माझ्या महान महाराष्ट्राला-मर्यादशील महाराष्ट्राला-एक स्वातंत्र्य असले म्हणजे बस्स आहे. मग तो हातावर हुरडा चोळून खाईल व देवाच्या अमृताला तुच्छ मानील, कोंडयाची भाकर खाईल व पहाडात सिंहाप्रमाणे हिंडेल. अंगावर चिंधी घालून सम्राटाला हसेल. फाटकी झोपडी मयूरासनाहून मोलाची मानील.''

अशा आशयाची पंधरा दिवस ती व्याख्याने झाली. शुक्ल पक्षातील चंद्राची एकेक कला वाढत पंधराव्या दिवशी पूर्ण चंद्र फुलतो, तसे ते शेवटचे समारोपाचे व्याख्यान झाले. महाराष्ट्रीय संस्कृतीच्या पूर्णचंद्राचे निष्कलंक रूप पाहून भावनाप्रधान बंगाली हृत्सिंधू हेलकावला, उचंबळला, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी फुलांचे, सुतांचे सुंदर हार मुकुंदरावांना घातले. ते दृश्य अपूर्व होते. प्रांताची प्रांताला ओळख होत होती. महाराष्ट्रीय आत्मा वंगीय आत्म्याला भेटत होता. ती जिवाशिवांची भेट होती. चैतन्य चैतन्याला भेटत होते.

ती कोण मुलगी? उंच व सडपातळ अशी हातात हात घेऊन तेथे येऊन उभी राहिली. जणू थरथरणारी भावनामय ज्वाला ती दिसत होती. तिचे डोळे उत्कंठेने, एक प्रकारच्या अनुपम तेजाने नाचत होते. तळपत होते. ती उभी राहिली. परंतु शब्द बाहेर फुटेना. तिच्या तोंडावरचे भाव जणू शत जिभांनी बोलत होते.

परंतु शेवटी वाणी बाहेर पडली.

''मला बंगालचा फार अभिमान वाटे. आपल्या प्रांताचा सदाभिमान असावा, परंतु त्याचा अर्थ दुसर्‍याला तुच्छ मानणे नव्हे. मला वाटे, बाकीचे सारे प्रांत भिकारी आहेत. भावनाश्रीमंत बंगाल धीमंत, कलावंत, कीर्तिमंत बंगाल, तो निस्तुल आहे असे वाटे. अहंकाराने ज्ञान दुरावते. नम्रता हा ज्ञानाचा आरंभ आहे. सहानुभूतीची किल्ली घेऊन परप्रांतांची हृदयकपाटे आपण खोलून पाहू तर तेथे अवीट अक्षय संपत्ती मिळेल, महाराष्ट्राच्या आत्म्याची भेट घडवणार्‍या, या आचार्यांचे कसे आभार मानावेत? त्यांची भाषणे ऐकताना वाटे की, आपले चिमुकले हात पसरावेत व त्या दूरच्या महाराष्ट्राला मिठी मारावी. आपले हात पसरावेत व महाराष्ट्राचे खंबीर पाय गंभीर भक्तिभावाने धरून ठेवावेत. विश्वभारती आज कृतार्थ झाली.  गुरुदेव आम्हाला जगाची ओळख करून देत आहेत. भारताशी विश्वाचा संबंध जोडीत आहेत. परंतु भारतातील प्रांतांशीच अजून पुरे संबंध जोडायला हवे आहेत. भारतातील या भावांचीच एकमेकांशी खरी ओळख करून द्यायला हवी आहे. तरच आपला हा प्यारा भारत असे आपण म्हणू शकू. 'वंदे मातरम्' मंत्र तेव्हाच सार्थ होईल, महाराष्ट्राच्या मंगलमय आत्म्याची भेट घडविणार्‍या हे सदगुरो, हा घ्या बंगाली फुलांचा हार. बंगालच्या या कोमल भावना महाराष्ट्रीय आत्म्याच्या गळयात नेऊन घाला.''

सभा संपली.

''तुम्ही किती सुंदर बोललात ! जणू बंगालचा आत्मा तुमच्या रूपाने बोलत होता.'' रामदास त्या मुलीजवळ जाऊन म्हणाला.

''तुमचे आचार्य जाणार आहेत. तुम्ही आहात इथे. महाराष्ट्रीय आत्म्याची अधिक ओळख तुम्ही करून द्या. महाराष्ट्रीय आत्म्याचे अमर संगीत तुमच्या दिलरुब्यातून ऐकवा.'' माया म्हणाली.

''मी दिलरुबा वाजवतो. तुम्हाला काय माहीत?'' रामदासने विचारले.

''मला कान आहेत व डोळे आहेत.'' माया म्हणाली.

''तुमचं नाव काय?'' रामदासने विचारले.

''माया.'' ती म्हणाली.

''तुमचं नाव काय?'' तिने विचारले.

''रामदास.'' तो म्हणाला.

''मायेला जिंकून घेणारे रामदास !'' ती म्हणाली.

''मायेला जिंकून घेणारा मी समर्थ रामदास नाही. मायेमुळे रडणारा मी दुबळा रामदास आहे.'' तो म्हणाला.

''दुबळा व रडका महाराष्ट्र मला नको.'' असे म्हणून माया वेगाने निघून गेली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel