प्रश्नोत्तरें  ३

[आगगाडींतून जातांना कांहीं लोकांनी निरनिराळे प्रश्न विचारले.  त्यांची मी जी उत्तरें दिलीं तीं खाली देत आहें.]

प्रश्न :-- सुभाषबाबूंच्या बाबतींत अन्याय झाला असें आपणांस वाटतें का?
उत्तर :--  सुभाषबाबूंच्या बाबतींत जास्तीत जास्त कोणी अन्याय केला असेल तर त्यांना निवडून देणारांनी, सुभाषबाबू विशिष्ट भूमिकेसाठी उभे राहिले होते.  ज्यांनी त्यांना निवडून दिलें त्यांनी हें ध्यानांत धरिलें पाहिजे होते.  परंतु पट्टाभींचा पराजय तो माझा पराजय असें महात्माजींनी जाहीर करतांच सुभाषांना निवडून देणारे गारठले.  ते म्हणाले, 'आम्हांला ही नव्हती गोष्ट माहीत.  पट्टाभींपेक्षा सुभाष बरे असें आम्हांला वाटलें.  परंतु सुभाष बरें म्हणजे महात्माजी जाणें असा अर्थ होत असेल तर आम्हांला पुन्हां पाऊल सुधारलें पाहिजे.'  जहाल गटांतील लोक पंतांच्या ठरावावर मूग गिळून बसलें.  सुभाषचंद्र उघडे पडलें.  महात्माजींना काय बोल? त्यांची भूमिका स्पष्ट होती.

प्रश्न :-- महात्माजींनी सुभाष निवडून आले तर तो मी माझा पराजय समजेन, असें आधी कां जाहीर केलें नाही?
उत्तर :-- महात्माजींच्या वजनामुळें सुभाष निवडून आले नाहींत असे लोक म्हणतील.

प्रश्न
:--  पूर्वीचे प्रश्न जावोत. परन्तु कलकत्त्यास प्रकार झाले ते बरे का?
उत्तर :--  मला व्यक्तिश: असें वाटतें कीं, वर्किंग कमिटींत नवीन लोक घेतले असते तर चांगलें झालें असतें.  त्यालाच सहकार्य म्हणतात.  नव्या वृत्तीचे कांही सभासद असले तर कांहीं मोठा उत्पात झाला नसता.  सुभाष बाबूंनी मागणी कमी कमी करीत आणली.  परन्तु गांधीवादी मंडळींनीं तडजोड केली नाहीं.  पूर्वीची व. कमिटी संपूर्णपणे एकदा सुभाषबाबूंनी मंजूर करावी, मग वाटलें तर एकदोन जागा आम्ही खाली करूं असे त्यांचे म्हणणें.  यांत सुभाषबाबूंचा संपूर्ण स्वाभिमान धुळींत मिळविणें ही एकच गोष्ट होती.  सुभाषबाबूंनी राजीनामा दिला.  जें पाहिजे होतें तें झालें.  एकीकडे राष्ट्रांत ऐक्य पाहिजे असा कंठशोष केला जात आहे तर इकडे थोडीहि देवाण घेवाण न करण्याचें व्रत! सहकार्यासाठी सर्वांना तहान हवी.

प्रश्न :--  महात्मा गांधी पत्रव्यवहारांत लिहितात कीं, पंतांचा ठराव मला अलाहाबादेस येईपर्यंत माहीत नव्हता.  ही गोष्ट खरी का?
उत्तर :--  महात्माजींवर मी असत्याचा आरोप कसा करूं? जीवनांत संपूर्णपणे सत्य यावें म्हणून ज्यांना तळमळ, त्यांचा शब्द मी प्रमाण मानतो.

प्रश्न :--  त्रिपुरीस हा ठराव महात्माजींस पसंत आहे अशा कंडया पसरविल्या जात त्यांचे काय?
उत्तर :--  महात्माजींच्या नांवावर कोणी असें म्हटलें तर त्याचा दोष महात्माजींवर नाहीं.  राजगोपालाचारी वगैरे तेथें म्हणालेच होते कीं, हा ठराव महात्माजींना आवडेल की नाही हें आम्हांस पहावयाचे नाही.  आम्हाला महात्माजी पाहिजे आहेत व म्हणून हा ठराव.

प्रश्न :--  महात्माजी पत्रव्यवहारांत म्हणतात, 'हा ठराव जों जों मी वाचतों, तों तों मला तो अधिक अप्रिय वाटतो.' महात्माजींना ठराव अप्रिय असेल तर त्यांचे अनुयायी तो मागें कां घेत नाहीत?
उत्तर :--  ते म्हणतील महात्माजींच्या पसंती-नापसंतीचा हा प्रश्न नाही.  हा राष्ट्रांतील सभासदांच्या स्वेच्छेचा प्रश्न आहे.  महात्माजींचे अनुयायी त्यांचे आंधळे भक्त नाहींत हेंहि यावरून सिध्द होईल.

प्रश्न
:--  अहिंसा, सत्य जर सुभाषचंद्रहि मानतात तर मग विरोध का?
उत्तर :--  विरोध कोठें आहे ती गोष्ट स्पष्ट झाली नाही. १९३३-३४ साली जेव्हां सत्याग्रह थांबविण्यांत आला, तेव्हा युरोपांतून स्वर्गीय विठ्ठलभाई पटेल व सुभाषबाबू यांनी एक पत्रक काढलें होतें.  त्यांत त्यांनी  म्हटले होतें, 'सत्य, अहिंसा हीं सनातन तत्त्वें राजकारणांत आणणें योग्य नव्हें.  आजचे पुढारीपण दूर केलें पाहिजे.'  पूर्वीच्या अशा पत्रकांमुळे सुभाषबाबूंवर विश्वास बसत नसेल.  परंतु सुभाषबाबू आज सांगतात तर त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवला पाहिजे.  परंतु सत्य व अहिंसा मानूनही कार्यक्रमांत फेर असेल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel