वसंता : मागें तरी सोन्यामारुति नांवाचा कितीसा फायदा झाला म्हणा! काय रे वेदपुरुषा! लोकशाही मंत्र्यांनीं तुरुंगांतील राजकीय पुढारी सोडले म्हणतात !

वेदपुरुष : परंतु यांच्याच कारकीर्दीत दुसरे शेंकडों तुरुंगांत डांबले जात आहेत! काय आहे दोन तीन थोरांना सोडलें त्याची किंमत! आणि खरें सांगूं का, राष्ट्रांची विटंबना करणार्‍या कडून आपल्या सत्पुत्रांची मुक्ति व्हावी असे भारतभूमीस वाटत असेल का ? लाठीमार होत असतांना जो राजीनामा देत नाहीं, आणि तुरुंगांतील दोन पुढारी जे सुटावयाचेच होते, ते जो सोडतो त्यांत काय अर्थ आहे ?

वसंता : खरे म्हटलें तर या सोन्यामारुति सत्याग्रहांत अटीतटीनें सर्वांनी पडलें पाहिजे होतें. घरेंदारें जप्त होवोत, पेन्शनें जावोत, प्रेस जावोत, कांहींहि होवो. अशा त्यागाची पराकाष्ठा होती का रे सर्वांच्या मनांत? छापखाने जप्त होतील, घरेंदारें जातील, पेन्शने बंद होतील, असें भय सत्याग्रहांत नसतें.

वेदपुरुष
: गांधींसारख्या वेड्यापीराच्या सत्याग्रहासाठीं सर्वच पणाला लावावें लागतें. सर्व छापखाने, सर्व संस्था, आश्रम यांवर तिलांजलि द्यावी लागते. वुण्याला हा सत्याग्रह विशेषेंकरून कोणाहि पुढार्‍याला मनांत तरी फारसा महत्त्वाचा वाटत नाहीं. हळूच घाट काय वाजवतात, खुळखुळे काय वाजवतात,  आणि बोलतात काय ? सारा पोरकटपणा आहे.

वसंता : असें कसें तुम्ही बोलतां! हा त्या शेंकडों व्यक्तींचा अपमान आहे.

वेदपुरुष : मी सर्वज्ञ आहे. सर्वांच्या अंतरंगीं मी असतों. धर्माचा पुळका कोणाहि प्रतिष्ठित पुढार्‍याला फारसा आलेला नाहीं. धर्माची स्फूर्ति सार्‍या राष्ट्राला पेटवते. पुण्यांतील लोकांनाहि जी वस्तु प्रखरतेनें पेटवीत नाहीं, ती का महत्त्वाची मानावयाची ? पुण्याला सारें रोजचें नीट चाललें आहे.

वसंता : पुण्यांतील शेंकडों स्वयंसेवक काय करीत आहेत ?

वेदपुरुष
: ते आजच्या या सत्याग्रहासाठीं नाहींत. आजचा सत्याग्रह महत्त्वाचा आहे असें त्यांस वाटत नाहीं. त्यांचें लेफ्टराइट सुरु आहे. कांहींची दुधकी लोटी व रसका ग्लास सुरु आहे. कांहीं विहिरींत पोहत आहेत, कैर्‍या खात आहेत. कांहीं जमनादासांना सलामी देत आहेत !

वसंता : घरोघर सत्याग्रहाची चर्चा आहे कीं नाहीं ?

वेदपुरुष
: सोन्यामारुति सत्याग्रहाची चर्चा फारशी कोठेंहि नाहीं. त्यासंबंधीं ठायींठायीं व्याख्यानें नाहींत, प्रवचनें नाहींत. शिक्षा वाढायची एखादी! सोन्यामारुतीशीं सत्याग्रह करणारे शांतपणें गीतेवर म्हातार्‍यांसमोर प्रवचनें देत आहेत, ज्ञानेश्वरीवर व संतवाङमयावर तल्लीन होऊन बोलत आहेत. परंतु ''उद्यां सोन्यामारुतीसमोर माणसें असाल तर जा'' असें एकहि धर्मरक्षक पीळ पडून बोलत नाहीं.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel