परंतु रोमन रोलंड यांच्याकडे सगळया जगाचें लक्ष वेधलें गेलें तें वरील गोष्टींनी नव्हें.  आपण एक नवलकथा लिहावी आणि तींत एकाच ध्येयाच्या पाठीमागें लागलेल्या कलावंताला प्रत्यक्ष जगांत किती खडतर अनुभव येतात हें दाखवावें असें विचार त्यांच्या मनांत घोळत होते.  रोममध्ये विद्याभ्यासाकरितां असतांना त्यांनी मनांतल्या मनांत एक कथानकहि ठरवून ठेवलें होतें.  परंतु १९०४ पर्यंत या कल्पनेला मूर्त स्वरूप आलें नाहीं.  त्या सुमारास त्यांनी राजकारणांतून अंग काढून घेऊन एकांतवासाचा स्वीकार केला.  त्यामुळें त्यांना सवड सांपडली आणि त्यांनी जीन-क्रिस्टोफीया नांवाची कादंबरी एका मासिकांतून लिहावयास सुरुवात केली.  ही कादंबरी या मासिकांतून प्रसिध्द व्हावयास ८ वर्षे लागलीं.  ही कादंबरी लहानसहान नाहीं.  तिची पृष्ठसंख्या १५०० च्या वर आहे.  या मासिकाचा खप बेताचा आणि तोहि विद्वान लोकांतच असल्यामुळें या अद्भुत कादंबरीचा बाहेर फारसा बोलबाला झाला नाहीं  तरीपण या ग्रंथ-राजाची खरी योग्यता हळुहळू लोकांच्या लक्षांत आल्याशिवाय राहिली नाहीं.  प्रथम जर्मन वर्तमान पत्रकारांचे या थोर ग्रंथाकडे लक्ष वेधले गेलें आणि मग या ग्रंथाचें स्तुतिस्तोत्र त्यांनी गायलें. लवकरच त्यांचे इंग्रजीत भाषांतर झालें आणि त्यानें इंग्लिश लोकांनाहि मोहनी घातली.  मग हां हां म्हणतां या ग्रंथाचा कीर्तिपरिमल सर्व दिशांकडे पसरला.  भराभर अनेक भाषांतून त्याचीं भाषांतरें झालीं.  आणि जो ग्रंथकार फ्रान्समध्येंहि कोप-यांत पडून राहिला होता तो जगांत अद्वितीय ठरला.  आपद्ग्रस्त जगाला दिव्य संदेश सांगणारा हा कोणी तरी महापुरुष अवतीर्ण झाला आहे असें सर्वांस वाटू लागलें.  १९१५ सालचें नोबेल पारितोषिक उत्कृष्ठ वाङ्मयलेखकाला द्यावयाचें होतें.  १९१६ सालीं जाहीर झालें कीं जीन रोमन रोलंड यांना हें पारितोषिक देण्यांत आलें आहे.  ५० वर्षांपर्यंत जो लेखक सांदी कोप-यांत पडून राहिला होता तो एकाएकीं जगाच्या पुढें आला, आणि त्याची कीर्ति दिगंत पसरली.

जीन-क्रिस्टोफीया कादंबरीत एक गवई आणि त्याचे सहकारी यांचा जीवन वृत्तांत आहे.  ध्येयवादी माणसाला जीवितयात्रा सुलभ जात नाहीं.  जगाच्या रामरगाडयांत त्याचीं उदात्त ध्येयें आणि कोमल भावना यांचा चुराडा होतो.  या कांदंबरींतील नायकहि मोठा ध्येयवादी आहे.  आपल्या ध्येय सिध्दीकरितां तो फ्रान्स व जर्मनी या देशांत प्रवासाला निघतो.  ठिकठिकाणीं त्याला निरनिराळया वृत्तीचे आणि स्वभावाचे लोक भेटतात.  हर्षामर्ष, लाभालाभ, जयापजय, प्रेमविद्वेष, मैत्री-वैर यांच्या अनेक प्रसंगांतून त्याला जावे लागतें.  कमी धीराचा माणूस असता तर तो या कसोटीला टिकता ना.  या खडतर अनुभवानंतर त्याचें मन गांगरून गेलें असतें.  आपली उच्च ध्येयें आणि उदात्त भावना यांना रामराम ठोकून तो निराशवादी बनला असता आणि जगाला शिव्याशाप देत हळहळत त्यांनें आपला अंत करून घेतला असता.  प्रस्तुत नायकाचा अंत दु:खात झाला आहे ; तरी त्यांतच त्याचा विजय आहे.  ' सुखदु:खें समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ' याप्रमाणें या धीरोदात्त पुरुषाने आपल्या ध्येयापासून यत्किंचितहि माघार घेतली नाहीं ; शेवटी ध्येयाकरितां आपल्या प्राणाचीहि आहुति दिली.  यांतच खरें पौरुष आहे.

'उद्यच्छेदेव न मेदुद्यमो ह्यैव पौरुषम्
अप्यपर्वणि भजेत न नमेदिह कर्हिचित्'


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel