कल्याण : आतां भूक लागली असेल ?

चंदन : आमच्याकडची भाकर आणूं ? तुम्ही खाल ?

कल्याण : गांधींना सारें चालतें.

वसंता : भाकरी नसती तरीहि चालतें.

चंदन : मला उजडत भाकर लागते, म्हणून आई रात्रीची ठेवून देते. ती शिल्लक असेल, मी घेऊंन येतों.

कल्याण : थोडी चटणी पण आण.

चंदन
: तुम्ही चटणी खातां ? मागें एक गांधी आला होता, तो नसे खात.

वसंता : कांदे घेऊन ये.

चंदन : किती लांब आहे त्याचें घर ?

कल्याण : आतां येईल पळत पळत.

वसंता : तुला लिहावाचायला येतें ?

कल्याण : दोन बुकें झालीं व उठलों. थोडें येतें वाचता.

वेदपुरुष : फौजदार वरचेवर येतो का ?

कल्याण : त्याचा या गांवावर राग आहे. मागें आणेवारीच्या वेळेला गांवांतील लोक मामलेदाराला खूप बोलले. त्याच्या तोंडावर बोलले. तेव्हांपासून फौजदार नेहमीं येतो. दटावतो.

वसंता : लोक भितात का ?

कल्याण : मनांतून जळफळतात.

वेदपुरुष : चंदन, किती पळत आलास ?

चंदन : घ्या भाकर, हे कांदे. हा पाण्याचा लोटा भरून आणला आहे.
वसंता व वेदपरुष खाऊ लागले.

चंदन : आई म्हणाली त्यांना जेवायलाच कां आणलें नाहींस ?

वसंता : मग काय सांगितलेंस ?

चंदन : सकाळीं राहिले तर आणूं , मीं म्हटलें.

कल्याण : तुम्ही रहाल ?

वसंता : नाहीं. आम्हांला गेलें पाहिजे.

चंदन : तुम्ही कोठें जाणार ?

वसंता : येथून जवळ कोणता गांव आहे ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel