वसंता : किती छान अभंग आहे !

वेदपुरूष : हा कोणत्या गाथेमधला, माहीत आहे का ?

वसंता : कोणत्या बरें ?

वेदपुरूष : या मुलाच्याच गाथेंतील.

वसंता : हा का कवि आहे ?

वेदपुरूष : होय. त्याचा बाप वारकरी आहे. शेंकडों त्याला पाठ येत आहेत. या मुलाचें नांव ग्यानबा.

वसंता : खरोखरच मग ग्यानबा आहे म्हणायचा.

वेदपुरूष
: जगाला अज्ञात ग्यानबा. तुमच्या मासिकांतून प्रेमाच्या रद्दड कविता शब्दांच्या प्राणघेण्या दगडांच्या राशींतून बाहेर पडत असतात; परंतु हे हृदयाचे, अनुभवाचे अमोल बोल, कोण छापणार! कोण ऐकणार ? हे अभंग कोण गाऊन दाखवील ? कोण टाळ्या मारील ?

वसंता : त्यानें विठीला पाणी आणलें आहे.

विठी : ग्यानबा! आतां मरावेंसें वाटतें.

ग्यानबा : असें म्हणूं नये. हें पाणी पी.

विठी : तूं थोडी भाकर खा.

ग्यानबा : कोणीं दिली भाकर ?

विठी : वाघ्यानें.

ग्यानबा : होय रे वाघ्या ? आपल्यासाठीं देवानें वाघ्याचा अवतार घेतला आणि आपण का मरायचें ? वाघ्याला किती वाईट वाटेल ?

विठी : तूं आज काय खाल्लेंस ?

ग्यानबा : अजून खाल्लें नाहीं. परंतु चिंचेचा पाला आणला आहे. चल घरीं. अशी नको येथें पडूं. तुझें लेंकरूं मी घेतों.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel