आणि भारताचे महान भूषण भगवान बुद्ध जन्माला आले. श्रीकृष्णाने गाय वाचविली. बुद्ध भगवान कोकराला वाचवू लागले. धर्माच्या नावाखाली तरी पशुहत्या करू नका असे त्यांचे सांगणे असे. “अशा बलिदानाने स्वर्ग कसा मिळेल? मग आपल्या भावांचाच बळी द्या. म्हणजे फार मोठा स्वर्ग मिळेल. स्वत:चाच बळी द्या.” असे ते सांगत. ज्या यज्ञात शेकडो कोकरांचे हनन व्हावयाचे होते, त्या ठिकाणी कारुण्यसिंधू बुद्ध जाऊन उभे राहिले. एक लंगडे कोकरू त्यांच्या खांद्यावर होते. प्रेममूर्ती बुद्धांनी राजाचे मन वळविले व ते हनन बंद केले.

बुद्धांनी यज्ञीय हिंसा जरी बंद केली, तरी मांसाशन सुटले नाही. कारण दुधासाठी, खतासाठी शेळ्या-बक-या माणूस पाळतो. परंतु बोकड व बकरे हे काही शेतीच्या कामाला येत नाहीत. त्यांना पोसणे म्हणजे जड काम. ते पोसणे काही मोबदला देत नाही. यामुळे त्यांना मारतो व खातो. शेळ्या व बक-या पाळणे सोडून दिले पाहिजे, किंवा बकरे-बोकड यांजकडून काही उपयोगी काम करून घेण्याची युक्ती शोधली पाहिजे. या दोन्ही गोष्टी जोपर्यंत होत नाहीत. तोपर्यंत बकरे-बोकड कापले जाणार हे उघड आहे.

वेदांतील ऋषी, श्रीकृष्ण, भगवान बुद्ध, श्रीमत् महावीर यांच्या दिव्य कार्यामुळे अहिंसेचा महिमा अपार वाढला. मांसाशनाची माणसास लाज वाटू लागली. मांसाशन हे भूषण आहे असे वाटेनासे झाले. खाण्यासाठी पशू मारावयाचाच असेल तर तो गाजावाजा करून, सोहळा करून तरी निदान मारू नका. माणसास हे शोभत नाही. नवीन पिढीच्या, मुलाबाळांच्या देखत देखत तरी नका मारू. बोकड मारावयाचा असेल तर

‘असंदर्शने ग्रामात्’

‘गावापासून दूर, कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी मारा’, असे सूत्रकार सांगू लागले.

यज्ञीय हिंसा बंद होऊ लागली. परंतु यज्ञात बोकड हा पाहिजेच अशी काहींची भावना होती. ऋषी म्हणू लागले, “पिठाचा बोकड करा व मारा.” “पिष्टमयी आकृति: कृत्वा” अशी सूत्रे रचिली जाऊ लागली. यज्ञाच्या वेळेस पौष्टिक सातूच्या पिठाचे बोकड बनविण्यात येऊ लागले व त्या पिष्टमय आकृतींचे भाग यज्ञात हविले जाऊ लागले.

श्रावणी करताना आपण सातूच्या पिठाच्या गोळ्या खातो. हा त्या प्राचीन मांसाशननिवृत्तीच्या प्रयोगातील भाग आहे. पौष्टिक मांसाशनाऐवजी कोणते पौष्टिक अन्न देता येईल याचा विचार सुरू झाला. गाईचे तूर खा, सातूचे पाठ खा, तसेच देवांनाही यज्ञात द्या, असे प्रयोग करणारे सांगू लागले. लाखो; कोट्यावधी लोकांना मांसाशयनापासून परावृत्त करणे ही सोपी गोष्ट नव्हती. लोकांचे समाधान करणे कठीण होते. देवाला बोकडच पाहिजे असा हट्ट धरणा-या आडमुठ्यास ‘पिठाचा बोकड कर, बोकड असला म्हणजे झाले’ असे कसे तरी बाबापुता करून समजावून सांगण्यात आले. काही बुद्धिमान प्रयोग करणा-यांनी देवाला नारळ द्यावा अशी उपाययोजना सुचविली. नारळ म्हणजे विश्वामित्राच्या सृष्टीतील मनुष्य. कदाचित नरमेध करणा-या लोकांना परावृत्त करण्यासाठी विश्वामित्र वगैरे लोकांनी नारळाचा मनुष्यबळी द्या असे लोकांना सुचविले असेल. “ही पाहा नारळाची शेंडी, हे पाहा नारळाचे डोळे” असे अडाणी लोकांना समजावून सांगण्यात आले असेल. माणसाचे मुंडके कापून ते त्याच्या केसांनी हातात धरून त्यातील रक्ताचा देवावर अभिषेक करावयाचा, ते मुंडके देवासमोर टांगून ठेवावयाचे, बाकीचे धड भाजून खावयाचे, असा प्रघात असावा. देवापुढे नारळ फोडण्यास योग्य नसतो. नारळ फोडावयाचा, त्यातील पाणी देवावर उडवावयाचे, एक कवटी देवापुढे ठेवावयाची; कोठे कोठे देवीसमोर नारळाची एक करवंटी टांगण्यात येते. उरलेली फोडून वाटण्यात येते. नारळ पौष्टिकही आहे. हे नारळाचे बलिदान ज्याने शोधून काढले, त्या कल्पनेची धन्य होय! नारळाच्या बलिदानाने नरमेध बंद झाले असतील.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel