चांगुलपण संपदा अशि सुंदर पाहुन झुरतों ।
उदास वाटे दशा, तुझी गडे करित आशा फिरतों ॥धृ०॥
चंद्रानन अतिस्वच्छ, उदय भर पुनवेची भरती ।
सौदामिनिसम साम्य प्रभा पडते भुमिवरती ।
हर जिन्नस हरभास विलासामधें शाहाणि पुरती ।
बिजल्या नारी मोठया तुला पाहुन मागें सरती ।
डामडौल पिढीजाद, चाल तुझी हंसिणिची धरती ।
सापडशील ज्याजला सकळ त्याचीं दु:खें हरतीं ।
सुगराइचा सरसुभा, काय करशील न कळे करणी ।
केवळ किमयागर, कळा नसे शोधन करितां धरणी ।
व्हावें म्हणुन हें राज्य प्राप्त, कबुल जाहलों मरणामरणीं ।
सकाम संचारणी शितळ छाया वरती धरितों ॥१॥
नीट निकोप देह, सरळ झाड सोन्याचें वाढलें ।
मुख पाहतां सौचिता चहुकडे दिसतें उजाडलें ।
रत्न आणिक पाषाण परीक्षेला नाहीं दडले ।
गोड, अंबट, कडु, तिखट ब्रह्मदेवानें निवडले ।
तुझा नाद लागला, दौलतीला पाणी पडलें ।
जन्मीं आल्याचें सौख्य तुला भोगणें हें आवडलें ।
भिडुं दे राउत मैदान, वाट मग होईल ती होउं दे ।
चांडाळ दर्द पापिणी, एकदां कर वरता ठेउं दे ।
नव्हें अमरपटयाचें जिणें, असें कांहीं चित्तामधें येउं दे ।
पिक पिकलें घेउं दे, सराइचा पाहारा सरतो ॥२॥
फार गोरी गुलगुलित, नयनें कमळें जशीं उमलती ।
शिताफळें इरसाल उरावर तसे जोबन हलती ।
बागाइत कळी कनक शेवति गेंद तर्र फुलती ।
तव प्रीतिच्या बळें साध्य हे गजतुरंग झुलति ।
नदर ठरो देइ ना, ध्यान चंचळ, डोळे भुलती ।
धनमालाची खाण, हातीं लागेल त्याची चलती ।
या अष्टसिद्धी नवनिधि हजिर होति एक्या वचना ।
नग नाग निवळ न्याहाळितां दिसे त्रैलोक्याची रचना ।
ता म्हणतां ताकभात इतकी समजावी सूचना ।
मुक्त मदन मोचना हा मोहोमय भ्रम अंतरी भरतो ॥३॥
शुभ लक्षण शुभवंत, शांत शोभा नवि नवाळी ।
देवगुणाची रास, नवट नागीण फिरे गव्हाळी ।
सुमनाक्षर प्रतिवचन मधुर शब्दाची मवाळी ।
एकांति भेटशील त्या दिवशीं आमची दिवाळी ।
विषयानलीं धडधडत काळजामधिं जिव्हा वाळी ।
मन मिळल्याचे अधिं कोराची करूं नये टवाळी ।
सार्‍याहुन आगळी वेगळी लबक वजनदार ती ।
अवघ्यामध्यें कुलकुला तुला शरिराची आर्ती ।
खडकीं कोंब फुटतील असा कधीं परमेश्वर सारथी ।
ज्या ज्या रितीं होशिल मान्य ते ते विचार करितों ॥४॥
धरिली आलिंगुन तुला, अशीं रात्रीं पडती स्वप्नें ।
हीण पदमीण अप्सरा राधिका रंभा कुळदीपनें ।
मोहनामृत विश्रांत योजलों हे प्रपंचदीपने !।
गुणसरोवर जळ वाहे, सखे तूं कल्याण कल्पने ।
परमनिष्ट संतुष्ट सधन संतत सुभाव जपणें ।
अनीत आचरीत, अपरमित अघोर तप तपणें ।
महान यत्न संकटीं मिळालें गोत्र घटित वागतां ।
इच्छित फळ घरीं आलें, लाभलें, निश्चयलय लागतां ।
न वर्णवें संतोष, घोष तो शेषमुखीं सांगतां ।
होनाजी बाळा म्हणे, भोगितां चौर्‍यांशी तरतो ।
मिठमोहर्‍या जिवप्राण दृष्ट तुझि घडिघडि उतरतों ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel