !

एके दिवशीं सायंकाळीं थकून रंगा नदीतटाकीं बसला होता. सायंकाळ संपून रात्र पसरली. त्याला भान नव्हतें. त्या अंधारांतच तो होता. जणूं ध्येयाची दैदीपयमान सृष्टि बघत होता.

''रंगा'' कोणी तरी हांक मारली.
परंतु तो जणूं निराळ्या जगांत गेला होता. का भारताच्या अमर परंपरेंत बुड्या मारिंत होता ? कोणी तरी त्याचे डोळे धरले. परंतु ते आधींच मिटलेले होते. तो भानावर आला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel