''हैद्राबाद सत्याग्रह का अन्याय्य होता?'' दुसर्‍याने विचारले.

''अरे, आधी कमी गुंतागुंतीच्या संस्थानात प्रयोग करू या. ज्या संस्थानातून आधीच शेकडो सत्याग्रहींनी प्रचार केलेला आहे, जी संस्थाने छोटी एकजिनसी आहेत, जेथे एक भाषा आहे, तेथे चळवळ करू या. त्या चळवळीचा परिणाम दुसर्‍या बडया संस्थानांवर होतो.''

''केसातील जटा मोडायच्या असल्या तर थोडे-थोडे केस हातात घेऊन खालून हळूहळू फणी मारीत बायका जातात. एकदम वर फणी घालीत नाहीत. तेलगू, तामीळ, कन्नड, उर्दू या पाच भाषांचा आतापर्यंत प्रचार नाही. खेडयापाडयास स्पर्श नाही. म्हणून महात्माजी म्हणाले, ''विधायक काम करा, खादी घ्या व खेडयातून हिंडा. स्वच्छता निर्मा, साक्षरता करा.' अशानं जनतेशी संबंध येतो, त्यातून विचारप्रसार होतो. चैतन्य येऊ लागतं. तुम्हाला हैद्राबाद सत्याग्रह पाहिजे होता, परंतु कोल्हापूर सत्याग्रह सुरू झाला तर तुमच्या निषेधाच्या तारा की, छत्रपतींच्या राज्यात सत्याग्रह नाही होता कामा. याचा अर्थ काय? तुम्ही केवळ अन्यायाच्या विरुध्द नाही. आम्ही अन्याय कोणीही करो, तो दूर करू इच्छितो.  महात्माजींनी म्हणे राजकोटला प्राण पणाला लावले ! अरे, त्या महापुरुषाला का आसक्ती आहे? त्यांचं आतडं नाही रे कोठे अडकले? आंध्र प्रांतात दौर्‍यावर असताना एका चित्रकारानं त्यांना त्यांची स्वहस्ते काढलेली तसबीर दिली. महात्माजी म्हणाले, 'ही कोठे लावू ! माझ्या देहाची खोळही मला आता जड होऊ लागली आहे. ही तसबीर कोठे बाळगू? तुकाराम महाराज म्हणाले होते :

उद्योगाची धाव बैसली आसनी
पडले नारायणी मोटळे हे ॥


त्याप्रमाणे आता हा देह हरिचरणी पडो, दरिद्री नारायणाची सेवा करताना पडो, असं ज्याला वाटतं, त्याला आसक्ती? अरे, ज्यानं हिंदुस्थानची मान वर केली, हिंदुस्थानात माणसं राहतात असं जगाला कळविलं, लाखो बेकारांना काम दिलं, शिक्षणाची नवी दिशा दाखविली, राष्ट्रीय भाषेला चालना दिली, हरिजनांना जवळ घेतलं, स्त्रियांचा आत्मा जागा केला, खेडयापाडयांत चैतन्य ओतलं, अरे, त्याचे केवढे उपकार ! आपल्या कातडयाचे जोडे त्यांच्या पायी लेववू तरी ते ऋण फिटेल का? पूज्य विभूतींच्या पूजा न केल्यानं आपलं श्रेय दुरावतं. गडयांनो, मोठया मनाचे बना, क्षुद्रता जाळा. प्रांतीय भेद गाडा. भारतात कोठेही पुढारीपणा असो, ते आपलंच आहे; सारा भारतवर्ष माझा. किती मी सांगू?''

मुकुंदराव पुन्हा शांत राहिले. पुन्हा त्यांना उमाळा आला व म्हणाले,''भाषेचीही आमची भांडणं. हिंदी संस्कृतप्रचुर हवी की उर्दूदुर्बल हवी? अरे, समोरच्या लोकांना समजेल अशी हवी. सरहद्दप्रांतात गेले तर उर्दू शब्द अधिक वापरा; गंगातटाकी कमी वापरा.''

''बहुजनसमाजाला उर्दूप्रचुर व संस्कृतप्रचुर दोन्ही समजणार नाहीत. देवानं हास्याची व अश्रूंची विश्वव्यापक भाषा निर्माण केली. अश्रू उर्दू नाहीत, संस्कृत  नाहीत. हास्य लॅटिन नाही, ग्रीक नाही. आपला देश मोठा चाळीस कोटींचा, दोन चारभाषा शिका. निरनिराळया भाषांतील शब्द शिका. दोन लिप्या असतात की नाही? असू देत. मोठा संसार आहे आपला. अहंकारानं मोठं कुटुंब चालत नाही. आपला एकत्र कुटुंब पध्दतीचा प्रयोग आहे. सारे प्रांत म्हणजे भाऊ, सारे एकत्र राहू. भावाभावांत मिळते घेईल तो मोठा, त्यात कमीपणा आहे. ती शरणागती नाही. इंग्लंडमध्ये शिष्टमंडळे पाठवणे हा मात्र कमीपणा आहे. त्याची लाज वाटली पाहिजे. माझ्या देशात राहिले त्यांच्याशी पुनःपुन्हा बोलणं-चालणं करणं, यात कसला कमीपणा?''

ते दोघे तरुण ऐकत होते. ढेकळाप्रमाणे ते विरघळले. मुकुंदराव पुन्हा म्हणाले, ''तुम्ही कवाईत करा. सरळ उभे राहा. शिस्तीचे महत्त्व पटवा. शरीर बळकट करा. परंतु बुध्दीला एखाद्या संबंध जातीच्या द्वेषाचं खाद्य देऊ नका. तुमच्यातील काही 'तू माणूस आहेस की मुसलमान आहेस?'' असा शब्दप्रयोग करू लागले आहेत. 'माणूस आहेस की जनावर आहेस?' असं म्हणण्याऐवजी हा प्रयोग ! अरे, सारे मुसलमान का जनावरे? केवढा द्वेष ! केवढा अधःपात ! तुम्ही तरुण निर्मळ मनाचे, निर्मळ दिलाचे. हे सारं बरबट फेकून नवभारताचं उज्ज्वल भविष्य डोळयांसमोर ठेवून उभे राहा.''

ते तरुण प्रणाम करून उठले. मुकुंदरावांनी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला.

जाताना कोणी बोललं नाही. त्यांनी मुकुंदरावांकडे पाहिले. मुकुंदरावांनी त्यांच्याकडे पाहिलं. विचारानं मस्तक विनम्र करून जीवनानं भरलेल्या मेघाप्रमाणे ओथंबून ते गेले. मुकुंदराव बाहेर येऊन अनंत आकाशाखाली उच्च विचार व उदात्त भावनांनी सद्गदित होऊन उभे राहिले होते. आजचा अमर दिवस असे त्यांना वाटले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel