३३ दोन महात्म्यांची भेट

गोलमेज परिषद आटोपल्यानंतर महात्मा गांधींना युरोपमध्यें थांबण्याची इच्छा नव्हती.  तडक त्याच पावलीं परत हिंदुस्थानांत यावें असें त्यांचें ठरलें होतें.  जर्मनी, फ्रान्स इत्यादि देशांतील अनेक मोठ्या आणि प्रसिध्द लोकांनी अत्यंत आग्रहाचीं आणि प्रेमाचीं बोलावणीं केलीं होतीं.  त्या सर्वांचा महात्मा गांधींनी मोठ्या कष्टानें अव्हेर केला.  रोमन रोलंड यांच्या निमंत्रणाला मात्र त्यांना नाहीं म्हणतां येईना.  त्यांना भेटण्याकरिता महात्मा गांधीं मुद्दाम स्वित्झर्लंडमध्यें गेले.

रोमन रोलंड हे फार मोठे गृहस्थ आहेत आणि महात्माजींनी हिंदुस्थानांत जें कार्य चालविलें आहे, त्याचाच प्रकार रोमन रोलंड हे युरोप-अमेरिकेमध्यें करतात.  अशा माणसाच्या शब्दाला नकार देणें महात्मा गांधींना जड गेलें हें उघडच आहे.  कदाचित् रोमन रोलंड आणि आपली गांठ पडल्यानें जगांतील कलह थोडे तरी कमी होण्याचा संभव आहे, अशी महात्माजींना आशाहि वाटली असेल!  स्वित्झर्लंडसारख्या सृष्टिसौंदर्यानें फुलून गेलेल्या देशांत या दोन महात्म्यांची -- एक पूर्वेचा आणि दुसरा पश्चिमेचा -- भेट म्हणजे समसमांचा संयोग होय.  ' पूर्व ती पूर्व आणि पश्चिम ती पश्चिम;  दोघांचा संयोग कधींहि होणार नाहीं. '  असे उद्गार मदोन्मत्त झालेल्या किपलिंग या इंग्लिश ग्रंथकारानें काढलेले आहेत.  रोमन रोलंड आणि महात्मा गांधी हे अशी कांही अपूर्व घटना घडवून आणतील कीं पूर्व आणि पश्चिम यांचाहि मिलाफ होईल!

गांधी आणि रोलंड या दोन महात्म्यांची भेट झाली तरी राष्ट्राराष्ट्रांमधील वैरें कशीं शमतील, जगांत शांतता कशी नांदेल याचा विचार करण्यांकरितां कोणीहि जमत नाहींत.  परन्तु सध्यां जगाला युध्दाची धडकी भरली आहे, आणि शांततेची दृढतर उत्कंठा लागली आहे.  पुन्हां युध्दाची धुमश्चक्री सुरू झाली तर संबंध मनुष्य जातच रसातळाला जाईल अशी अनेक लोकांना भीति पडली आहे.  या दोन महात्म्यांची भेट होऊन जगाची ही भीति थोडीशी तरी कमी होईल काय? जगांत विश्वबंधुत्व पसरावें, सगळया लोकांनी गुण्यागोविंदाने रहावे; सुधारलेले, मागासलेले, पाश्चात्य, पौरस्त्य, इत्यादि सर्व लोकांचा सारखाच उत्कर्ष व्हावा हें दोघांच्या आयुष्याचें ध्येय आहे.  जगाला द्वेष, कलह, युध्दें यांची कीड लागली आहे;  म्हणून सृष्टि इतकी सुंदर आणि समृध्द असूनहि लोकांना आपत्तीमध्यें दिवस कंठावे लागत आहेत.  सत्य आणि अहिंसा यांचे साम्राज्य सर्वत्र पसरलें तर सुख आणि समृध्दि यांची कोणालाहि वाण पडणार नाहीं हा दिव्य संदेश दोघांनाहि सांगावयाचा आहे.

महात्मे हे कोणत्याहि एका देशाचे नसतात.  त्यांच्यावर सगळया जगाची सत्ता असते.  सगळे देश आणि काळ यांच्याकरितां त्यांचा संदेश असतो.  रोमन रोलंड हे फ्रेंच असले आणि महात्मा गांधी हे हिंदी असले तरी जगांतील २०० कोटि लोकांचे डोळे आपल्या उध्दाराकरितां त्यांच्याकडे लागले आहेत.  महात्मा गांधींचे चरित्र सर्वांना अवगत आहेच. म्हणून रोमन रोलंड यांच्याविषयीं थोडी माहिती खालीं देतों.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel