जीवन हें परम पुरूषार्थासाठी आहे. परम पुरूषार्थ प्राप्त करून घेण्यासाठीं आपण आपली सारी शक्ति  इतरत्र न खर्चितां जरी ओतली तरी अपुरीच पडेल. शेवटी प्रभुला शरण जाऊन त्याची करूणा भाकावी लागते. शेवटी प्रार्थनेचें बळ मदतीस घ्यावें लागते. अशी जेथें परिस्थिति आहे, तेथें आपण आपली शक्ति वारेमाप क्षुद्र गोष्टींत का खर्च करीत बसावें?

विवेकानंद जर वायफळ गोष्टी करीत बसले तर श्रीरामकृष्ण परमहंस रागवावयाचे व म्हणावयाचे “तूंहि का क्षूद्र काथ्याकूट करीत बसलास ? “विवेकानंदांनी सर्व शक्तिचा संचय केला. ब्रह्मचारी राहिले. यांना अगम्य असें कांही नसे. एकदां जर्मन पंडित डायसन याकडे ते आले होते. तेथें एक पुस्तक होतें. विवेकानंदांनी तें भराभरा सारें चाळले. पुढे डायसनजवळ बोलतांना त्या पुस्तकांतील ते उतारे देऊं लागले. डायसन चकित झाला. त्यानें विचारलें “हे पुस्तक केव्हां वाचलेंत ?” विवेकानंद म्हणाले “मघां.” इतक्यांत कसें वाचून झालें?” मी परिच्छेदच्या परिच्छेद वाचतो.” विवेकानंद पॅरिग्राफच्या पॅरिग्राफ वाचीत. लहान मुल एकेक अश्रर वाचतें. आपल्या डोळ्यांत सबंध ओळ एकदम भरते. परंतु विवेकानंदाचे डोळे सार परिच्छेद एखदम वाचीत. ही शक्ति कोछून आली? मनाच्या एकाग्रतेंतून. ब्रह्मचर्यांतून. त्यांनी आपल्या शक्तिचा प्रचंड संचय करून ठेवला होता.

लोकमान्यांवर किती संकटें, किती कारागृहवास ! डॉं भांडारकर एकदां म्हणाले “लोकमान्यांवर संकटें आली तशी माझ्यावर आली असती तर मी केव्हांच चिरडून गेलों असतो.” लोकमान्यांना ही शक्ति कोठून मिळाली? त्यांच्या संयमांतून. एक स्त्री अर्ज लिहून यासाठी त्यांच्याकडे आळी. परंतु वर मान करून त्यांनी तिच्या चेह-याकडे पाहिलें नाही. म्हणून नेव्हिन्सन या पत्रपंडितानें लिहिलें आहे. “लोकमान्यांच्या डोळ्यांत जशी जमक होती तशी मी कोणाच्याहि डोळ्यांत पाहिली नाही.” तेज कोठून आलें? फाल्तु पसा-यांत सुखोपभोगांत त्यांनी आपली शक्ति दवडली नाही.

महात्माजींनी वयाच्या छत्तिसाव्या वर्षापासून ब्रह्मचर्य पाळलें आहे. त्याच्या आधीपासूनच त्यांची धडपड सुरू होती. एकदां सीलोनमध्यें महात्माजी गेले होते. बरोबर कस्तुरबा होत्या. ओळख करून देणारा सभेंत म्हणाला “ आज महात्मा गांधी आले आहेत. बरोबर त्यांच्या ‘मातृ:श्री’ कस्तुरबा आहेत” पुढे भाषण करतांना महात्माजी म्हणाले माझी ओळख करून देणारे मित्र थोडे चुकले. कस्तुरबा माझ्या पत्नी आहेत. परंतु एवढे खरें. की आज कित्येक वर्षें मी त्यांच्याकडे माता या दृष्टीनें पहात आलो आहें.” महात्माजी एवढ्या म्हातारपणी राष्ट्राचा प्रचंड बोजा कोणत्या शक्तीच्या जोरावर उचलतात तें लक्षांत आणा.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel