परीक्षक :- मग मनुष्याचा खरा दागिना कोणता ?

मी :- चांगले वागणे.

परीक्षक
:- बरोबर ! हात दुस-याच्या उपयोगी पडण्याने शोभतो. कान चांगल्या गोष्टी ऐकल्याने शोभतो. तुझ्या या भिकबाळीने कान काही शोभणार नाही. हात कडीतोडयाने शोभणार नाहीत. कडीतोडे म्हणजे एक प्रकारची बेडीच ती.

हेडमास्तर :- बेडी म्हणजे काय श्याम ?

मी :- चोराच्या हातात शिपाई घालतात ती.

परीक्षक :- मग अशा बेडया घालणे तुला आवडते का ?

मी
:- नाही.

परीक्षक :- तर मग ह्या बेडया काढून टाक. खरोखरच जर तुला आवडत नसतील तरच काढ. अशी प्रश्नोत्तरे झाली. आम्हाला  सुट्टी देण्यात आली. उरलेली परीक्षा दुस-या दिवशी होणार होती.

मुले माझी थट्टा करीत होती, 'श्याम बायको रे बायको !' असे मला हिणवीत होती. मी रडवेला झालो व घरी आलो. मी आईला म्हटले, 'आई ! मी आता जातो बाळशेटकडे व कडीतोडे काढून टाकतो. ही भिकबाळीही काढून टाकतो. मला का ग घातलेस दागिने ?'

आई म्हणाली, 'तुलाच तर हवे होते. भिकबाळीसाठी तूच नव्हता का श्याम हट्ट धरलास ? जा. नको असतील तर काढून घे.'

मी बाळशेटाकडे गेलो. ते घरात नव्हते. त्यांचा मुलगा सीताराम घरी होता. त्याने मला विचारले, 'श्याम काय पाहिजे ?'

मी म्हटले, 'माझे कडीतोडे काढा. ही भिकबाळीही काढा.' त्याने काढून दिली. मी घरी आलो. मला खरोखरच आनंद झाला. माझे हात अगदी हलके वाटू लागले. मित्रांनो, दागिने घालणे म्हणजे केवळ रानटीपणा आहे, हे आज मला पूर्णपणे समजत आहे. एकाला घरात खावयास नाही तर दुसरा सोन्या-मोत्यांनी नटत आहे, हे मला तरी पहावत नाही. ज्या राष्ट्राला स्वातंत्र्य नाही त्या राष्ट्रातील दासांनी अलंकारांनी नटावे, यासारखी लाजिरवाणी दुसरी कोणती गोष्ट आहे ? कुत्र्याच्या कानात भिकबाळी घातली तरी कुत्री ती कुत्रीच ! त्यांना सिंहाचा मान थोडाच मिळणार आहे !

स्वातंत्र्यासाठी सर्व दागदागिने अर्पण केले पाहिजेत. देशातील दारिद्रय दूर करावयास ते दिले पाहिजेत. न्यायमूर्ती रानडे गळयातील ताईत लहानपणी सद-याच्या आत लपवून ठेवीत. ते म्हणत, 'गरीब विद्यार्थ्याने पाहिले तर त्याला नाही का वाईट वाटणार ?'

जे सर्वांना मिळेल तेच घ्यावे. जे सर्वांना उपभोगता येईल तेच उपभोगावे. म्हणजे द्वेष, मत्सर समाजात फार वाढणार नाहीत. गोपाळकृष्णाचे चरित्र पहा. गोपाळकृष्ण नंद राजाचा मुलगा होता; परंतु गोपाळकृष्णाने हिरेमाणके अंगावर घातली नाहीत. गोपाळकृष्णाचा एकच दागिना होता. तो म्हणजे मोराची पिसे आणि वनमाळा. कृष्ण सोन्यामोत्यांनी नटू शकला असता; परंतु गरीब पेंद्याला कोणी दिली असती हिरेमाणके ? कृष्ण ख-या समानतेचा भोक्ता होता. रानातील देवाघरची फुले सर्वांना मिळू शकतील. कृष्ण व त्याचे सोबती वनातील वन-फुलांनी सजत आणि रानात मोराची गळून पडलेली पिसे गोळा करुन त्यांचे मुकुट, कृष्ण व त्यांचे सवंगडी डोक्यांवर घालीत. सर्वांच्या शिदो-या एका ठिकाणी करुन सारे जण खात. वाजवावयास बांबूची बासरी, साधी व सुलभ. ती सर्वांना मिळे. असा हा ऐक्याचा, प्रेमाचा, समानतेचा आनंद कृष्णाने निर्माण केला. म्हणून तर म्हणतात,

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel