महात्माजींचा श्राध्ददिन भारतातच नव्हे तर सर्व जगात साजरा होतो. ते भारताच्या द्वारा जगाचीच सेवा करत होते. कारण येथे सर्व धर्म, सर्व संस्कृती. भारत म्हणजे मानवजातीचे प्रतीक. गांधीजी जगाचे हृदय झाले होते. त्यांच्यावरच्या आघाताने सारे जग क्षणभर निर्जीव झाले होते. सा-या जगाने श्रध्दांजली वाहावी  हे समुचितच होय.

श्राध्द अति पवित्र व मंगल वस्तू आहे. कृतज्ञतेची ती मधूर खूण आहे. ज्यांचे आपण श्राध्द करतो त्याला आपण श्रध्दापूर्वक स्मरतो. श्रध्दा चमत्कारजननी आहे. यजुर्वेदात म्हटले आहे की, अदेवाला श्रध्दा देवत्व देते. जो अ-देव आहे, ज्याच्या जीवनात दिव्यता नाही, अशा माणसाला जर अमर श्रध्दा मिळाली तर त्याचे जीवन ज्वलंत होते. ते दैवी होते. श्रध्दा ध्येयाकडे घेऊन जाते, ध्येयाचा ध्यास लावते. सारे जीवन धगधगीत, रसरशित होते. मग अन्य काही सुचत नाही, रुचत नाही.

तुका म्हणे व्हावी, प्राणासवे ताटी
नाहीतरी गोष्टी, बोलू नये

महात्माजींना श्रध्दांजली म्हणजे त्यांनी दिलेल्या ध्येयाला श्रध्दांजली. आज सर्वोदय, समन्वय अनेक शब्द उच्चारले जात आहेत. सर्वांचा उदय व्हावा, सारे सुखी व्हावेत म्हणून प्राचीन ऋषीपासून, ऋषीश्वरांपासून सारे सांगत आले, परंतु केवळ शब्दोच्चाराने सारे सुखी कसे व्हायचे, हा प्रश्न आहे. सर्वांचा उदय व्हावा म्हणूनच स्वराज्य हवे होते, परंतु सर्वांच्या उदयाची तीव्रता आपल्याला लागून राहिली आहे का ?  भांडवलदारांना शतसवलती देऊन, आणखी काही वर्षे तुमचे कारखाने राष्ट्राचे होणार नाहीत असे आश्वासन देऊन त्यांचा उदय सुरक्षित केला जात आहे. गरिबांचे काय ? हा प्रश्न आहे.

महात्माजींनी स्वराज्यात चार गोष्टी हव्यात म्हणून लिहिले होते (1) आर्थिक समता (2) सामाजिक समता (3) धार्मिक समता  (4) लोकशाही. सरकारचे धोरण पसंत नसले तर शांततेने विरोध दाखवायला परवानगी. या चार गोष्टी अजून किती दूर आहेत, हे पाहिले म्हणजे दु:ख होते, वेदना होतात.

दिल्लीला महात्माजी म्हणाले, ' एक दिवसही स्वतंत्र हिंदुस्थान आर्थिक विषमता सहन करणार नाही. 'परंतु आज काय दिसते ?  शेतक-याला दिलीत जमीन ? काटकसर करून विकत घे, असे सांगणे म्हणजे सर्वोदयी श्रध्दा नव्हे. शेतमजुराजवळ मालकीची जमीन नाही. त्याच्याजवळ दोनचार बिघं जमीन विकत घेण्याइतके पैसे कधीही साठणार नाहीत, चलनवाढीची सबब न सांगता जमीनमालकाला दीर्घ मुदतीची सेव्हिंग्ज सर्टिफिकिटे द्या आणि शेतमजुराला जमीन द्या. कानावर आले की कोणी काँग्रेसचे बडे अधिकारी म्हणाले, 'पुढच्या निवडणुकीनंतर हे करावयाचेच आहे.' तुमच्या पुढच्या निवडणुकीसाठी आज या लोकांना असेच सडतपिचत ठेवणार होय ?  गरिबाच्या चितेची होळी पेटत ठेवून त्यावर भावी निवडणुकांची भाकर भाजणार ? दुस-यांना सत्तालोलुप म्हणणा-या या लोकांची ही सत्ता टिकवण्याची कारस्थाने पाहिली की किळस येते !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel